एन्जॉय Mango सिझन…………!





साहेब आंब्याची पेटी …………दारावर आलेल्या डिलिवर बॉय ने रसरशीत आंब्यांचे चित्र असलेला बॉक्स समोर धरला …………… पण आम्ही नाही मागवलेत ………. इतक्यात किचन मधून आवाज आला घ्या ती पेटी मीच ऑर्डर केलीय . ऑनलाईन शॉपिंग केलीय माझ्या नवीन क्रेडीट कार्ड ने ……… ३ हजाराचा बॉक्स चक्क २५०० ला मिळालाय. ………अग पण २५०० पण जास्तीच आहेत कि ……………तुम्ही ती पेटी आधी घ्या हो हिशोब कसला मांडताय ………. ऐकून चार सह्या केल्यावर आंबे माझ्या ताब्यात आले . वर ते डिलिवरी करणारं पोरगं म्हणालं सर एन्जॉय mango सिझन ……………… काय डोम्बल एन्जॉय करू अडीच हजाराचे आंबे ……………. एके काळी वृत्तपत्रात महिनाभर बातम्यांचा रतीब दिला कि तीन एक हजार मिळत तेही TDS चे १४० रुपये कापून ……………सरकारी नोकरी असलेली बायको असण्याचे फायदे पूर्वी ऐकले होते आज ते अनुभवता येतायत असे अनेक विचार मनात मोहरून येत असतानाच बाई पुन्हा उद्गारल्या अहो ऐकलत आज आमरस करू का हो ? केशर घालून …………….सोबत चार पुऱ्या करते खूप दिवस गोडाचा बेत नाही झालाय आज जमवतेच कशी ……………मी काय बोलणार त्या महागड्या रसरशीत आंब्यांचे चित्र असलेल्या बॉक्सकडे पाहत म्हटलं कर तुझी इच्छा असेल तर पण आधी आईला विचार फोन करून कस करावं नेमकं ती फर्मास बनवते आमरस …………स्मिता तुला आठवतय तू पहिल्यांदा आपल्या कोकणातल्या घरी आली होतीस तेंव्हा आईने आमरस पुरीचा घाट घातला होता . डीगीच्या माळवनातले आंबे उतरवले होते तेंव्हा त्यातल्या पिवळ्या धम्मक आंब्याचा रस काढून त्यात वेलची पूड आणि थोडसं जायफळ घालून केलेला तो आमरस आजही जिभेवर चव टिकवून आहे. तू केलेल्या खरपूस पुऱ्या पाहून आईन सून सुगरण मिळाली हो अस चार जणीत कवतुक मिरवलं होतं. मी पार एव्हाना कोकणातल्या चुलीकडल्या पडवीत पोहचलो होतो. आणि पुन्हा भानावर आलो ते स्मिताने कणिक भिजवायला समोर ठेवलेल्या परातीच्या खानकिणी आवाजान .

आई पुराण संपल असेल तर जरा एव्हड कणिक मळून द्या . तोवर मी मिसेस पाटीलना फोन करते त्यानी "mango pulp सामोसा" हि नवी रेसिपी इनोवेट केलीय संध्याकाळी चहासोबत करता येतील. ……………… साला एकदा लग्न झालं कि पुरुष माणसाच जगणं चूल मुल आणि जन्माची दिशाभूल असच रे बाबा . ……………तिकडे बाई टेरेस गार्डन च्या झुल्यावर झोका देत ……अय्या हो का ……. ह्म्म्म, ओह्ह्ह्ह्ह्ह्ह काय सांगताय काय ……… खरं आहे …………. हो ना …………. अहो म्हणून तर online मागवली पेटी . pure देवगडी हापूस आहेत हो म्हणजे त्यांनी तसं certificate दिलंय पेटी सोबत आणि ५०० रुपये discount मिळाला शिवाय फ्री home delivery……… . आणि हल्ली कोण जातंय बाजारात. काय ती गर्दी , उकाडा आणि तिथ जाऊन पण मेली बार्गेनिंग आलीच आणि हल्ली भय्ये हातोहात फसवतात हो . आमच्या ह्यांनी गेल्या वर्षी बाराशेला आणलेला हापूस नुसता आंबट ढांण होता . एक किलो साखर घातली तरी मेली चव आली नाही त्या आमरसाला ……………त्यांना साधे टोम्याटो निवडून आणता येत नाहीत ते आंबे आणणार म्हणजे पाटील वाहिनी तुम्ही कल्पनाच न केलेली बरी ह्हाहाहा ( बायकांना आपल्या नवऱ्याची अशी शोभा करतांना काय स्वर्गीय आनंद मिळतो कोण जाणे ) सो म्हणून आय order my mango this time online. बरं तुम्ही mango pulp सामोश्याची रेसिपी सांगतायना एक मिनिट हा ………………. अहो तो नोट प्याड आणि पेन घेऊन या ………. हम्म बोला हे घेतायत लिहून …साहित्य - मैदा २ वाट्या , साजूक तूप चार मोठे चमचे , आंब्याचा रस १ मोठी वाटी चवी पुरतं मीठ …………………. कृती - प्रथम मैदा ……………………………………. ओह thank you पाटील वाहिनी आज करतेच आणि कळवते कसे झाले होते. बरं ठेवू ………… ( बाई १ पाऊन तास झाला आवर आता ) माझ्या सारखे अनेक पुरुष लग्न झाल्यावर मनातल्या मनात बडबडण्याच्या रोगाला बळी पडतात. बाई पुन्हा ओरडल्या काय हो किती घाण अक्षरात लिहिलंय हे आणि चवी पुरतं पीठ नाही हो मीठ लिहायचं होतं सामोसे लालसर तळायचे असतात हो काळसर नाही हो कुणी केलं बुवा पत्रकार तुम्हाला त्यांची गाठ घालून द्याच एकदा ………….

