कुणाचे भीमराव……… !





उद्या ६ डिसेंबर बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी आलेल्या साधकांची वर्दळ मुंबईभर दिसून येतीये. महाराष्ट्राच्या खेड्या पाड्यातून आलेले हे अनुयायी सध्या मुंबई दर्शन करतांना तुम्हा आम्हाला दिसले असतीलच ट्रेन आणि बस मधले यांचे जत्थे विशेष लक्ष वेधून घेतायत .उठून दिसणारा त्यांचा पेहराव ,त्यांची भाषा आणि एकंदरीत त्यांचं वागणं कडक इस्त्री असलेल्या मुंबईकरांना  नेहमीच खटकत  - ६ डिसेंबर आला कि कशाला येतात हे बाबा वाले मुंबईत . हा बहुचर्चित सवाल  . आज पुन्हा एका सहप्रवाशांनी केला. आणि मलाही पडलेल्या या प्रश्नाचा शोध पुन्हा एकदा सुरु झाला. ८ ते ९ जणांच्या ग्रुप मधल्या एका active तरुणाशी बोलायचं ठरवलं आणि सुरवात झालीही नाव -गाव आणि इतर चर्चा करता -करता अपेक्षित प्रश्न पुढे सारत मी मोकळा झालो . बुलढाण्याहून आलेल्या धर्मराज ने दिलेलं उत्तर - साहेब तुम्ही कोणत्या समाजाचे मला माहित नाही. पण हा प्रश्न कधी तुम्ही पंढरपुरला जाणाऱ्या वारकऱ्याला  इचारलाय . ? नसलच इचारला मग का म्हणून आमी या प्रश्नाचं उत्तर दिल पाहिजेल . त्याच्या सोबतच्या इतर पोरांनी भाऊ एव्हडा का तापलाय म्हणून माना फिरवल्या . आणि धर्मराजच्या चढ्या आवाजाने इतर प्रवाशांनीहि आमच्याकडे कटाक्ष टाकला . काहीवेळ तो खूप बोलत राहिला माझ्या प्रश्नाला तो इतका भडक प्रतिसाद देणार याची कल्पना होतीच मला अपेक्षित असलेलं उत्तर त्यानं दिलं नाही याचं मला अजिबात वाईट वाटलं नाही . पण बाबासाहेबांच्या विचाराने भारावलेल्या या समाजतल्या कित्तेक तरुणांना मी असंच बेभान होऊन बोलतांना पाहिलंय मुळात मी समाज वेगरे मनात नाही .  माणुसकीचा धर्म आणि हितवादी विचारांची जात अधिक महत्वाची आहे माझ्यासाठी .धर्मराज आमचे बाबासाहेब ,आमचा समाज,आमच्यावरचे अन्याय अशा अनुषंगाने खूप बोलला पण त्याचा बोलघेवडेपणा अधिक काळ टिकला नाही . "तुमचे बाबासाहेब ते आमचे कोण" ? या प्रश्नाला तो गोंधळाला ओढाताण करूनही त्याला यावर प्रतिवाद करता येईना. मुळात आमचे - तुमचे अशी आपण महापुरुषांची  विभागणी करूच कशी शकतो. ज्यांनी जातीपातीच्या भिंती पडल्या आणि समतेचा संदेश दिला त्या राष्ट्रीय संताना आपण समाज आणि जातीच्या कुंपणात का अडकवलय. अरबी समुद्रात शिवाजी महाराजांच स्मारक बांधताय मग इंदू मिलच्या जागेवर बाबा साहेबाचं स्मारक झालंच पाहिजे या भावनिक मागणीवर संधी साधूपणा करणाऱ्या नेत्यांना  आपण का ?  मोठं करतोय.  महाराज आणि डॉ आंबेडकर याचं स्मारक बांधून नवी दुकानदारी सुरु करण्यापेक्षा हा निधी महाराजांच्या असलेल्या गड - किल्यांच्या डागडुजी साठी वापरावा . गडावरील  नैसर्गिक झऱ्याच्या पाण्याला तहानल्या जनतेपर्यंत पोहचवा. खेड्या -वाड्यात लाल मातीच्या  रस्त्यावर एक थर का होयीना डांबर घालावा  , माळ रानावरच्या झोपडीत विजेच्या दिव्याने प्रकाश पोहचावा , भूक भूक करत मारणाऱ्या कुपोषितांना दोन घास मिळवून द्यावेत ,वेशीबाहेर आजही कुड्याच्या भिंतीचा आडोसा करत हलाकीत दिवस काढणाऱ्या उपेक्षित , दलित , भटके  म्हणून दूर सरलेल्यानां निदान त्यांच्या हक्काचं घर  मिळवून द्याव , धर्मराज सारख्या तरुणांच्या हाताला काम उपलब्ध व्हावं  अशा मागण्या आपण का लावून धरत नाही. 

शिवाजीपार्कच्या उद्याच्या गर्दीत प्रत्येकाच्या मनातले भीमराव बहरुन येतील. आंबेडकरी साहित्याच्या पुस्तकांचा विक्रमी खप होईल, स्वतःला दलित नेता म्हणवणाऱ्या पुढाऱ्याची इंट्री पाहायला माना उंचावल्या जातील. साहेबमय झालेला दिवस गबजुन संपेलहि ……………. आणि आलेलि पावलं पुन्हा वळतील माघारी आप -आपल्या ठिकाणावर गाड्या पुन्हा गच्च होऊन मुंबई बाहेर जातील. ६ डिसेंबर च्या मुहूर्तावर सुट्टीवर गेलेले शिवाजीपार्क वाले मुंबईत दाखल होतीलं पार्कात पुन्हा पहिल्या सारखं रुटीन सुरु होयील. पण तुमच्या आमच्यात वाटलेले भीमराव मात्र चैतभूमीवर कायम वाट पाहत असतील समतेच्या वाटेनं येणाऱ्या त्या असंख्य बांधवांची. 

जय भीम !!!


- संतोष टाकळे
Sanntosh Taakale

नवश्रीमंत………… !


