कोणता नारायण खटकतोय ?



येवू घातलेल्या महाराष्ट्र १ या वृत्त वाहिनीचा सत्यनारायण सध्या जास्तीच फार्मात आहे . अनेकजण याची यथासांग वेगळी कथा ऐकवीत आहेत . पुरोगामी विचारांची नौका बुडाली वैगरे अशी चर्चा सोशल नेटवर्किंग वर उफाळतेय .या सगळ्यात वागळे आणि Yuvraj Mohite यांच्या नावाच जे धूप घालून सूप वाजवलं जातंय त्या बद्दल आणि विशेष: युवराज सरां बद्दल बोलायचं झाल्यास त्यांनी कधीच ज्यांची देवावर आस्था आहे किंवा जे आस्तिक आहेत त्यांना उपदेशाचे डोस पाजले नाहीत . पण तरीही जे त्यांना खटकलं ते मला असं वाटतंय तू बघ विचार करून इतक्या सरळ भाषेत त्यांनी समोरच्याला सांगीतल्याच. अनेकजण मान्य करतील .....गेली काही वर्ष त्यांना प्रत्यक्ष ओळखतोय त्यांचा आपल्या कोकणातल्या घरी ( जिथे अति प्युअर अध्यात्मिक वातावरण आहे ) स्वतःच्या घरासारखा वावर आहे . म्हणून इतक्या वर्षात त्यांनी कधीच तुम्ही हा फोटो का लावलात अमक्याचा तमका संधर्भ आहे वैगरे वैगरे असली वायफळ चर्चा किंवा विरोध केला नाही . त्यांच्या मते व्यक्ती स्वातंत्र प्रत्येकाला आहे .फक्त त्याचा अतिरेक होता कामा नये . आता जर भांडवलदार आस्तिक असेल आणि त्यांनी घातली असेल पूजा तर काय बिघडल तो त्या गुंतवणूक दाराचा वैयक्तिक प्रश्न आहे त्याला वागळे -मोहिते यांचे चश्मे घालण्याची आपली जबरदस्ती का ?
तसहि सम्यक पुरोगामी विचावंतांच्या गर्दीत संजय आवटे , प्रा हरी नरके , दीपक पवार , कविता महाजन, मुग्धा कर्णिक आणि असे काही मोजके चेहरे आकसा पोटी कधीच व्यक्त होत नाहीत त्यांनी मांडलेल मत हे बऱ्याच विचारांती आलेलं असतं आणि म्हणून अजूनही काहीसं आश्वासक वातावरण आहे अस म्हणायला वाव आहे . बाकी लॉबिंग , सेटिंग आणि सेल्फिश नेट्वर्किंग करणाऱ्या थोतांड विचारवंतांच्या बाजारा बद्दल न बोललेच बरं .
यांच्यातले काहीजण ज्या पद्धतीने अंगावर येतात त्यांना शिंगावर घ्याव की ××××वर हेच कळत नाही अनेकदा.
त्यामुळे नेमका कोणता नारायण आपल्याला खटकतोय हे आधी स्पष्ट केल पहिजे. नुसते लोकं घालतात म्हणून आपणही तुळशी पत्र ठेवत गेलो तर आपल्या द्वेषाची कलावती शुद्धित येण कठिण आहे .

गणपती बघायला जायचा उत्साह .................!


मुंबईत नविन होतो तेंव्हा हौसेने गणपती बघायला जायचा उत्साह दांडगा होता .लालबाग परळ विभागातले सगळेच महत्वाचे उंच च्या उंच गणपती रात्री उशीरा पर्यंत बघतानां गम्मत वाटे........ तेंव्हा तर मी अतिशय श्रद्धाळु अगदी नतमस्तक होणारा वैगरे .......आता तसल काही राहील नाही. कधी वाटलच तर सकाळी लवकर उठून पायी चालत जातो प्रभादेवीच्या सिद्धिविनायकाला सकाळच्या प्रसन्न वातावरणात अनवाणी चालतांना अजूनही जमिनिशी नातं कायम असल्याची जाणीव होते.रस्ता तसा शांत असतो त्यामुळे डोक्यात अनेक गोष्टी नव्याने विचारात घेता येतात. पहाटेचा लोकांचा दिनक्रम ....फुटपाथवर राहणारी माणस त्यांच्या मनाने आपण घरात राहणारे किती सुखी आहोत .आपल्या जगण्यातल्या असंक्य तक्रारींचा डोंगर कोसळून पडतो अशा वेळी