२ एक तासांनी पान वाढलीयेत या आता आणि TV बंद करा आधी तो चोवीस तास त्याचं त्याच बातम्या डोकं गरगरत कस नाही तुमचं . तशी कितीही बडबड केली तरी स्मिताच्या हाताला चव आहे. पानात पुऱ्या आणि आमरसाची कठोकाठ भरलेली वाटी विशेष आकर्षण होती. मी सवयी प्रमाणे भाजी सोबत पुरी मोडली ………पुन्हा बाई पेटल्या अहो दोन तास खपून आमरस केलाय त्याचा घास घ्यायचा सोडून भाज्या कसल्या चाखताय . अगदीच कसे हो अरसिक तुम्ही तरी माझी मैत्रीण म्हणत होती. बातम्या देणारा नवरा नको करूस त्यांना फक्त शब्दात रस असतो. बाकी सगळचं अवांतर ………… तिची बडबड सुरूच होती. पण मला पुन्हा कोकणात चुलीकडच्या पडवीत जावसं वाटलं जिथे आई चुलीवर पुऱ्या करतेय . तळ गाठत आलेल्या आमरसाच्या टोपातला चमचा पुन्हा पुन्हा भरून माझ्या पानात वाढतीय. चागलं झालंय का रे घे ना अजून दोन पुऱ्या ……….रस टाकू अजून …………….पोट भर जेव रे ………तू येणार आहेस गावाला असा निरोप मिळाला आणि ह्यांनी आपला शेडी आंबा उतरवला ………बंडा अण्णा चढले होते झाडावर त्यांना जाताना चहापाण्याला दे तेव्हडे न विसरता . हल्ली ते येतात म्हणून कामं होतायत नाहीतर यांचा हात दुखावल्या पासून सगळंच अडलंय बाबा …………. उद्या फणसाची भाजी आणि कोकमाची कढी करू का रे आपल्या बरक्या फणसाच्या कुवऱ्याना भारी चव हाय. आता जेवलास कि पडवीत पड जरा उन्हातून फिरत बसू नकोस मग जा वाडीत संध्याकाळी ………… ताक करू घेशील ग्लास भर विरजण मोडून नवीन लावते आज. जेवून उठताना एक नजर आमरसाच्या टोपात उरलेल्या चमचाभर रासाकड गेल कि या किंचित रसात आई किती पुऱ्या मोडिल हा प्रश्न काळजात कुरकुरतो पण शेवटी तीच एक वाक्य अमाप सुख देत . तू पोटभर जेवलास ना माझा आत्मा तृप्त झाला बग …………………………अहो आमरस खाऊन झाला असेल तर उठा आता आणि ताट बेसिन मध्ये टाका सुवर्णा येईल इतक्यात तिचा खोळंबा नको तिला आपल्याकडे नेहमी लेट होतो म्हणून तिची कुरबुर चालू असते. मला अजून बरीच कामं पडलीयत संध्याकाळी "mango pulp सामोसा" करायचाय , सोसायटीच्या महिला मंडळाच्या पिकनिक संधर्भात मीटिंग आहे. आणि पार्लरची पण नेमकी आजचीच apportionment आहे . तुम्ही काय आता झोपा काढाल . बाईचा जन्मच मेला कामासाठी झालेला. आंब्याच्या सीझनमधली पहिली आंबापेटीचा फोटो टाका हो FB वर आणि मलाही tag करा माघाचच्या गडबडीत राहुन गेलं फोटो description मध्ये एन्जॉय mango सिझन लिहा.

© संतोष टाकळे
 


शांता आक्का ...........!




गावात पाटपाणी -साखरपुडा- लग्न - वा अगदी …सत्यनारायण असो हिची लगबग ठरलेली . अगदी भटजी काकांना पुजेच्या तयारीत लागणारं दही दुध हि स्वतः नेऊन देण्यापासून ते पहिल्या दोन मंगलाष्टका झाल्यात मुलीला आणा असा मांडावातला हुकुम येताच नव्या नवरीला घेवून काकू डोळे पुसत पायऱ्या उतरेल ……… कुठल्याही शुभ ठिकाणी काकू नाही अस फारच कमी वेळा घडत असेल . तिचा एक हाती शेकडो माणसांच्या जेवणाचा अंदाज, कितीही कमी पडलं तरी पुन्हा चूल पेटवायची जिद्द , शेजारी पजाऱ्याची पडती वेळ खंबीर पणे उचलून धरण्याची तयारी. लग्न घर कोणाचही असो यजमान पद आपसूक हिच्याकडे देण्याचा लोकांचा विश्वास अशी अत्यंत हव्शी उत्साही आणि तितकीच भावूक आमची हि काकू आम्हा सगळ्यांचा मोठा आधार ………… तुझ्या लग्नात भरल्या काठा पदराची साडी नेसून वरात गाजवीन म्हणणाऱ्या ह्या आमच्या लाडक्या काकूची कथा "अशी ती माणसं " या पुस्तकातून लवकरच तुमच्या समोर येयीलच .

© संतोष टाकळे

निरोपाचा तास …………. !