महागड्या कुरियर कंपनीच्या पाकिटात आलेलं निमंत्रण पत्रिकेच पार्सल शेजाऱ्यांनी आणून दिल . सोबत तुमची टपाल पेटी आमच्यात दारात का नाही लावत तसही तुमचे सगळे पत्रव्यवहार आम्हीच सांभाळतो असा खोचट सल्ला देत दार बंद झाल्याचा आवाज झाला. पाकीट उलटून पालटून पाहिलं काहीच सुगावा लागेना निनावी पार्सल यावं असे दिवस अजूनही आले नाहीत. घरी आल्या आल्या हि  भानगड मरुदे तिकडे म्हणत  पाकिट बाजूला सारल आणि मी बसतोय इतक्यात स्मिता आली. साहेब पाणी मिळेल का ग्लास भर. …………. उठून तूच घे मी पण आत्ताच आलोय. ती तशी समजूतदार आहे स्वतः जाऊन तिनं दोन ग्लास भरून आणले. पाणी पोटात गेल्यावर डोकंहि थोडं  शांत झालं . सोफ्यावरच पाकीट पाहून स्मिताला राहवलं नाही सवयीप्रमाणे तिनं पार्सल फोडून त्यातल्या आमंत्रण पत्रिकेची प्रत माझ्याकडे देत  सोबतचा मिठाईचा बॉक्स उघडून बाई सुरु झाल्या. काय हे स्मिता अस मी म्हणणार इतक्यात तीनं हाताने थांबवत म्हटलं आता तू सुरु होऊ नकोस मिठाई बेस्टच आहे. घे टेस्ट कर………………छबी मावशीच्या नव्या घराच्या वास्तू शांतीची पत्रिका होती ती. कधी काळी मावशीने मोल  मजुरी करून घर चालवलंय मुलांना शिकवलं. १ रूम किचनच्या चाळीत अर्ध आयुष्य गेलं आणि उशिरा का होईना पण आता तिचे दिवस बदललेत.  पनवेलच्या ४००० sq ft  घरात ती जातीये अर्थात यावेळी आपण गेलं पाहिजे. कालनिर्णय मध्ये आमंत्रणाची तारीख पाहिली  तर नेमका रविवार होता.  म्हणजे मुद्दामून सुट्टी घ्यायला नको. अशा वेळी काय द्यावं-  घ्यावं हे सगळं स्मिताच पाहते.

रविवारी ठरल्या वेळेत आम्ही निघालो. आमंत्रण पत्रिका सोबत घेतली होतीच. नवी मुंबईत  पत्ता शोधणं तस फार कठीण नाही. सेक्टरच्या हिशेबात वसलेल हे उपनगर झपाट्याने विस्तारतय, पत्रिकेत नमूद केलेल्या पत्त्यावर आम्ही पोहचलो. प्रशस्त मोठ्या गेट मधून गाडी आत गेली. समोर थक्क करणारं ल्याविश complex उभं होतं. सुखवस्तू म्हणजे काय हे पाहताच  क्षणी कळाव अस काहीसं हे ठिकाण. गाडी पार्क करून आम्ही C विंग च्या दिशेने वळलो. entrances गेट वर सो कॉल expensive  फुलांची सजावट  होती. स्वागताला स्मार्ट लूक मधले attendant होते. स्मिताने गाडीतून उतरण्यापूर्वी चेहऱ्यावर पुन्हा एकवार मलमली कापसाने पावडरचा एक थर चढवला होताच पण तरीही आणि एकदा खात्री करून घेण्याकरिता पर्स मधल्या आरशाने चेहरा तपासून घेतला. गळ्यातलं मंगळसूत्र पुढे काढत डाव्या हाताने केसांच्या बटा सेट केल्या. मधेच माझ्याही केसांना वळण देत अहो तो शर्ट नीट इन करा , घाम पुसा आधी , बुटाची लेस सुटलीय अशा अनेक सूचना ऐकवत आणि त्या सुधारत एकदाचं छबी मावशीचं घर आलं . दारात चपलांचा गोतावळा जमा झाला होता.  अनेक ओळखीचे नातेवाईकहि  दिसले.त्या गर्दीत मावशी मात्र कुठे दिसत नव्हती . काही वेळात आम्ही तिथल्या माणसांत मिसळलो आणि कुणी तरी सागितलं छबी मावशी त्या पलीकडच्या रूम मध्ये आहे. या इतक्या मोठ्या घरात वावरतांना थोडं गांगरून जायला होई . १ bhk ची सवय झालेले आपण अशा आलिशान घरात भेदरनारच. मावशीच्या रूम मध्ये हि भारी फर्निचर होतं डबल बेड मोठा LCD tv आणि इतर बऱ्याच गोष्टी ………. आज इतका आनंदाचा दिवस पण मावशीच्या चेहऱ्यावर त्याचा लवलेशही दिसत नव्हता. मी जवळ जाऊन विचारलं कशी आहेस बरं नाहीये का तुला ? नाही रे  हल्ली गोंधळात गेलं कि मन सैर भैर होतं . मी फार खोलात न विचारता स्मिताला मावशी साठी आणलेली साडी द्यायची खुण केली . साडी स्वीकारतांना तिचे डोळे पाणवले अर्थात तिच्या साठी माझी साडी खास असणार मी तसाही तिचा लाडका पडतीच्या काळात मावशीला आईने सावरलं ती का नाही आली त्याची चौकशी तिने केलीच. आम्ही निघतो म्हणत मावशीला नमस्कार केला. अरे जेवून जा ना अशी गळ मावशीने घातली पण अजून बऱ्याच विधी बाकी होत्या आणि स्मिताच्या मैत्रिणीकडेहि  जायचं होत. तिने जेवणाचा बेत केला होता. तसही छबी मावशी सोडली तर बाकी तिच्या घरच्यांना कोण आलय गेलंय त्याचं काही पडलं नव्हतं ते त्यांच्या हाय क्लास मध्ये वावरत होते. आणि आम्ही पै पाहुणे आमच्या प्रत्येकाच्या क्लास मध्ये स्वागता पासून ते चहापाणी पाजण्या पर्यंत सगळ्यासाठी भाड्याची  माणसं होती. आणि घरची मानसं मात्र शोभेच्या बाहुल्या सजवून उभ्या कराव्यात तशी निर्विकार पसरली होती. मला या वातावरणात गुदमरल्यागत झालं.