तर मूळ विषय असा की आज कित्तेक वर्षानी मुंबईच्या मंडळांचा आढावा घेण्यासाठी ऑफिशली ड्यूटी लागली आणि गिरगाव ग्रांट रोड च्या एकुण 10 मंडळांच्या गणेशाच कार्यालयीन कामकाजाच्या निमित्ताने दर्शन झाल यातले कित्येक गणपती आज पहिल्यांदा पाहिले आणि वाटल अजूनही काही ठिकाणी निखळ उत्सव सुरु आहे. तो चाळीच्या मधल्या पटांगणात बसलेला गणपती ....अतिशय मोजक डेकोरेशन ......नेटक्या साड्या ल्यालेल्या चाळीतल्या वाहिनी -काकू -आणि अगदी आज्जीच लायीत वाजनार सात्विक भजन आणि सर्वात विशेष म्हणजे आगत्याने होणार तुमच स्वागत .....आता आम्ही जाहिरात दिलीय म्हणून महागड्या गाडीतून उतरल्या उतरल्या आमचा विशेष गौरव् वैगरे करण असल काही झाल नाही .आणि मुळात मला ते पटतही नाही आम्ही जाहिरात देतो म्हणजे आम्हाला आमच्या प्रोडक्टला मार्केट करायचय हा आमचा निव्वळ स्वार्थ आहे .त्यात विशेष सन्मान स्विकारण्या सारख काही नाहीच.

पण या निमित्ताने मात्र एक संगावस वाटतंय की अख्या मुंबईत फक्त लालबागचा राजा , तो सावुथवाल्यांचा माटुंग्याचा श्रीमंत गणपती , आणि असे नेमके नवसे गणपती बसलेले नसुन इतर चिखल वाडीचा ,तुलसी वाडीचा , नाना चौकातला गिरगावकरांचा,ग्रांट रोड वाल्यांचा असे अनेक पारंपरिक बाज असलेले गणराय विराजमान झालेत याची आपल्या तमाम मागणी खोर भाविकांनी नोंद घ्या नवसाचे दाग दागिने.,पेढ़े नारळ या करोड़पति गणपतीनां वाटून झाले असतील तर जरा वाट वाकड़ी करत या बाकीच्या गणेशांच दर्शनहि घ्या.... थोड़ अधिक समाधान वाढेल तुमच्या नवसीमय काळजात.

© संतोष टाकळे .



गणेश उत्सव @ कोकण


कोकणात अंधारूंन पाऊस पड़तोय .......वातावरणात गारवा आहे .अशा पावसाळी दुपारी गणेश उत्सवाच्या स्वागताच्या धामधुमीचे ढोल -ताशे आताशी कुठे विसावलेत. ........साग्र मंत्रोत पूजाअर्चा -आरत्या श्लोक आणि तदद् नंतर बाप्पाला त्याच्या फेवरेट मोदकां समवेत पंच पक्ववान्नाचा नैवेद्य दाखवून झालाय . आणि आता तो ही काहीसा सुस्तावलाय............सकाळ पासून अधे मधे लुड़बुड करणारी चिल्लर पार्टी मोदकाचे अतिजड़ घास ढकलुन पेंगलियत .....पानाचे चोबरे भरून पुण्या-मुंबईचे हालहवाल चर्चिणारे ओटी- पडवीत जागा मिळेल तिथे लांब झालेत................... पहाटे पासून उत्सवी मोहिमेवर राबणाऱ्या बायाही काहीवेळ कलंडल्यात ...... आरासातील प्रखर दिवे मालवित फ़क्त मंद समईच्या प्रकाशात ........अगरबत्तीच्या धुरट रेघा धुमसता आहेत.......बाहेर पावसाचा जोर कायम आहे. कोकणातल्या कौलारु घरात आता पुढचे पाच दिवस अशी वर्दळ ....शांतता आणि पुन्हा धावपळ हा सिलसिला चालूच असेल . फक्त रविवारी मिळणारी उसंत आज मधल्याच दिवशी अनुभवण हे वेगळच सुख
गणेश उत्सवाच्या शुभेछ्या .....!