गेली ३ महिने प्रत्येक शुक्रवारी होणारा तास आज शेवटचा अस सकाळ पासून अनेकदा मनात येऊन गेलं का कुणास ठावूक पण खूप down फील होत होतं ………मुळात k c college journalism च्या क्लास रूम ची सवय आणि आमची जमलेली टीम दोन्ही गोष्टी एकत्र मोडणार होत्या. K.C म्यानेजमेंटच्या स्मिता मॅमचा गेल्या आठवड्यात आलेला कॉल आणि त्यांनी एकंदरीत lecture बद्द्ल व्यक्त केलेलं समाधान सोबत the end होणाऱ्या निरोपाच्या तासाची केलेली आठवण . times च्या रोहित गोळे ने केलेलं recommendation आणि मराठी आडनाव ऐकून तुम्ही नक्की इंग्लिश मध्ये शिकवू शकता का ? हा म्यानेजमेंटला पडलेला प्रश्न यातून पुढे सरकत तासावर तास होत गेले. काही ठिकाणी इगो , जास्तीचं ज्ञान आणि असे बरेचसे अडसर आलेच पण शो मस्ट गो ऑन म्हणत प्रयोग चालू राहिला हळूहळू मतभेत आणि दुरावे मिटत गेले. रिकामे बेंच भरत गेले.उत्साहाचं तापमान वाढत गेलं . अर्थात विसंवाद संपत होता. प्रोजेक्ट्स मधून अनेक गोष्टी नव्याने मलाही शिकता आल्या . वेळ भरभर निघून गेली आणि i have only 2 lectures in my hand so please let me know if there is anything missing in our syllabus अस जाहीर करताच . पोरं ओह्ह्ह नो ………म्हणत चुकचुकली ……….

तसाही अखेरचा टप्पा आलाच जवळ याची सूचक कल्पना देणारं वातावरण अधिक मळभ दाटून आणत होतं अशातच २१ मार्च आलाच संध्याकाळचे ५ वाजून गेले असतील .points काढ , notes मार्क कर , P. P. T वर एक नजर टाक, मागच्या तासाची उजळणी घेणारं to be point review , अवांतर काय सांगायचं त्याची टिपण काढा अशी नेहमी सारखी लगबग नव्हती कारण आज काही शिकवायचं नव्हतंच आज फक्त दंगा घालायचाय . कारण पोरांनी चक्क फेयर वेल पार्टी ठेवली होती. आदित्य ,राज ,स्नेहल , पूजा यांनी केलेलं surprise पार्टीच प्ल्यानिंग , सगळ्यांनी मिळून दिलेलं गिफ्ट आणि २ तासाची फ़ूल टू धम्माल ……………………फक्त १४ lecture's ची आमची ओळख आणि student सोबत झालेली मैत्री बघून ………… खूपदा सहप्राध्यापकांनी बजावलं सर मुलांशी इतकी मैत्री ठीक नाही. नाहीतर पोरं डोक्यावर बसतील . पण आपण लिमिट्स पाळले तर अस डोक्यावर बसणं वैगरे होत नाही आणि हा नुसता समज नाही तर स्वानुभव आहे . हे कित्तीक जणांना सांगत बसावं.

© संतोष

कोंन कहता है भगवंत होते नहीं ……………!





रविवार मोकळा ठेवा Social Impact. ग्रुपच्या म्हात्रेचा कॉल आला. कुठल्याशा बालसदनात विझिट आहे. ग्रुपच्या वतीनं inverter द्यायचा आहे. असं मोघम सांगत त्याने फोन ठेवलाही. या रविवारी अजून काही प्लान होते. पण त्या निमित्ताने सगळे भेटतील .यापूर्वीच्या काही विझिट मध्ये या सागळ्यांशी जिव्हाळा तयार झालाय .विजय काका , स्मिता काकी , मीनाक्षी मॅम , वसंत आजोबा, प्रकाश म्हात्रे , प्रणय पाटील , योगेश पाटील या वेगवेगळ्या वयोगटातल्या आणि क्षेत्रातल्या लोकांनी एकत्र येऊन सुरु झालेला हा उपक्रम टाळणं अशक्य . लगोलग चार दिवसांनी रविवार आलाही सकाळी आज भेटतोय असा sms होता. घड्याळ पाहिलं ९ वाजायला आले होते. १२ ला भेटायचं म्हणजे आता आवरायला हवं घरी नेहमीप्रमाणे कुरबुर सुरु झाली. पण तरीही चहा - नाश्ता तयार होताच . वेळ सरकत होती. काटा १० च्या पुढे धावत होता. आता मात्र एक क्षण थांबून चालणार नाही. येतो म्हणत घर सोडलं आणि स्टेशन गाठलं . तोबा गर्दीतून मुसंडी मारून डब्यात शिरण्याचा स्टंट केला. दीड तासांनी अंबरनाथ आलं . प्रवास बोरिंग नव्हताच सोबत होती ती सहप्रवाश्यांची त्यांच्या नाना तऱ्हा पाहत तासभर रमत गेला.