c wing च्या तळमजल्यावर लिफ्ट उघडली आणि स्मिता आणि मी दोघांनीही एक दीर्घ श्वास घेतला. स्मिता गाडीत बसता बसता अनेक तक्रारी करीत होती. हि काय वागण्याची पद्धत, इतका कसला पैशाचा माज , साधं हळदी कुंकू लावायला हिला वेळ नाही , कुणाला दाखवतायत पैशाची गुर्मी , यांच्या सारखं आम्ही गावातलं घर दार विकलं नाही. २० हजाराची साडी, १० - १२ तोळ्याचे दागिने , पार्लरचा मेकउपचा नखरा करणारी हीच ती माझ्या साड्या आणि दागिने उसने घालायला नेत असे . निदान माझ्या सोबत तरी तिनं अस वागायला नको होतं. …………. गाडीतला ac वाढवत. मी तिला शांत करण्याचा प्रयत्न केला खरा पण स्मिता सहसा कुणावर एव्हढी चिडत नाही. पण आज तिचा राग आनावर झाला होता. साहजिक होती तिची प्रतिक्रिया मलाही तसाच काहीसा अनुभव आला. नेमही गळ्यात पडणाऱ्या महेश ने आज फक्त एक कोरडं हसू देत मला प्रतिसाद दिला. अभिनंदन केल्यावरही thanks या शब्दा खेरीज तो अधिक काहीच बोलला नाही. कदाचित त्याला त्याच्या आजच्या यशाने भुरळ घातली असावी. मीही फार मनावर घेतलं नाही. पण स्मिता मात्र यापुढे यांच्या कोणत्याच कार्यक्रमात आपण यायचं नाही इथवरच्या निर्णयापर्यंत पोहचली होती.

पूर्वी मिडल क्लास आणि लोवर क्लासच्या रेषेवर जगणारे आपण नवश्रीमंत या नव्या बोनस लाईनच्या आत गेल्यावर असे काही react होतो . त्याचा भडकपणा लगेच जाणवतो. गरज नसतांना केलेली पैशाची उधळपट्टी , बोलण्यात ,चालण्यात , वागण्यात आलेला नाटकीपणा, पैशाच्या जोरावर काहीही करू शकतो आंधळा आत्मत्विश्वास, आणि बरच काही ………

पण तसही मातीच्या भिंती सिमेंटने लीपल्या कि वाड्याचा-  राजमहल होत नाही . आणि साजूक तूप टोपभर प्यायल्यावर लगेच राजबिंड होता येत नाही.  हे कधी कळणार या नवाश्रीमंतांना ………

- संतोष टाकळे
पोस्ट  काल्पनिक असली तरी यातले बरेच संधर्भ सत्य घटनेशी निगडीत आहेत .

स्पर्धा - बक्षिसं ……… !



स्थळ मराठी शाळेचं सभागृह ……… दाटी वाटीने बसलेली मुलं. आमच्या नरवणकर आणि सैतवडेकर बाई मुलांना रांगेत बसवण्याच्या गडबडीत ………. काहीवेळातच मुख्याध्यापिका फाटक बाई पाहुण्यांच्या सोबत सभागुहात प्रवेश करतात . निळा फ्रॉक घातलेल्या पोरी आणि खाकी प्यांट पांढरा शर्ट घातलेली पोरं ताड्कन उठतात आणि संमिश्र घोगऱ्या स्वरात एक साथ नमस्ते म्हणतात.………… कार्यक्रम सुरु करायचा का ? फाटक बाई असा इशारा तलाठी गुरुजींकडे पाहत करतात ………. गुरूजी मानाने होकार देतात ………. ज्यांची जयंती किवां पुण्यतिथी असेल त्यांच्या प्रतिमेला हार घालणं समई लावणं असं साग्रसंगीत सुरु होतं ……… प्रास्ताविक -पाहुण्यांची ओळख …… ( अशावेळी पाहुण्यांचा चेहरा भलताच उजळलेला असतो. ) एव्हडे सोपस्कार उरकले कि मग मुलांची भाषणं………. या मुलांना बहुदा पुढच्या रांगेत बसवलं जातं ………… भाषणाचा कागद काढून त्यांची घोक्कम पट्टी सुरु असते. पहिल नाव कुणाचं पुकारतील याची धडधड छातीत चालू असते. बाई पण डोकं लावून त्यातल्या त्यात चागलं बोलेल त्याचं नाव पुकारतात ( उगाच पाहुण्यांसमोर शोभा नको )