हा निषेधाचा कोणता प्रकार .......!


हा हेकेखोरपणा आहे शिवाय आम्हीच बरोरबर हा समज अधिक वाढवत आपण या वादात जास्ती तेल घालण्याचा काम करतोय . आणि विषय अधिक ज्वलंत करतोय . हे मनसैनिक आणि स्वतःला पुरोगामी विचारवंत समजणांऱ्याना पटणार नाही मुळात जैन समाजातही दोन गट आहेत त्यातला एक गट जो सत्ता , पैसा आणि राजकीय हितसबंध यांच्या जोरावर अतिरेक करत मुजोरी करतोय. तर दूसरा गट म्हणतोय आपण नाही ना non veg खात अहिंसा करत मग इतरांनी ती करू नए असा आग्रह किंवा जबरदस्ती कशाला.आपल्या धर्मानुसार आपण वागू त्यांना करुद्यात् त्यांच्या नुसार ......
मनसे बद्दल -
मनसेच झालय अस की यांच्या थिंक टँक मधे गड़बड़ आहे . यांच्या नेत्यांन मधे एकमत नाही.कार्यकर्ते आंधळे पणाने आक्रामक होतात. शिवसेनेच्या जुन्या कँपची ट्रेनिंग अजुन उपग्रेड झालीच नाहिये आणि म्हणून साहेबांनी आदेश द्यायची खोटी यांची राज -सेना आक्रमण करीत पुढे सरते मग याचे काय परिणाम होतील याची खंत नाही. किंवा चूक केली अस कबूलही करायचं नाही . खरतर मनसेने आता कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर लावण्याची गरज आहे ज्यात यांच्या कार्यकर्त्यांच थोडं ग्रुमिंग करता येईल . वाद म्हणजे काय प्रतिवाद कसा असतो. नैतिक लढाई कशी असते . दादागिरी न करताहि प्रश्न सुटू शकतात . तोड फोड म्हणजेच आंदोलन हि संकल्पना कशी चुकीची आहे . सध्या महत्वाचे मुद्दे कोणते ते कसे हाताळावे इत्यादी इत्यादी . कारण नाहीतर मनसेची दिखाऊ आंदोलक - गुंडगिरी सेना अशी ओळख अधिक गडद होत जाईल आणि याचा नक्की काय परिणाम होतो ते गेल्या निवडणुकीत अख्या महाराष्ट्रात फक्त एक आमदार निवडणून येतो यावरून सिद्ध झालेच आहे .
राज ठाकरें बद्दल-
यांच्या सारखा आक्रामक नेता महाराष्ट्रात असायलाच पाहिजे यात दुमत नाहीच फक्त आता त्यांनी त्यांची रणनीती रिसेट करण्याची गरज आहे. तस बघायला गेलं तर आजही वेळ गेलेली नाही अजूनही ते मराठी माणसाच एकमत करीत मतपेटी गच्च भरू शकतात त्यांच्यात ती ताकद आहे . पण त्यांच्या "उचल मुद्दे सोड" ची पद्धत आधी बंद केली पाहिजे .मराठी पाट्या ,नाशिक मधल काही मोजकं काम त्यांच थेट मनाला भिडणारं भाषण , मराठी माणसा बद्दल ची तळमळ असे अनेक जमेचे मुद्दे त्यांच्याकडे आहेत बस अभी थोड़ा फुक फुक के कदम रखनेकी जरुरत है ......भविष्यात जर का राज ठकारे हे कार्ड चाललं तर अनेकांना ते महागात पडेल असा भाकीत राजकीय विश्लेषक करतायत त्यात नक्कीच पॉईंट आहे. .
ताक -- ज्या ठिकाणी मनसेचे आंदोलन झाले ते मंदीराचे ठिकाण नसुन एक शाळेचे ठिकाण आहे तसेच या फोटोमध्ये सांगीतल्याप्रमाणे हे आंदोलन दादर मध्ये केले गेले नसुन ठाण्यात झाले आहे. याला उपाश्रय म्हणतात जैन धर्मं गुरु इथे थांबतात. जैन समाजात हे ठिकाण मंदिरा इतकंच पवित्र समजलं जातं.
सध्या फेसबुकवर वायरल होत असलेला एका मराठी वृत्तपत्राच्या फोटो क्याप्शन मध्ये ठिकाणाची गफलत झाली आहे. पण याचा अर्थ हे आंदोलन झालंच नाही आणि हा फोटो खोटा आहे असा दावा करण योग्य ठरणार नाही . इतकं होऊनही मनसे थांबली नाही त्यांनी कालच एका गुजराथी सोसायटी समोर श्रावण संपल्याची बिर्याणी पार्टी केली . याला वाद चिघळवणे कि आपली राजकीय डाळ शिजवणे हे आता आपले सुजाण नागरिक ठरवतील कारण अशा राजकीय पार्ट्या आणि त्यांच्या उमेदवारांना मतदान करण्याचा अधिकार घटनेने यांना दिलाय अर्थात मनसे - शिवसेना यांनी कितीही ह्याचं भांडवल केलं तरी यांच्या भूमिका किती संधी साधू आहेत हे आताशी लोकांनी चांगलंच जाणलंय हे लक्षात असूद्यात.
* अशी एका कोणत्याही समाजाची वाढणारी सक्तीची मुजोरी मोडून काढायलाच हवी पण त्याकरिता आपली ताकद एकवटली पाहिजे हे अस एक एका फौजा घेऊन लढाया करता येत नाहीत हे आपल्या इतिहासात स्पष्ट लिहिलेलं वाचण्यात आलच असेल आपल्या सारख्या अभ्यासकांच्या.
© संतोष टाकळे .