म्हात्रेने दिलेल्या पत्यावर पोहचलो.बाहेर बालसदनाचा बोर्ड होता. मुलांचा आवाज कानावर पडला अर्थात कार्यक्रम कधीचाच सुरु झाला असावा. एका हॉल मध्ये ५ ते १२ वयोगटातली मुलं फळ्याकडे तोंड करून बसली होती. Social Impact. ग्रुपचे वसंत आजोबा मुलांना चित्रातल्या गंमती जमती दाखवत होते. संथेच्या ट्रस्टी आणि Social Impact. ग्रुपचे इतर मेंबर यांच्यासोबत ओळखी झाल्या. मुलं आजोबांच्या चित्रकलेच्या तासात गुंतली होती.दरम्यान इथ आलेल्या मुलांची माहिती मिळाली. काहींनी आपले आई - वडील पहिले नव्हते तर काही जण कुटुंब मोडलं म्हणून इथं आले होते.काहींना चक्क जन्मदात्याने रस्त्यावर सोडलं होतं. प्रत्येकाची व्यथा वेगळी ………………. नुसतं ऐकून डोळे पाणावले तर ज्यांनी भोगलंय त्यांनी किती सहन केलं असेल नुसती कल्पना केलेलीच बरी……………. पुन्हा एकवार ते सगळे ते बोलके चेहरे पहिले. त्यांच्या नजरेतला आशवाद स्पष्ट दिसत होता. 

आमची निघायची वेळ होत आली होती ………………. बाई म्हणाल्या जाता जाता आमच्या मुलांच भजन ऐकून जा पोरांनी सूर धरला एका मागोमाग भजनांनी लय पकडली आणि अखेरच्या भजनाच्या ओळी मात्र काळजात भिडल्या त्या होत्या …………"कोंन कहता है भगवंत होते नहीं "……………! 


- संतोष टाकळे

आकशवाणीच हे मुंबई केंद्र..............!

 आकशवाणीच हे मुंबई केंद्र आहे आपण ऐकत अहात सकाळच्या बातम्या आणि ठळक घडामोडी पुढील प्रमाणे …………… भारताची अणु करार करण्यास अखेर तयारी ……………… राज्यात हंगामी रोजगार योजना लागू करणार - मंत्रीमंडळाचा एकमतान निर्णय मंजूर ,जेष्ठ गायिका लता मंगेशकर यांना भारतरत्न हा सर्वोच्च पुरस्कार जाहीर आणि महाराष्ट्रभर थंडीचा तडका कायम पारा अधिक खाली जाण्याचा हवामान खात्याचा इशारा.……………. आता बातम्या विस्तारानं …………………गावात एकेकाळी दिवसाची सुरवात रेडियोवरच्या या बातम्यांनी होत असे माजघरातला जगाशी संपर्क ठेवणारा हा ट्रांजिस्टर रेडियो ग्रामीण जगण्यातला अविभाज्य घटक होता. पावसाळा असो वा हिवाळा मुंबई केंद्राने प्रसारित केलेल्या बातमी पत्रात हवामान खात्याचा अंदाज त्या काळी अचूक निघत असे ………बरेचदा पावसाळी शाळेत दांडी मारण्या करिता वेध शाळेचा अतिरुष्टीचा इशारा पुरेसा असे……….रेडियो संधर्भात अशा अनेक आठवणी आहेत . 

आकाशवाणीच्या याच मुंबई केंद्रात एकदातरी जावं अशी खूप वर्षांची इच्छा आज पूर्ण झालीय . अस्मिता वाहिनीच्या "भेटीगाठी" या लोकप्रिय कार्यक्रमात अभय करंदीकर या मित्राने घेतलेली माझी "सोशल नेटवर्किंगच्या लाटेवरवरचा युथ " या विषयावरची मुलाखत आपण येत्या १९ मार्चला रात्री १० वाजता ऐकू शकाल . आपल्यापैकी बऱ्याच जणांचा यात संधर्भ येणार आहे. मुळात अभय ने विचारलेल्या काही क्लीन बोल्ड प्रश्नांना उत्तरं देताना आज कस लागला खरा सोबत तो काळ पुन्हा आठवणीत ताजा झाला. एकूणच धम्माल झालीये हि मुलाखत आपण नक्की ऐका आणि कळवा तुमच्या सूचना आणि प्रतिक्रियाहि .

विशेष आभार - प्राजक्ता खेडेकर , अभय करंदीकर , आरती मॅम ,आणि तुम्ही सगळेच जिवलग मित्र. 



© संतोष टाकळे

मनस्पर्शी ……………!

सोशल नेटवर्कींग ने दिलेली प्रसिद्धी आणि समविचारी मित्र यांचा गोतावळा आता अधिक वाढतोय ……Mark Zuckerberg या अवलियाने उपलब्ध करून दिलेलं हे प्रभावी शस्त्र काय किमया करू शकतो याचा प्रत्यय एव्हाना तुम्हा आम्हा सर्वांना आलाच असेल .FB वर फावला वेळ जावा म्हणून येणारे अनेक जण आज वेगवेगळ्या विषयावर व्यक्त होतायत . विचारांची तांत्रिक क्रांती घडते आहे . आणि आपण सगळेच याचे निर्माते आहोत हे विशेष .
फेसबुक वर आपण एकमेकांच्या सुख- दुखात मिसळून जातो . आणि यातून एक नवा मनस्पर्शी प्रवाह सुरु होतो . याचा स्वानुभव मी सध्या घेतोय . काही दिवसांपूर्वी ओळख झालेल्या सोलापूरच्या प्राध्यापक सुधीर देशमुख सरांनी स्वाक्षरात लिहिलेलं पत्र सोबत अच्युत गोडबोले यांच मुसाफिर आणि सलाम चाऊस यांचं यश शात्र हे पुस्तक पाठवून मला जाहीर झालेल्या पुरस्काराच्या निमित्ताने माझं कवतुक केलंय ………. दापोलीतल्या घरी जेंव्हा हे पार्सल धडकल तेंव्हा बाबांचा फोन होता. विजापूरहून तुझ्यासाठी पार्सल आलंय तुला न विचारताच फोडून पहिल. दोन पुस्तकं आहेत आणि सोबत एक चिठ्ठी . चागलं लिहिलंय त्या माणसाने. अनपेक्षित होत हे सगळं माझ्यासाठी………… नेमकी काय प्रतिक्रिया द्यावी या संभ्रमात आहे मी ………. पण तरीही या सगळ्याच श्रेय तुम्हा सर्वांना आहे. माझ्या पुरत्या लिहिलेल्या लिखाणाला तुम्ही स्वीकारलत, मी नोंदवलेल्या निषेधाच्या काफिलात तुम्ही सामील झालात . सतत काहीतरी लिहित असाव म्हणून तुम्ही तगादा लावत राहिलात . आणि या सगळ्या प्रोसेस मध्ये एक प्रसिद्धीचं वलय तयार झालं . सो हे सगळं तुम्हीच दिलंय ते तुम्ही आणि मी असे पर्यंत टिकून राहावं ही सदिच्छा !!