आणि सुरवात होते . ……………… अध्यश महोदय आणि जमलेल्या ,माझ्या बाल मित्र मैत्रीनीनो आज मी तुम्हाला लोकमान्य टिळकांबद्दल जे चार शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांत चित्ताने एकूण घ्याल अशी मी आशा बाळगतो आणि माझ्या भाषणाला करतो. टिळकांच पूर्ण नाव बाळ गंगाधर टिळक त्यांच्या वडिलांचं पुर्ण नाव ………………………. भाषणाची टेप सुरु होते. मध्ये कितीक वेळा उम्म्म्म्म्म्म्म्म्म उम्म्म्म्म्म्म्म्म करून एकदाचं भाषण शेवटच्या टप्यात येत समोर काही मुली एकमेकींच्या वेण्या ओढत असतात. काही टवाळ पोरं भाषणं करणाऱ्याचं लक्ष विचलित करण्याकरिता टिवल्या बावल्या करत असतात …बोभाटे गुरुजींच्या ते लक्षात येत. ऐरवी त्यांनी त्या पोरांच्या पाठीत जाळ काढला असता. पण पाहुण्यांकडे एक नजर पाहत पोरांना डोळ्यांनीच राग भरतात …………. एका मागो मग एक १० - १२ भाषणं ऐकणाऱ्या पाहुण्यांचा सुरवातीचा उत्साह बारगळतो. पहिल्या दोन चार पोरांना ते दाद देतात . चागलं बोलली ती विध्यार्थिनी………. , या मुलाच्या भाषणात दम होता. खूप हुशार आहेत बाई तुमची मुलं ………… अशी काही ठरलेली वाक्य …………. टाकून पाहुणे त्यांची कामगिरी बजावतात . पण सलग दिड तास मुलं अध्यश महोदय ………… अध्यश महोदय ……… म्हणत पाहुण्यांना वात आणतात. पाहुणे मेतकुटिला आले असतानाच कुणी तरी जाहीर करतं हे शेवटचं भाषण …………. हुषषष करत सगळेच एकदा घड्याळ्यातल्या काट्यांची हालचाल पाहतात. पाहुणे उशीर झाला म्हणून कुजबुज करतात. साहेब आता अगदीच थोडा वेळ घेणार आहोत तुमचा …………… बक्षीस समारंभ अगदी थोडक्यात उरकूया म्हणत मुख्याध्यापक बाई पाहुण्यांना गळ घालतात ……………… हत्ती गेला आणि ……… राहिलं म्हणत तेही कढ काढतात. पोरांचीही चुळबुळ कमालीची वाढलेली असते . लोकमान्य टिळक आणि त्यांचा जीवनपट एव्हाना पोरांच्या डोक्यात घोंगावत असतो. सरकारचं डोकं ठिकाणावर असो वा नसो पोरांची डोकी आउट झालेली असतात. अपेक्षे प्रमाणे करमरकरांचा अमोल पहिला नंबर उडवतो …………दुसरा बोधे नावाची मुलगी तिसरा टाकळे आणि इतर उत्तेजनार्थ . ….

गमतीचा भाग सोडला तर शाळेतल्या अशा स्पर्धेतूनच विद्यार्थी घडतो. अडखळत भाषण करणारा पुढे वक्ता होतो. मैदानात ढोपरं फोडून घेणारा - खेळाडू , समूहगान करणारी - गायिका , शाळेतल्या पहिल्या भाषण स्पर्धेत मिळालेल्या बक्षिसात कदाचित आजचा मी दडलो असेन. काळ्या फळ्यावरच्या अक्षरांना पुसलं तरी त्यांचा व्हाइट मार्क अंधुकसा राहतोच …………. अंगणवाडी - शाळा - महाविद्यालय या दीर्घ प्रवासात शाळेतले काही दिवस न पुसता येणारे अगदी त्या व्हाइट मार्क सारखेच.

- संतोष टाकळे

निमित्त …………. !



गेल्या आठवड्यात आमची हि कधी काळची ठेवणीतली साडी नेसून कुठल्याशा सामाजिक संथेचा चर्चासत्र उरकून येतांना दिसली. मी चमकलोच बाई आज चक्क काठा -जरीच्या साडीत श्रावणातल्या मंगळा गवरीला अजून  बराच वेळ आहे. ……………. बाहेरून आल्या आल्या तिला फार प्रश्न विचारलेलं चालत नाही.  अशी तंबी तिनं मला कित्तेकदा दिलीय  ……………… पण माझ कुतूहल  मी फार काळ दाबून ठेवू शकत नाही हो ………… तिला थंडगार माठातल्या पाण्याच्या ग्लास देत म्हटलं …………। बाई ( मी अदबीनं तिला बाई म्हणतो ) आज काय मंगळा गवरीवर चर्चा सत्र होतं का ? …………… पाण्याचा निम्मा ग्लास संपवून बाई जरा खाकसुन म्हणाल्या अहो बर्वे तुमचा प्रश्नांचा तास सुरु झाला का ?  टिपिकल कोकणस्थ शोभता हो !……………. . नुसत्या चवकाश्या करण्यात तुमचा हातखंडा………….  अगदी पूर्वजांपासूनच  ………… तस नाही हो पण तुमच्या आजच्या गेट उप वरून ………….मला मधेच तोडत बाई बेडरूममधल्या कपाटाकडे वळल्या ……………… मागून मीही त्याच दिशने सरकलो. लग्नात बाईच्या मामाने वरातीत नाचवलेली ती पत्र्याची ट्रंक उघडल्याचा किर्र … आवाज आला.  ………… आज बाई पुन्हा भूतकाळात हरवणार याची कल्पना आली. आणि तितक्यात बाई म्हणाल्या बर्वे हि पहा आबांनी घेतलेली हि इरकली जरी काठ ……………… इस्लामपूरच्या "मेनका" साडी भंडार मध्ये आम्ही जेंव्हा बस्ता बांधायला गेलो ना तेंव्हा काचेत लावली होती. बघताच क्षणी मला पसंत पडली.  ……………… त्याकाळात ४०० रुपये मोजले होते आबांनी………इतकी महाग नको म्हणून मी नकार दिला.  पण एकुलत्या एक पोरीचं लग्न कसर नको म्हणून जरा ज्यादा  पैसे मोडले आबांनी……… मला कि नाई पूर्वी साड्या नेसायची फार हवूस शाळेतल्या कार्यक्रमात म्हणू नका गावल्या पूजेत म्हणू नका मी साडी नेसायला एका पायावर तयार ………… बाई एव्हाना काही वर्ष मागे मायगरेट झाल्या होत्या . पदराची नक्षी जशी आत -आत अधिक खोलवर गुंतते तशा बाई भूतकाळाच्या विणीत खोलवर गुंतत होत्या. 