क्यालेंडर वाला गणपती ......!


जून महिना संपत आला कि माळ्यावरून गणपतीचा पाट काढून तो पागोळीत भिजत ठेवायचा सकाळी शाळेत जातांना पागोळीत टाकलेला पाट संध्याकाळी शाळेतून येईसतोवर चांगला धुपून निघालेला असायचा. मग त्याला नारळाच्या किशीने घासून लक्ख करायचा आणि सायकलच्या क्यारीयरला बांधून कुंभारवाड्यात गणपतीच्या कारखान्यात न्यायचा सोबत यंदा गणपती कसा हवाय यासाठी क्यालेंडर वर छापून आलेला एखादा फोटो घेवून जायचा . आंजर्लेकर काका पाटाच्या मागे नंबर टाकून त्याची नोंद त्यांच्या चोपडीत करायचे आणि मग सोबत नेलेला reference फोटो निरखत …………दोन चार दा चष्मा वर खाली करत………………… असा हवाय ………… याची सोंड डावी आहे तिला उजवी करावी लागलं ……………सिंहासन असा नाय होणार हा साच्यान करतात आपण हातानं करताव .असा शेम नाय होनार आधीच सांगतोय . आणि हातात हा त्रिशूल हवाय कि मोदक चाललं ………त्रिशूल पण बनव आपण पण तो लोखंडी देवा लागलं …………आणि कलर पण बदललं ………… हे रंग मातीच्या मूर्तीवर बसत नायत लय म्हागातला कलर हाय. तो उंदीर पण लागल नय …………मी जमवता माझ्या हिशोबान पण बाबास ना सांग यंदा जरा भाव वाढल लय काम हाय ह्या फोटोतला गणपती बनवायचा म्हणजे ……………का मी असा जरासा याच्या सारखा दिसणारा बनव त्याला काय जास्ती पैसं वाढणार नायत ………… बोल लवकर बरीच कामा पडलीत …………………ह्म्म्म बनवा मग याच्या सारखा दिसणारा …………तू कालजी नको करूस कसला बनवतो बघ भारी एकदम …………………पाट सोडून परत पायंडल मारत घरच्या दिशने येतांना उग्गाच मनाला लागून राहायचं आपण मोठ झालो आणि कामाला लागलो कि हवा तसा गणपती बनवून घेऊ आता नको उगाच बाबांना वर शंभर - दोनशे टाकायला. जिन्नसालाच लय पैसे लागतात शिवाय डेकोरेशन, लायटिंग अजून बाकी आहे . नको राहूदे आणू मग जास्ती पैसे आले कि त्या क्यालेंडर सारखा गणपती.
पुढे मग ऑगस्ट महिन्यात शनिवारची शाळा सुटली कि संदीप - अमित सोबत कारखाना गाठायचा ……………काका कुठला आमचा गणपती ……………तोंडाला रुमाल बांधून मूर्तीला पॉलिश करता करता ते बोटांन दखवीत त्या लाईन मध्ये हुबेहूब तसे चार पाच गणपती असत मग त्यातला पाट ओळखत नेमका आपला गणपती शोधून काढायचा त्याला निरखत तितंच घुटमळत राहायचं काहीवेळ ………………… क्यालेंडर वाल्या आणि ह्या पाटावरच्या गणपतीत अगदीच किंचित साम्य तेही आपल्या समाधाना खातर ………मग बनवली कि नाय तुझ्या मना सारखी त्या क्यालेंडरवरच्या गणपतीला मागं काढील अशी मूर्ती हाय का नाय बोल? डोंबल आमच्या चेहऱ्या वरचे बारा वाजलेले पाहून ………………. अरे अजून काम बाकी हाय पुढच्या रविवारी ये तेवा रंगवायला घेणार हाय …………काका अहो फक्त २० दिवस राहिलेत लवकर करा जरा ………त्यावर ते ……………अरे बाबा तुझ्या पेक्षा आम्हाला लय काळजी हाय चला निघा आता .