© संतोष टाकळे

कर्मवीर दादांची आदिवासी आश्रमशाळा.........!




दापोली पासून २२ किलोमीटरवर असलेल्या असोंड सारख्या निसर्ग रम्य ठिकाणी या वर्षा अखेरच्या वीकचा शेवट झाला . मुंबईत गेली ६ महिने कार्यरत असलेल्या Social Commitment Team ने इथल्या आदिवासी आश्रम शाळेत नवीन वर्षांची सुरवात सामाजिक कार्याने केली. कुणाल कदम , प्रकाश म्हात्रे , दीपा चव्हाण , डॉ शिरीष घाडी , स्मिता पाटील , अक्षय दातार , रवींद्र गायकवाड या तरुणांचा यात सहभाग होता .विविध क्षेत्रात कार्यरत असलेलेली हि मंडळी एकत्र आली आणि त्यांनी इथल्या भटक्या विमुक्त आदिवासी मुलांसोबत रमली त्यांच्यात मिसळली आणि काही काळ इथल्या वातावरणात एकरूप झाली . टाळ्यांच्या कडकडाट करीत आमचं स्वागत करण्यात आलं मुलींनी स्वागत गीत म्हणत कार्यक्रमाची सुरमय सुरवात केली . तब्बल ३ तास आम्ही सगळे इथल्या मुलांसोबत होतो.कर्मवीर दादां इदाते यांनी उभ्या केलेल्या या आश्रमात दापोलीच्या खेड्या पाड्यातून आलेल्या आणि शिक्षण घेण्याची तीव्र इच्छा असणाऱ्या प्रत्येकाचं स्वागत आहे. 

अतिशय खडतर डोंगरात दादांनी वसवलेल्या या विद्यासंकुलात शिक्षण घेणाऱ्या विध्यार्थानी श्रमदानातून इथे तब्बल १०० काजू ,५० एक चिकू ,नारळ, आंबा अशी फळबाग तर २०० एक शे झाडाचं मेडीसीन गार्डन तयार केलं आहे. एक कुटुंब असणारं हि आश्रमशाळा अविरत चालू असली तरी ती सक्षमपणे चालवणं तितकंसं सोपं नाहि. लाखाच्या घरात जाणारा वार्षिक खर्च आणि तुटपुंज मिळणारं सरकारी अनुदान सगळंच अलबेल आहे. पण काही समाजसेवी हितचिंतक मंडळी पडती वेळ निभावून नेतात आणि पुन्हा नवी सुरवात करून देतात.

रस्त्यावर काम करणाऱ्या लामांनी समाजाच्या भटकणाऱ्या मुलांनी इथ शिक्षणाचा श्रीगणेशा सुरु केलाय. मुळची निपानीची कोमल या आश्रम शाळेत आली आणि तिचं वणवण भटकणं थांबलं . रस्त्यावर दिवसभर खेळणाऱ्या मुलांना फळ्यावरची अक्षरं खुणावू लागली आणि जी कोमल नीटशी मराठी बोलू शकत नव्हती तीच आज मराठीच्या पहिली इयत्तेच्या सगळ्या कविता एका दमात म्हणते . तिच्या आयुष्यात उगवलेली हि नवी पहाट अशा अनेकांच्या आयुष्यात उजाडू शकते गरज आहे . ती तुमच्या आमच्या पाठबळाची 

आपण केव्हाही या आश्रमशाळेला भेट देवू शकता इथल्या परिसरात तुम्हाला एक वेगळंपण दिसेल मला खात्री आहे तुमच्या एका भेटी नंतर तुम्ही या प्रकल्पात सहभागी व्हाल .नुसतं सर्वशिक्षा अभियान किवा पढेगा इंडिया तोही बढेगा इंडिया म्हणून भागणार नाहि तर आपलं योगदान इथे अपेक्षित आहे.

Social Commitment Team ने मदतीचा हात पुढे केलाय.आपणा सर्वांच सहकार्य अपेक्षित आहे. तुम्हाला शक्य असल्यास जरूर मदत करा .


अधिक माहिती आणि तुमच्या मदतीचा धनादेश किंवा online transfer साठी संपर्क

डॉ शिरीष घाडी /प्रकाश म्हात्रे / संतोष टाकळे 

9930051552/ 9819101186/9167694922

हार्ट ऑफ द सिटी - पुणे..........!



पुण्यात जायला काही निमीत्त लागत नाही. पुणं तसही माझं फेवरेट destination ………….पण हि ट्रीप लक्षात राहिली ती मंगला भोईर या फेसबुक मैत्रिणीच्या भेटीनं. माझ्या आईच्या वयाच्या या अवलिया मैत्रिणीशी गप्पा रंगल्या आणि ३ तास उलटून गेले तरी आवरत घेता येईना. खूप दिवसांनी गप्पांचा फड रंगला होता.त्या बद्दल थोडसं …………….