बाई म्हणजेच स्मिता देषस्थ आणि मी कोकणस्थ दोन सरळ आडव्या रेषा कधीच न जुळणाऱ्या…………………पण आमचं जुळलं ते राधाक्का मुळे हि जबरी बाई.  बोलेल ते करुन दाखवणारी . आबांची मानलेली बहिण मी कोल्हापूरच्या विद्यापीठात रुजू झालो. तेंव्हा हिच्याच खाणवळीत दोन वेळ जेवत असे ………… नुसती तोंड ओळख ……आणि काहीदिवसातच घरोबा…………… आई दोन तीन वेळा कोल्हापुरात आली. तेव्हा राधाक्का कडेच राहिली होती. एकदा स्मिता तिच्याकडे गेली असता  राधाक्काने आईला विचारलं माझ्या भावाच्या पोरीला सून करते का ?  हो म्हण ग बये उद्या पोर तुझ्या पदरात टाकते .आई राधाक्काडं पाहत राहिली ………………… आणि हो- नाही म्हणायचा उशीर बाशिंग बांधून लग्न उरकलं पण ………… लग्नात मिळालेल्या त्या सगळ्या भारी साड्या बाईनी आजही जशाच्या तशा  जपून ठेवल्यात . राधाक्काने दिलेलं पटवारी लुगडं ………कराडच्या मावशीने घेतलेला पदरला लाल गोंडे असलेला आकाशी कर्नाटकी शालू …………. आईने मांडवात "सूनमुख " पाहतांना दिलेली राणी कलरची पैठणी …………… बाईनी एव्हाना सुटकेस रिकामा करून सगळ्या साड्यांच्या घड्या पसरल्या होत्या. आणि त्यांच्या हातात पिवळ्या जर्द्र आणि हिरवा काठ असलेल्या साडीच्या घडीला ह्रीदयाशी कवटाळल होतं …………माईनी घेतलेली लग्न लागतानाची हि साडी. स्वतः माईनी तिला ब्राम्हण काष्टा पद्धतीत नेसवली होती.  माई जाऊन वर्ष लोटलं असेल पण आजही बाई अनेकदा  भावनिक होतात . बाईना आईपण अनुभवता आलं नाही याची खंत सतत त्यांच्या मनात दडून राहिलेय . आणि आई अशी आर्त हाक मारताच क्षणार्धात दत्त म्हणून उभ्या होणाऱ्या माई आज हयात नाहीत ……………

साड्या दागिने ठेवणीत गेले हि काही काळ ते बंद पेटीत अंधारून जातात.  पण कधी निमित्त म्हणून त्यांना बाहेर येता आलं कि तेही पुन्हा नव्याने तेच क्षण अनुभवण्यासाठी घुटमळतात. अगदी ६० वर्षांच्या आज्जीने लग्नाचा बनारसी शालू पुन्हा त्याच हवषेने नेसवा अगदी तसंच …………. 


- संतोष टाकळे 

अकाड पावली……………!




आषाढाचा दुसरा दिवस …………… पावसानेही विश्रांती नंतर जोर धरलाय ……….  रानावनात हिरवळ अधिक गडद झालीय………याच आषाढात  अकाड पावलीला नव्या नवऱ्या माहेरात येतात. आषाढात म्हणे सासूच तोंड पाहत नाहीत.( तसही सुनांना सासूच्या फटकळ तोंडात फार रस नसतोच म्हणा  :p ) पूर्वी गावातल्या पाच बाया नव्या नव्हरीला आणायला तिच्या सासरी जात "आकाड पावली " या नावाने हा रिवाज आजही काही शहरा -गावात हवसेने निभावतात. चार भाकऱ्या किवां  शेर भर पीठ घेऊन माघारी जायची पद्धत आहे.किमान ८ दिवसांची सुट्टी घेऊन सासरवार्शीन निघते. गावातल्या पारावरच्या देवाला नारळ ठेऊन ती सासर सोडते ………………वडाप नाही तर एसटीने प्रवास सुरु होतो. तिच्या मनात अनेक गोष्टी पिंगा घालतात.  मधेच मनात येतं यांना करमेल का ८ दिवस माझ्या शिवाय ………. यांचा धीर ओढवेल का ?…………. चल काहीतरीच……………  गालावर गुंतनाऱ्या केसांची बट कानामागे सारत………………  हिरव्या माळावरच्या निळ्भोर पक्षागत उडाल्यागत होतं काहीवेळ …………. सोबतच्या बाया डोक्यावरचा पदर सावरत एकमेकीत बोलतात ………… काय ग भीमे सरूला बघ काय आनंन  झालाय …. माहेराच्या वाटेवर लागलो कि बये मन आधी धावत जातंय  घरा- आंगणात ………… साडीच्या काठावरून हळुवार हात फिरवत सरूही लाजते …………. एसटी फाट्यावर थांबते ……… माहेर जवळ आलं बये म्हणत एकच कालवा होतो. सरुही डोक्यावर पदर चढवते …… नाकातली नथ , गळ्यातलं मंगळसूत्र सरळ करते. मधल्या वाटेने एक उतार गेला कि घर दिसू लागतं …………. दारात बाया माणसं लांब नजर लावून उभी असतात . तांब्याभर पाणी अन मुठ भर तांदूळ पोरीवरून ववळून टाकून तिला घरात घेतलं जातं ……… माहेरात आल्यावर गांगरलेल्या तिला मैतरणी गराडा घालतात. तीही गालात हसत गमती जमतीत रमून जाते. 