पुन्हा पुढचा रविवार जाऊन रंग लावून झाला की नाय याची खात्री करुन घ्यायचो आम्ही ....अगदी गणपती बसायच्या आधी डेकोरेशनच सामान आणायला बाजारात गेलो तरी चक्कर टाकायची…………….काका जरा इथ कलर मारा, मोदक अजून जरा पांढरा करा, ह्या मागच्या केसांना रंगच लागला नाय , पितांबराचा काठ अजून सोनेरी पाहिजे होता . इत्यादी इत्यादी ………आंजर्लेकर काका पार वैतागायचे पण मग लावतो बाबा धीर धर नायतर एक कर हे कलर घे आणि तूच फास हवेत तशे.........खरतर त्यांना त्रास दयायचा उद्देश् नासायचा पण यात भारी गंमत होती .
मागच्या वर्षी गणपती आणायला गेलो तेंव्हा आंजर्ले कांकानी विचारल …………………. काय मग आता मोबाईल मधल्या फोटोसारखा गणपती बनवून देऊ काय बोल पुढच्या वर्षी ……………त्यावर फक्त निव्वळ हश्या पिकला त्या आठवनींन वर ………………ते दिवस होतेच वेगळे तेंव्हा वेळ होता पण पैसे नव्हते. आज पैसे आहेत पण वेळ नाही . त्यातही कधी तेंव्हा बाबांनी दिलेले पैसे कमी पडले तर ग़ुपचुप् साठवलेल्या पैशाचा डबा फोडून आणिक साहित्य आणायच ..... एक एक कागद नक्षीदार कापत रात्र रात्र जागुन पताका नक्षत्र माळा लावित आरास करण्याच्या आठवणी आजही तितक्याच ताज्या आहेत. हल्ली कामामुळे गणपतीची तयारी सोडा पण प्राणप्रतिष्ठापना करायाचाहि मुहूर्त गाठता येत नाही .लाहना भाऊ Lavesh Jadhav बाबांच्या मदतीन सगळी आरास करतो......तशी त्याची हौस अजूनही तितकिच दांडगी आहे. म्हणून कुठ आमच्या गणपतीला घरगुती मखरात बसण्याच भाग्य लागतै नाही तर आमच्याकाळात कदाचित ऑर्डर देवून आरास करावी लागेल बहुदा ...... असो
काल जिगरी यार Prasad Yashwant Surve सोबत सेन्ट्रल रेल्वे मैदानात मुंबईकर गणपतीच्या मूर्त्या पाहतांना त्या दिवसांची याद पुन्हा उफाळून आली आणि आनंदा सोबतच मोठ् झाल्यावर ह्याव करू आणि त्याव करू असली फुशार्कि कशी पोटा पाण्यासाठी घर दार सोडून आल्यावर बोम्बालली याची खंतही वाटून राहिली पण जगण्यासाठी पैसा आणि पैशासाठी काम हे गणित तस कोलमडुंन चालणारं नाय...... गड्या तू काय वर्षातून एकदा येतोस बाकि दिवस आमच जोखड़ कोण ओढ़णार बाबा.

