मिर्ची म"सला"………….!



घरात मसाले ,पापड , लोणची यांची रेलचेल सुरु झाली कि उन्हाळा सरत आल्याचं अगदी जाणवायला लागतं . पण हल्ली लोकांकडे पैसा आलाय शिवाय इतकी झंझटमारी करीत बसण्यापेक्षा आयत बाजारात मिळतंय कि असा कितीसा फरक पडतोय १०० -२०० शेचा उन्हातान्हात मरमर करण्यापेक्षा दोन पैसे गेलेले काय वाईट असा नवा फंडा सध्या अनेकांनी स्वीकारलाय .पूर्वी बाया घरीच मसाले ,पापड ,लोणची करत धम्माल असायची यावेळी अंगणात कडक उन्हात मिरच्या सुकावायाच्या त्या मोडायच्या डंकिनवर नेऊन दळायाच्या इथे येणाऱ्या प्रत्येकीच्या मसाल्यात अनेक परी असत कुणाचा कांदा खोबरं घालून केलेला घाटी मसाला ,खडे मसाले घालून केलेला मालवणी मसाला , नुसती मिरची मीठ घालून केलेला तेली मासला , लाल भडक कलरची मिर्ची पिसून केलेला करी मसाला इत्यादी मसाल्याचा कडक ताजा दर्प डंकीनच्या वातावरणात पसरलेला असे .डंकीनवाली मसाला मारील म्हणून आई ५ किलोच्या मिरच्यांचा भुगा पडून त्याचा मासला डब्यात भरे पर्यंत तिथ बस्थान मांडून बसत असे . ठसका जाणारा दर्प आणि धण्या जिऱ्याचा खमंग हवेत रंजी घालत लांबवर पसरत असे .यंदा कलर जरा जास्त भडक आलाय नाई - तिखट पण जबरी झालाय . मिरच्या चांगल्या मिळाल्या बाई अशी कवतुकाची गोडावी ऐकत मासला अखेर ठेवणीच्या बरण्यात बंद होतो. पापडाचं ही असंच काहीसं आज हिच्याकडे तर उद्या तिच्याकडे पापड बनवायचा बेत असे .पोळपाट लाटणी घेवून पोरी एकमेकिंच्या दारात बसून पापड लाटायच्या , लोणच्याच म्हणाल तर वैशालीच्या हातच्या लोणच्याला टिकाव आणि पुरवठा पण आहे म्हणून तिला लोणचं बनवायचं आमंत्रण द्यायल . तिच्या घरी दोन चार वेळा खेटे घालायचे. हे सगळं आत्ता हळूहळू विरळ झालंय सध्याचा बायका कुणाकडे पापड लाटायला जायचं याला so down market म्हणत नाक मुरडत सोफ्यावर लांब होत. diplomatic डेली सोप बघत वेळ घालवण्यात अधिक रस दाखवतात.

दापोलीत असताना संपूर्ण मे महिना रग्गड कामात जायचा. गुरांची वैरण गोठ्यात भरून घ्या, चुलीची लाकडं खोपीत मांडा , दारातल्या वळचणीला आडोसा घाला, रोज नव्या कामाची यादी तयार असे. कोकणात तर मीठ ,सुकी मासळी , कोकम , आंब्या फणसाचे साठे , करवंद , कैऱ्या आळूच्या उसऱ्या, सुकवलेल्या

आठला, एवढंच काय पूर्वीचे लोकं म्हणे पावसाळ्यात उपयोगी पडतील म्हणून ओल्या भाज्या सुकवून ठेवत असत . मे महिन्यातल्या आठवडा बाजारात खरेदीसाठी लोकांची एकच झुंबड उडत असे . पावसात छतावर घालायचा प्लास्टीक, नांगरासाठी नवीन कासरे,छत्र्या , पावसाळी चपला ,शाळेतल्या पोरांना दप्तर- नवीन पाटी ,ते अगदी मसाल्याच्या मिर्च्या , लसूण -कांदे अस किडूक मिडूकच्या जिन्नसाची खरेदी करतांना बटवा पार हलका होयीस्तोवर तीन चार चकरा मारीत अख्खा बाजार पालथा घातला जाई . ते दिवसही तसे होते म्हणा. मुसळधार पावसात कित्तेक गावांचा संपर्क तुटत असे. आणि एकदा पावसाळा सुरु झाला. आणि लोक शेतीच्या कामाला वाकले कि मग पुढचे दोन तीन महिने त्यांना फुरसत नसे . अशा वेळी दिवसभर शेतात राबून घरी आल्यावर गरम गरम भातावर सुक्या मासळीच कालवण घालून आडवा हात मारायची मजा काही ओरच. दुपारी शेतावरच्या बांधावर बसून फणसाच्या आठला घालून केलेल्या जवळ्या सोबत भाकरीचा तुकडा मोडताना भुकेचा आणि मन तृप्ततेचा एक अनोखा आनंद अनुभवता येत असे.

"मी तुझ्या पेक्षा चार पावसाळे जास्त पाहिलेत " हि म्हण उगाचच प्रचलित नाही . निसर्गाच खरं रोद्र रूप पावसातच पाहायला मिळत. लहानपणी एक गोष्ट होती. ' कावळ्याच घर होतं शेणाच आणि चिमणीच घर होतं मेणाचं ' काय गम्मत होती नाही. अजूनही ती गोष्ट जशीच्या तशी आठवतेय. कोकणातल्या पूर्वीच्या जुन्या घरी कवलातून टीप टीपणाऱ्या पाण्याखाली टोपं लावताना आमची तारांबळ उडत असे. पण त्यातही एक वेगळी मजा होती. मातीच्या घरात जो ओलावा होता तो सध्याच्या सुखवस्तू घरात नाही. दिवस बदलले शेती करणारी लोकं हाताच्या बोटावर मोजण्या इतकीच राहिलीत. पापड , लोणची, तिखट मसाले बाजारात रास्त दारात रेडी मेड मिळू लागले .आठला , साठे , उसऱ्या घालणं हळू हळू काल बाह्य झालंय. तसही पक्षी ,प्राणी वा माणसं सगळ्यांनाच या ऋतूत चार गोष्टी जमवायला लागतात. कारण पावसाळा पहिला असो वा दुसरा झोडपणाऱ्या पावसाच्या सरी मनात रंजी घालत असतानाच घोंघावणांर वादळ कधी सारं उध्वस्त करेल याचा अंदाज बांधता येत नाही.

© संतोष टाकळे

* फोटो प्रातिनिधिक स्वरूपाचा .