दिवस वाऱ्यासारखे उडतात आणि परत माघारी परतायचा दिवस उजाडतो. मन आईच्या कुशीत रमलेल असतं. रोज नवा पदार्थ खावू घालत आईने लेकीचं माघारपण पोटभर केलेलं असतं. पोर नांदायला लागली याचं समाधान असतंच म्हणा पण तरीही अजून एक दिवस राहावी म्हणून गळ घालावी असा विचार येतो. ………………इतक्यात फटफटी थांबण्याचा आवाज येतो. जावई आले. म्हणत कुणी तरी तांब्याभर पाणी घेवून पुढं होतं. सरूचा चेहरा क्षणार्धात खुलतो. चुलीवर चहाचा टोप चढवत. एकीकडे रवा खरपूस भाजून शिऱ्याची लगबग सुरु होते. नेहमी पेक्षा आजचा चहा कडक आणि खास दुधाचा ………. शिऱ्यातही काजू गर , मनुका असा सुका मेवा पडतो. सासू जावई आलाय या आनंदात काय करू आणि काय नको म्हणत माज घरात वावरत असते. उफाळणारा चहा आणि शिऱ्याची   डिश घेऊन सरू माजघरात येते ………………. त्यांची नजरा - नजर होते. आणि ……………….काहीवेळ इकड तिकड च्या गप्पा रंगतात………मनगटातल्या  घड्याळ्याकडे पाहत  …………….  चला आता निघायला हवं म्हणत जावई आत निरोप पाठवतात ………सरू भरभर नवी साडी नेसते. शेजारची पम्मी तिची वेणी -फणी करते. लहान बहिणीने गुंफलेला परसातल्या ताज्या मोगऱ्याचा गजरा केसात माळला जातो. साडीच्या निऱ्या आणि पदर सरू दोन तीन दा पम्मी कडून सरळ करून घेते .लग्नानंतर फिरायला गेल्यावर त्याने त्याच्या आवडीने तिला घेतलेली ती साडी तिने नेसलेली पाहून तो मिशीत हसत भुवया उंचावून तिला दाद देतो. फटफटीला टांग मारून तो गाडी वळवून उभा राहतो. चल निघते आई म्हणताना सरूचा हुंदका फुटतो . पम्मी , सरू आणि आईच्या डोळ्यातही पाणी तरळत पण दिल्या घरी लेक परत जातेच कुणाला चुकलंय हे ……….म्हणत शेजारच्या बाया समजूत काढतात ………… जावयांच्या आधाराने सरू गाडीवर बसते ………गाडी डोळ्याची पापणी लवेस्तोवर …………. पिंपळाच्या पाराला वळसा घालून अंधुक होते.……………… शेवटी दारातली अबोली फुलली कि तिला कुंपण घालून ठेवता येत नाही. तिच्या साजेश्या धाग्यात ती बांधावी लागते. 

- संतोष टाकळे 

मर्यादेची मानसिकता ………………… !





मुंबईच्या लोकल ट्रेन मध्ये रेप झाला ,किवां तो करण्याचा प्रयत्न झाला.अशी बातमी काल परवाच येवून गेली . मुळात हल्ली संवेदना इतक्या बोथट झाल्यात कि अगदी मोजून १० सेकंद वाईट वाटतं आणि आपण दुसऱ्या घटनेकडे वळतो. नॉन stop न्यूज च्या जमान्यात बातम्याहि डेलिसोप पहावा तशा पहिल्या जातायत हे दुर्देव ………… विषय आहे तो मर्यादेच्या मानसिकतेचा …………. असभ्य वर्तन किवां पाशवी मानसिकता याची अनेक करण आहेत ती कदाचित तुम्हा सर्वांनाच माहित असावीत. इथे त्यावर जास्त बोलत बसत नाही. एक प्रसंग शेअर काराचाय त्यावर तुमच मत काय?  हे नक्की कळवा.

त्यादिवशी ११. २० ची चर्चगेट लोकल पकडून मी बोरीवली वरून निघालो………. तसही रात्री उशिरा डबे खाली असतात. अर्थात विंडो पकडून बसलो इतर डब्यात थोडी वर्दळ होती मात्र ……फस्ट क्लास अगदीच ओसाड पडलेला. कांदिवली स्थानकावर एक जोडी डब्यात आली . कोपरा पकडून ते बसले. ................ नेहमी प्रमाणे मी गजल ऐकत बसलो ………. इतक्यात बाजूच्या डब्यातून आवाज आला ………………… अतिशय वल्गर वाक्य होतं ते आणि क्षणार्धात शिव्यांची खडाजंगी सुरु झाली. एकीकडे प्रादेशिक भाषेतल्या अर्वाच्य शिव्या तर दुसरीकडे सो कॉल इंग्लिश वर्जन किमान १५ मिनिटे हा खेळ सुरु होता. नेमक काय झालं हे कळेना अखेर बाजूच्या डब्यातल्या माणसाने सागितलं अहो हे दोघे इथ बसून घाणेरडे चाळे करत होते. त्यावर मी रोखलं तर हि पोरगी आम्हालाच इंग्लिश मधून शिव्या द्यायला लागली. माझ्या सोबत माझी बायको आहे. माझी दोन वयात आलेली मुलं आहेत. त्यांच्या सोमर हे असलं  काही पाहणं म्हणजे …………… मी एक नजर त्या दोघांकडे पाहीलं  त्यांचे branded कपडे , हातातले महागडे मोबाईल्स आणि एकंदरीत त्यांचा लूक तसा "श्री"मंती वाटला. 
एव्हाना त्यांना अधिक सुनावणारे अनेक जण उभे ठाकले होते. पुढच्या स्थानकावर ते दोघे उतरले ……………… पण हा विषय इथे संपला नाही डब्यात उलट सुलट चर्चेला उत आला . अनेक प्रसंगावर चर्चा झाली. असे कित्तेक उथळं परिसंवाद मी यापूर्वी ऐकले आहेत . म्हणून त्याकडे अधिक लक्ष न देता. या प्रसंगाच्या अनुषंगाने संधर्भ चाळत असतांना लक्षात आलं कि शेवटी "असभ्य वागणारी माणसचं आणि सभ्य वागणारीही माणसचं " .............  फरक वर्तनातला कि मानसिकतेतला ……………. ????? 

चोपाटी, पार्कात किवां अन्य सार्वजनिक ठिकाणी वयात आलेल्या तरुणाईने आणि इतर  भरात  आलेल्या जोडप्यांनी मर्यादेची मानसिकता पाळली तर कुठं बिघडतंय …………. पार्कातल्या झाडाखाली प्रीयसिला मिठीत ओढताना तुमच्या मनात नेमकं काय होतं ते तुम्हालाच ठाऊक मात्र इतरांना काय वाटेल याचा विचार केलात तर …………………… !


- संतोष टाकळे 

जगणं जिगरबाज ……………!