© संतोष टाकळे .

उसन्या पुढाऱ्याची गरज नाही..........!


            


ज्या मराठ्यांना साक्षात छत्रपतींच "राजे" पण लाभलंय त्यांना कोणत्याही उसन्या पुढाऱ्याची (हार्दिक पटेल .)गरज नाही . असली हंगामी बेडकं कितीही फुगली तरी मौसम गेला कि त्यांना पुन्हा बिळातच जावं लागतंय ……………आम्हा मराठ्यांचे नेतृत्व करण्यास आम्ही समर्थ आहोत . आणि आरक्षणाची अशी कितीही गाजरं आता संधी साधू पुढे करण्याचा प्रयत्न करीत असले तरी तेच गाजर त्यांच्या XXX घालण्याची हिंमत आणि योग्य समज नव्या तरुण पिढीकडे आली आहे . मुळात आम्ही कधीच अमुक जात तमुक धर्माच्या नावाने कोकलत नाही. त्याबद्दलची सहानभूती मिळवत नाही. आणि शिवाय त्याचं भांडवल करीत स्वतःची पोट भरीत नाही. एक वेळ ते आरक्षण नाही मिळालं तरी चालेल पण लाचार होत कुण्या शेळपटाला आम्ही आमच्या उरावर बसू देणार नाही . 
खरं तर आता आरक्षण हटाव साठी रस्त्यावर उतरण्याची वेळ आलीय . आजोबा - बाबा - पोरगा - नातू आणि आता पणतू ……………… एका एका घरात सात - आठ सरकारी नोकरदार होऊनही जर उद्धार होत नसेल तर हे तुमचं अपयश आहे . ज्यांनी मिळवलं ते पुढे बळकावत राहिले ……………आणि अजूनही ज्यांना सिस्टीम मध्ये येता आलं नाही ते उपेक्षितच राहिले जे समाज प्रबोधनाच्या नावाने बोंब मारतायत त्यांनी या उपेक्षितांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी का? पुढाकार घेतला नाही . कारण यांना स्वतःच्या उपसेगीरीतून उसंतच मिळाली नसावी . किंवा मग सगळेच मुख्य प्रवाहात आले तर मग पुढे कशाचं भांडवल करावं याची भीती वाटली असावी.