पुण्यातल्या हार्ट ऑफ द सिटी अर्थात टिळक रोड वरच्या मंगला ताईंच्या गार्डन टेरेसच्या फ्लाट (flat ) चा शोध मी आणि सुपेकर ( पुणेकरी मित्र ) घेत असतांना पुणेकर दत्त म्हणून धावून आले आणि एकदाचं ते ठिकाण सापडलं …………… लिफ्ट नसलेल्या ५ मजली इमारतीचे जिने चढताना चांगलीच धाप लागली . दारावर मंगला भोईर ची पाटी दिसली आणि एस घावलं बाबा एकदानी सुपेकरची लातुरी प्रतिक्रिया अगदी माझ्या कोकणी प्रतिक्रियेशी मिळती जुळती अशीच …………… ताईनी स्वतः दार उघडत स्वागत केल . घर अत्यंत नेटकं मुला माणसांनी भरलेलं आणि महत्वाचं म्हणजे उत्साही - आनंदी …………… अवनी आणि नील या ताईच्या नातवांशी लगेच गट्टी जमली . ताईंच्या नेव्ही ऑफिसर मुलानेहि अगत्य दाखवत विचारपूस केली …………. राजकीय- सामाजिक -फेसबुकिंग आणि इतर विषयावर महाचर्चा सुरु असतानाच पुण्यातली प्रसिद्ध खमंग कचोरी तितकीच क्लास तिच्या सोबतची आंबट गोड चटणी , मंगला ताईंनी स्वतः बनवलेला उत्तम शिरा यांच्या गच्च भरलेल्या प्लेट समोर येऊन धडकल्या आणि इतकं सगळं आवरतय इतक्यात मंगला ताईंच्या मानस कन्या संगीता ताई यांनी फक्कड बनविलेला एकच नंबरचा वाफळता चहा आलाच ………अहा संध्याकाळ मावळून काळीशार झालेली असतानाच हि सुखद वेळ सरूच नये अस आज कइक वर्षांनी वाटत होतं. मन गुतलं होतं इथल्या माणसांत हिरव्यागार फुला- झाडात. मंद गंधाळनाऱ्या रातराणीत शिवाय टेरेस गार्डनच्या झोपाळ्यावर झोका देत राहावं अजून काहीवेळ ………आपलंसं करणाऱ्या या माहोलात मंगला ताईंनी उलगडलेला त्यांचा जीवनपट झरझर डोळ्यासमोरून ओझरता सरला आणि पहिल्याच भेटीत ताईंनी दाखवलेला मोकळेपणा अधिक मनाला भावाला …………पण शेवटी येणारी वेळ जाण्यासाठीच येत असते . इच्छा नसतानाही त्यांचा निरोप घेणं अपरिहार्य होतं . निघतांना ताईनी दिलेला गुलकंद गुलाब आणि रातराणीच्या टपोऱ्या फुलांचा झुबका स्वीकारतांना त्या फेसबुक बनवणाऱ्या mark zuckerberg ची प्रकर्षाने आठवण झाली .त्याचे कित्ती आभार मानावे तितके थोडेच FB निव्वळ time pass साठी बनवलेल्या या नेट चक्रात मला भेटलेली अशी अनेक अव्वल माणसं priceless म्हणावी लागतील.

दरम्यान अमोल सुपेकर या लातूरकर मित्राने आणि त्याच्या मंगेश कुलकर्णी , सचिन , आणि इतर ग्रुपने रंगवलेला वीक इंड आणि एकंदरीत केलेला पाहुणचार , घनश्याम सर -हेमांगी दी आणि प्रिया हिंगे बाईची चुकलेली भेट. PMT या अतिशय टुकार public transport ने केलेला प्रवास . पत्ता शोधताना भेटलेले काही विक्षिप्त पुणेकर या सगळ्या गोड तिखट आठवणी pack करून शिवनेरी पकडली आणि पुणं सोडलं ते पुन्हा कधी करू प्लान याचा झोल मांडत असतानाच ………………. express वे चा टोल कधी सरला कोण जाणे जाग आली ती दादर लास्ट stop अशा धमकी वजा सूचनात्मक अलर्ट देणाऱ्या शिवनेरीच्या चालकाच्या आरोळीने ………. ! 

@ संतोष

राज 'योगी साहित्य संमेलन................ !

८७ व्या साहित्य संमेलनाच्या समारोपाच सर्वपक्षीय "सूप " राजकीय नेते आणी स्थानिक पुढारी पाखडीत असतांनाच . आमचे साहेबही साहित्यिकच आहेत अशी घोषणा करीत . एका जेष्ठ पुढारी बाईंनी जमलेल्या सगळ्याच शब्द रसिकांना गोंधळात टाकल . व्यासपीठावर हे जाहीर करताच साहित्य म्हणजे काय रे भाऊ असा संभ्रम असलेल्या कार्यकर्त्यांनी मात्र जोरदार टाळ्या पिटल्या आणी लगेच साहेबांशेजारी बसलेल्या माधवी आजींनी साहेबांच्या कानात पुटपुटत असतांनाची पोझ देत वृत्तपात्रांच्या फोटोग्राफरना उद्याच्या अंकाच्या फ्रंट पेज फोटोची व्यवस्था केली . आम्ही राजकीय पक्षाचे प्रतिनिधी म्हणून नाही तर साहित्य प्रेमी म्हणून इथे आलोय अस म्हणणारे आदरणीय पाहुणे माईक मिळताच मी सांस्कृतिक मंत्री असतना……… हा निर्णय घेतला मी अमुक केलं आणी तमुक करीन ह्या घोषणा करायला मात्र विसरले नाहीत पत्रकार कक्षातून याची डोळा हे पाहतांना अतिव कीव येत होती. पण तसही आपण "आम " वाले फक्त बोलघेवडे आहोत हे तर आता सिद्धच झालंय .