सिग्नलला गाडी थांबली आणि १ ० एक वर्षाची पोर गुलाबाच्या फुलांचा झुबका घेवून जवळ आली. साब लो ना ताजा फुल है ! पावसात भिजून गुलाब अधिक फ्रेश वाटत होते . एक क्षण ते घेण्याचा मोह झाला . पण इतक्यात ग्रीन सिग्नल लागला आणि गाडीने पुन्हा वेग घेतला. गेले काही दिवस रोज याच सिग्नलवर ती चिमुरडी दिसते. कधी गुलाब घेवून तर कधी निशिगंधाच्या पांढऱ्या शुभ्र काड्यांचा गठ्ठा घेऊन . प्रत्येक गाडीच्या काचेसोमर ती फुलांचा झुबका धरते आणि डोळ्यात करुण भाव आणत ते विकण्याचा प्रयत्न करते. विस्कटलेले केस,मळलेला झगा, काळवंडलेला चेहरा इतकं  असूनही तिच्या डोळ्यात मात्र एक वेगळी चमक दिसते . नहि चाहिये म्हणत कुणी तिला झिडकारल ……………कि काही सेकंद तिचा चेहरा कोमेजतो पण क्षणार्धात पुन्हा ती दुसऱ्या गाडीच्या काचेतून डोकावते……………….   हातातल्या गुलाबाच्या झुबाक्याकडे पाहत … आणि एकदा त्याची बोली लावते. कुणीतरी म्हणत ६ ० नाही ४ ० दुंगा बोल देना है ! साब ५ ० तो दो म्हणत ती तिची शेवटीची गळ घालते . पण हातच गीऱ्हाईक जातंय असं वाटलं तर लगेच लो साब ……… म्हणत तो झुबका काचेतून आत सरकवते . इतका वेळ सिग्नलला रेंगाळत असलेल्या त्या गुलाबांच्या नशिबी आलिशान गाडीत बसलेल्या madam च्या हातात जाण्याचं भाग्य मिळतं . आणि ती बापडी १ ० च्या चार नोटा नाचवत फुटपाथच्या दिशने धाव घेते. तिच्या कित्तेक तासांच्या प्रयत्नाला यश आलेलं असतं. फुलांचे गुच्चे बांधत बसलेली तिची आई लेकीला जवळ घेते. तिच्या गालावरून हलकासा हात फिरवत तिला शाबासी देते.ती कोवळी पोर या प्रेमाने भारावून जाते.  आईला घट्ट कवटाळून तिच्या मिठीत विसावातेय इतक्यात तिचा बाप पुन्हा एक गठ्ठा तिच्या हातात कोंबतो …………….  पदराने तिची आई लेकीच तोंड पुसते, केस निट करते, फडक्याखालच्या बाटलीतल दोन घोट पाणी पाजते. पुन्हा त्या पोरीला तरतरी येते. सिग्नल लाल होतो गाड्या थांबतात ………… धावत ती गाड्याच्या दिशेने पळते……. आणि पुन्हा साब लेलो ना म्हणत ती गाड्याच्या गर्दीत हरवून जाते ………एवढ्या तेवढ्या अपयशाने खच्चून जाणारे आपण हिला पाहून शरमलो नाही तर नवल…………तिची जिद्द , परिस्थिती आणि च्यालेंज स्वीकारण्याच जिगर पाहिलं कि वाटत.  आपण का रडतो नेमही .

सुखावणाऱ्या  AC कारच्या आत बसलेल्या माझ्या आणि पावसात भिजत फुलं विकणाऱ्या तिच्या जगण्यात नेमका काय फरक . …………. तिचं जगणं जिगरबाज आहे. बेधडक संघर्षाचं आणि माझ जगणं "शो"बाज आहे. diplomatic मुखवट्याच …………. ! 

- संतोष टाकळे

कामवाली ……!




इनिस्पेक्षण करतेय ………….  असं वाक्य कानावर पडतं आणि  चक्क माधुरी दीक्षित कामवाल्या बाईच्या क्यारेटर मध्ये दिसते . भुवया उंचावून लोक म्हणतात हिला काय भिक लागलेय अशी जाहिरात करायला ……… असो पण सध्या घरकाम करणारी बाई मिळणं कठीण झालंय …… working वुमनच्या जमान्यात यांचा भाव वधारलाय आणि डिमांडहि. 

कालच एका मित्राकडे जेवणाचं आमंत्रण होतं. साग्रसंगीत स्वयंपाक झाला होता. मोसमातल्या शेवटच्या आंब्यांचा आमरस, कुर्मा भाजी, पुरी , चटणी , कोशिंबीर , भरलेल्या मिरच्या, आणि साजूक तुपाची धार टाकून केलेला मसाले भात, कित्तेक दिवसांनी असं ब्राम्हणी जेवणाचा आस्वाद घेत होतो. अगदी तृप्त होऊन हातावर पाणी सोडताना म्हटलं वाहिनी मस्त झाला बेत "मसाले भात "तर अफलातून ………… त्यावर मित्राने लगेच चान्स मारला ……अरे तुझ्या वाहिनीने स्वयंपाक करून काळ लोटलाय   …………  त्यावर  - इति वाहिनी ……… Sunday ला पास्ता , पिझ्झा, बर्गर , हादडतोस ते काय तुझी ………… करते का ? मी मनात म्हटलं उगाच आगाऊपणा करायची काय गरज होती जेवण कुणी का करेत ना पोट भरलंय तर सरळ घरचा रस्ता पकडायचा सोडून मार तरीफा करत बसलाय …………. त्या दोघांची खडा जंगी अजून चालूच होती. मी जरा अव्ह्गडून म्हटलं बरं येतो मी बराच वेळ झालाय… ……… कदाचित त्यांना मी इथे आहे याच भान राहिलेलं नसावं. ………भानावर येत दोघेही शांत झाले. वाहिनी म्हणाल्या अहो हे नेहमीचंच आहे. जरा म्हणून कवतुक नाही माझं या माणसाला ………. ते जाऊदे अहो पण फालुदा केलाय तो खाल्या शिवाय मी बरी सोडेन तुम्हांला ……… वाहिनी किचनकडे वळल्या आणि मित्र म्हणाला हसतोस काय तुझ लग्न झालं कि हे सगळं तुलाही भोगावं लागणार आहे . 