आज आरक्षणामुळे जी तफावत समाजात जाणवते आहे . त्यातून जाती द्वेष अधिकच वाढत जाणार आहे . तब्बल ९६ टक्के असूनही जेंव्हा फक्त open म्हणून प्रवेशाची संधी हुकते त्या बुद्धिवंत मेहनती मुलावर झालेला अन्याय ………. अन्याय नसतो का ? पुढे तो निराशेपोटी पुन्हा पुस्तकांशी वैर घेत खच्चून जातो याला आपल्यालेखी काही किंमत नाही का ? आर्थिक परिस्थिती बेताची असतांना फक्त उच्च वर्णीय जात म्हणून शैक्षणीक फी मधली सूट घेता येत नसल्याने शिक्षण अर्धवट सोडावं लागणाऱ्या त्या हजोरो मुलांशी आपली बांधिलकी नाहीच का ? आमचा समाज - आमची जात - आमचा धर्म आणि आमचं आरक्षण याचे ढोल बडवत हि सामाजिक विषमता अजून किती वर्ष भारताच्या संविधानाचा आधार घेत आपण रेटणार आहोत . याच उत्तर द्या आधी …

© संतोष टाकळे .


प्रादेशिक माध्यमांची मो'ड 'की मराठी …………!




हल्ली मेजर मराठी वाहिन्यांवर महत्वाच्या बातम्या देणारे" अ "मराठी वार्ताहर मराठीचा जो "तोडभंग" करता आहेत. तो आता सहन करण्यापलीकडे आहे. मुळात अगदीच चुकीचं व्याकरण ……………त्यातही सर्रास वापरले जाणारे हिंदी आणि इंग्रजी शब्द त्यामुळे हि आपली मराठी नसून परप्रांतीय म्हराटी असावी असा संभ्रम तयार होतोय. जे मराठीचा सार्थ अभिमान असल्याचं अधोरेखित करीत आपलंच च्यानेल किती अस्मिता बाळगून आहे याचा वारंवार दाखला देतात. त्या संपादकांनी तरी किमान याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. अहो नसतील मराठी माणसं तर ती तत्काळ भरा पण असले मोडक्या जिभेचे मराठीचे कंत्राटदार सोसणे कठीण झाले आहे.

आता हेच तुम्ही हिंदी किंवा इंग्लिश वाहिन्यांना तोडकी हिंदी किंवा मोडकी इंग्लिश पुरवून पहा ……… because of language barrier च्या करणा खातर त्याच दिवशी संध्याकाळी हातात मेमो मिळेल . मराठीत मात्र ये सब कुछ चालता है यार …………म्हणीत जे रेटलं जातंय याउलट इतर भाषिक माध्यमात हे अजिबात खपून घेतलं जात नाही. हि आपल्या वरवरच्या आणि त्यांच्या कट्टर भाषा प्रेमातली तफावत आहे. आता यावर तुम्ही talent महत्वाचं भाषा doesn't matter म्हणीत हा मुद्दा खोडून काढणार असाल तर कृपया आपण योगेश दामले ( Ex Reporter NDTV India ) या मराठी पत्रकाराच हिंदी वरच प्रभुत्व पहा . हा पठ्या कुमार - पांडे ना टोटल टफ देऊ शकतो. बाकी हिंदी मध्ये पूजा सामंत , साहिल जोशी , प्रसाद काथे ,तर इंग्लिश मध्ये राजदीप सरदेसाई , योगेश पवार , संतोष आंधळे , कैलास कोरडे , असे बरेच मराठीजन त्यांच्या talent मुळेच आज तिथे स्थिरावलेत.

बाकी आपण ज्या मध्यमासाठी काम करतोय त्या माध्यमाचा लेहजा , त्याची प्रमाण भाषा आणि विश्वासार्हता जपलीच पाहिजे यात शंकाच नाही . आणि इतकी वर्ष या प्रांतात राहून आपण किमान बोलण्या लायक मराठी शिकलो नाही याची "लाज" वाटलीच पाहिजे यात वादच नाही.

© संतोष टाकळे .