संमेलनाबद्दल सविस्तर लेख लवकरच …………. !

© संतोष टाकळे

नहि रहा वो राज …………!



महाराष्ट्रात नांगी टाकणाऱ्या नेतृत्वात हि एकमेव असामी आहे . पण सध्या ते फक्त बोलतात करीत काहीच नाही हा समज सर्व सामान्य माणसात पसरत चाललाय शिवाय आज मनसे कार्यकर्ते देखील त्यांच्या अशा वागण्याने नाराज आहेत . तोड फोड झालीच पाहिजे हे गरजेचं नाही पण आंदोलन तडीस नेण्यासाठी तो टेम्पो टिकून राहिला पाहिजे अन्यथा बंद म्हणजे बंद अशी कडक हाक मारूनही कुणी धूप घालणार नाही . आज ज्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झालेत त्यात ते या पुढे आपसूकच अडकत जातील . याची जबाबदारी घेणार कोण ? .

मुळात आम्ही सगळेच या महाराष्ट्राचा आणि पर्यायी देशाचा सर्वांगीण विकास या मूळ मुद्यावर कुणाचीही सोबत द्यायला तयार आहोत. पण सर्वसामान्यांना वेठीस धरून आल्या दिवस हरएक राजकीय पक्ष अशी आंदोलन करणार असतील तर आम्ही नेमकं करावं काय ? ……… तोडल्या येस्ट्या- फोडली दुकानं - जाळंला टोल आम्ही हा लाहिव तमाशा २४*७ चालणाऱ्या वृत्त वाहिन्यांवर बघत राहतो. दिवसभराच्या या घटनेवर आधारित मनोरंजक महाचर्चा देखील आम्ही चवीनं पाहतो. दिवस संपतो आणि पुन्हा नवीन काहीतरी सुरु होतं किमान आता तरी हे थांबायला हवंय …… सध्या मार्केट टाईट आहे . रोजगाराचा प्रश्न तसाही यक्ष खडा आहे . रोज किमान दोन -चार बलात्काराच्या बातम्या ठरलेल्याच. खड्यातले रस्ते - हंडा भर पाण्यासाठीची राडारड -बिलाच्या आकड्याने झटका देणारी महागडी वीज , दलालांच्या बोलीत अडकलेला शेतकरी , सरकारी कार्यालात वाढलेलं चहा पाण्याचं प्रमाण , बाजारू शिक्षण -खालावलेलं आरोग्य या आणि अशा अनेक इतर सोयी सुविधा आणि व्यवस्थेची बोंब आहेच . पण तरीही राज यांचा फक्त टोल आणि झोल मधला इंटरेस्ट खटकणारा आहे . एक हाती सत्ता माझ्याकडे द्या बघा मी एक ऐकाला वठणीवर आणतो म्हणणाऱ्या ठाकरेंना त्यांच्या पदाधीकाऱ्याना दावणीला बांधता आलं नाही .नाशिकच्या निमित्ताने करून दाखवलं म्हणता येणारी संधी त्यांनी सफ़शेल गमावली. या टीम ने काय होत नाही मग दुसरी टीम तयार आहे अस म्हणायची वेळ साहेबांच्या शिलेदारांनीच आणली हे खरं आहे ना ?

तसही राजकीय गणित नेमकी कशी आणि कोण सोडवेल याचा नेम नाही पण सर्वसामान्य नागरिक यात भरडला जातोय त्याचं काय ? बरं यावर उपाय म्हणून आम्ही आम आदमी नामक झाडू बाजारात आणला तर तोही भलत्याचच झाडण्यात गुंतला आहे . अण्णा जी & जगप्रसिद्ध आंदोलनकार केजरीवाल दिल्लीकर यांनी जनतेला जे नारळ वाटलेत त्या रोषाने आम्ही निवणुकीच्या रिंगणात उतरतो म्हटलं तर लोक आता आम्हाला दारात उभ करणार नाहीत सगळी कडून आमची फसवणूक होतीये राव . बाकी तुमचं चालू राहूद्या जय हो !

© संतोष टाकळे

दिवाळीच्या आठवणी............!



टेलीव्हिजनवर सध्या सुरु असलेल्या एका साबणाच्या जाहिरातीने २० ऐक वर्षांपूर्वीच्या त्या दिवाळीच्या आठवणी पुन्हा नव्याने ताज्या केल्या. आणी ती दिवाळी मला जशीच्या तशी आठवली ………………पहाटे ३ च्या पहरी उठून. पहिल्या आंघोळीचा (अभ्यंग स्हान ) नंबर लागावा म्हणून आम्हा भावंडात स्पर्धा लागत असे कोण पाहिलं उठून अंघोळ करतंय आणी अंगणात सुतळी बॉम लावून दिवाळीची सुरुवात करणार यात च
. ढाओढ असायची. दिवाळीच्या पहाटेचा माहोल सुगंधी उटण्याने अधिक मोहक होत असे . बोचणाऱ्या थंडीत चुलीवर तापणार पाणी , पाट्यावर वाटलेला ओल्या खोबऱ्याचा रस , न्हाणी घरात लावलेला मिणमिणता दिवा , माजघरात धावती रांगोळी काढून त्यावर मांडलेला पाट , आईने अंगाला घसघसून लावलेलं ऊटण , निरांजनाची ओवाळ आरती . त्या अपार थंडीत हे सगळे सोपस्कार पार पडेपर्यंत गारठून न्हाणी घरात धावत जात अंगावर ओतलेला गरम -गरम पाण्याचा भरला तांब्या, खास पहिल्या अंघोळीसाठी आणलेल्या महागड्या साबणाचा तो मलमली फेस आणी त्याच्या उंची सुवासात अंगभर पसरलेला तजेला अक्षरशः ओतू जात असे . आणि मग उजव्या पायाच्या अंगठ्याने कारेटा फोडून कधी एकदा फटाके वाजवायला अंगणात जातोय असं होई. त्या कळात आत्ता सारखे उंची कपडे घालण्याचा सोस आम्हाला न परवडणारा होता. काहीतरी नवीन घालावं म्हणून मला sando banyan , बहिणींना गाऊन, बाबांना टॉवेल आणी स्वतः आईला एखादा ब्लावूज पीस इतकीच काय ती कपड्यांची खरेदी . …………………… आज अंगावर ब्रान्डेड कपडे घालतांना जितका आनंद मनात दाटतो त्यापेक्षा कईक पटीचं समाधान आईने आणलेल्या त्या sando banyan मध्ये अनुभवता येई. दारातल्या त्या मोजक्या चार पणत्यांचा लखलखाट आजच्या भरगच्च पणत्यांची रोषणाई दिपवून टाकणारा होता. बाबांनी शंबर- दीडशे रुपयात दोन पिशव्या भरून आलेले फटाके वाटून घेतांना झालेली वादावादी आणी मग अर्चू ताईने मध्यस्थी करत . तिच्या वाटणीचे दोन चक्र , दोन पाऊस आणी वर एक फुलबाजाचा बॉक्स माझ्या वाट्यात घातला कि मी काय खुश होत असे माझ्याकडे जास्ती फटाके आल्याचा हर्शील तरंग सरसर करीत उंच जाणाऱ्या मोर छाप पावसा प्रमाणे दिवाळीभर जाई.हेच फाटके तुळशीच्या लग्नापर्यंत पुरावे म्हणून अगदी लवंगी बारची माळ सोडवून त्यातला एक एक फटाका मोकळा करून वाजवायचा. फुसक्या निगलेल्या फटक्यांना उन्हात तापवून पुन्हा त्यांना वाजवी करणं अशा ऐक ना अनेक युक्त्या काढत आम्ही फाटकेबाजी करत असू.
फराळाच म्हणाल तर आईने घरात केलेल्या चकल्या , करंज्या , लाडू ,आणी चिवड्याने भरलेले लक्ख घासलेले पितळी डबे स्वयंपाक घरातल्या फळीवर ओळीने मांडून ठेवलेले असत. नेमक्या याच दिवसात शेतीची कापणीच्या कामांची लगबग असे दिवसा शेतात राबूनही ती एक हाती रात्री उशिरा जागून त्या दिवशी ठरलेला पदार्थ पूर्ण करी सणासुदीच्या दिवसात माझ्या पोरांना लोकांच्या तोंडाकडे बघत बसावं लागू नये हा तिचा त्यामागचा उद्देश …………. ! गेल्यावर्षी मी फराळ विकत आणला तेंव्हा ती म्हणाली विकतच्या फराळात घरगुती गोडवा नसतो रे …………. पण ना इलाज म्हणून तिनं ताट भरलं .चवीला असूनही त्या विकतच्या फराळात आईच्या हातचा रुचकरपणा मात्र नव्हता.…………………… दिवाळीतला आणखी एक महत्वाचा दिवस तो म्हणजे भाऊबीज मला एकूण ५ बहिणी त्याकाळात यावेळी गृहपयोगी वस्तू घेण्याची पद्धत होती. नेमक काय घ्यायचं हे आई ठरवी. ………. यांस कडून ………यांस भाऊबीज सप्रेम भेट. अशी नावं घातलेली पाण्याची टाकी, मांडणी, परात , ग्लास, ताटं, डिश , वाट्या अशी भांडी ,यातली कोणतीही वस्तू आजही कधी नजरेत आली तर तेंव्हाचे ते क्षण सस्निल आठवतात. ………… काळानुसार त्या त्यांच्या सासरी गेल्या आणि आम्हा भावंडांनी भरलेलं घर काहीसं सुनं झालं. प्रत्येक सणाला त्या सगळ्यां भेटतीलच अस नाही. पण त्यांचा नुसता फोन आला तरी बरं वाटतं. technology मुळे निदान हि सोय उपलब्ध झालीये.शेवटी वेळ आणि माणसाचं आयुष्य कायम बदलत असत. .पण आठवणी कधीच न बदलणाऱ्या असतात.

शेवटी रांगोळीत जितके ठिपके तितकी ती कठीण आपलं जगणंहि अश्याच असंख्य ठिपक्यांनी विभागालय गरज आहे. यांना जोडणाऱ्या नात्यांच्या आणि मैत्रीच्या अंधुक रेश्यांची बाकी रंग तर आपसूकच भरले जातील नाही का ?
तुम्हा सर्वांना दिवाळीच्या मनस्वी हार्दिक शुभेच्छा !! शुभ दिपावली !!