 हाह्हाहः अरे पण हा स्वयंपाक कुणी केला ? ………. अरे कुणी म्हणजे काय आमच्या सुलभा काकूंनी ……… ओह्ह म्हणजे तुमच्या कामवाल्या का ? हो त्याच पण त्यांना आम्ही कधी कामवाली म्हणून वागवलं नाही अरे गेली ३ ० वर्ष त्या आमच्याकडे काम करता आहेत सगळं घर आम्ही त्याच्या हवाली करून जातो.  पण इथली वस्तू तिथे काय होयील …………. मी तर लहानपणा  पासून सुलभा काकूंच्या हातचं जेवतोय आई सरकारी नोकरीत बाबा शिक्षक ,सुलभा काकूंनी घर सावरलं …… आत्ता त्या पार थकल्यात काम जमत नाही त्यांना पण तरीही येतात.  अगदी मनापासून करतात सगळं सध्या त्यांची सून येते सोबत बाकी जड काम त्यांची सून उरकते पण जेवणाच्या फोडण्या मात्र सुलभा काकूच घालते अस्सल चव आहे तिच्या हाताला. कामात त्यांच्या सुनेने जरा धूसमुसळेपणा केला.  तर तिला तिथल्या तिथे झाडतात अगदी हक्काने ……… सकाळी आम्ही आज काय बनवायचं याची यादी ठेवतो त्यानुसार सगळे पदार्थ संध्याकाळी तयार असतात एकादी वस्तू कमी पडली तर सुलभा काकू तिच्या नऊवारीच्या पदराच्या कोपऱ्यात बांधलेल्या पैशाची मोड करून ती वस्तू घेवून येते आणि आठवड्याच्या शेवटला  हिशोब देते … आजतागायत आम्ही तिचा हिशोब कधी तपासाला नाही. कधी वेळच नाही आली तशी. सुलभा काकूंन  बद्दल बोलतांना मित्राच्या डोळ्यात आपलेपणाची चमक होती. आणि जिव्हाळा तर स्पष्ट जाणवत होता. 

समोर फालुद्याचा ग्लास होता. त्यातल्या तीन चार थरात भरलेला प्रत्येक पदार्थ वेगळा होता. वर दिसणारा सुका मेवा , आईस्क्रीम, सब्जा लाल रंग आणि इतर सगळं बाहेरून उठून दिसत होतं मात्र या फालुद्याची खरी मजा ज्या मलाई दुधामुळे येते तो मात्र या सगळ्या सजावटीत अनोळखी झाला होता. अगदी सुलाभा काकुं सारखा ……….

- संतोष टाकळे  

लग्न…………. !





अमोलचं लग्न आता अगदी ५ दिवसांवर येवून ठेपलंय . अजून बरीच तयारी बाकी आहे. या भर पावसात या पोराने आम्हाला मांडव घालायला लावला. आणि चक्क छत्री घेवून आम्ही कामाला लागलो. शेवटी घरातलं लग्न . बस्ता बांधायला गेलो तेव्हा मी पण चान्स मारला लगेच २ कुर्ते ohh sorry ईट्स शेरवानी घेवून टाकल्या. म्हणजे करवला म्हणून मी नको का उठून दिसायला मांडवात . तसही मलाच करायचं सगळं पुढारपण . ते जाऊदे हो पण या पावसात घोडा मिळेना वरातीला………… त्या खेडच्या खान घोडेवाल्याला फोन केला तर मेल्याने १ ० हजार सांगितले वर म्हणला जोरात पाऊस आला आणी घोडा उधळला तर आम्ही जबाबदार नाही . अमोलला म्हटलं नको रे बाबा त्या घोड्याच्या फंदात पडुस कशाला मुक्या जीवाला त्रास आणि तसही दापोलीत मुसळधार पाऊस पडतोय घोड्यावर मेनकापड घालून वरात काढावी लागेल…………. अनेक अडचणी लक्षात घेता घोड्याचा प्लान आम्ही drop केलाय …. तरीही वरात निघणार गावातली पोरं म्हणाली पावसात भिजून गारठलो तरी चालेल पण अमोल भाऊजी वरात आपण गाजवणार ( यांना काय जातंय गाजवायला चार बाटल्या पोटात गेल्या कि एक एक गडी धुमशान घालायला तयार पण च्या आ… ला आमच्या तोंडाला फेस येणार बहुतेक ) या पोरांचा हुरकतोय तोच शिंदे पाटलीनीचा फोन तिच्या खास टोन मध्ये ……… बालाणु कस हाव………. अव त्या बुरोंडकराच्या पोराचा लग्न दापोलीत कंच्या हाल वर हाय…. मी - आकाबाय त्या राधा क्रिष्ण हॉल मध्ये ………व्हय काय म्हणवा तुम्हाला जल्ल्ला पाऊस काय पडतोय……. मे महिना सुका गेला तवा उरकायचा तो आता घेत्लाव…… ता राहूदे सगला मना सांगा वाराडाला गाडी कोन्ची केलीव हाव . टरक बिरक नका बा करू हल्ली बाया काय टरकात बसत नायत .बाकी मी ठेव्हाता आता फोन या बंड्याच्या मोबिल मधी जास्त पैसं नायत.

एके काळी आम्ही ट्रकात बसून नवऱ्या मुलासोबत लग्नाला जात असू आडगावातल्या त्या नागमोडी वळणावर गाडी धावताना मागे हवदात होणाऱ्या गंमती जमती ……. घोगऱ्या आवाजात लग्नाची गाणी म्हणणाऱ्या बाया , धक्का लागला म्हणून केसात अबोलीचा गजरा घातलेल्या आणि हळुवार लाजणाऱ्या त्या पोरी … वांत्या करून बेजार झालेली बारीक पोरं ……गाडी खड्यात आपटली कि आईगं बायगं करणाऱ्या हव्शी म्हाताऱ्या , लग्नाच्या गावात पोचल्यावर होणारं नवऱ्या कडच्या लोकांचं जंगी स्वागत, सारवलेल्या मांडवात लागणाऱ्या पंगती त्यातही ठरलेली कोबी - हिरव्या वाट्याण्याची भाजी , गोडी डाळ , भात आणि बुंदीचा लाडू असा मेनू ………… मंगल अक्षदा सुरु झाल्या कि हुंदका देत डोळे भरून खाली मान घालून मांडवात येणारी ती सोजवळ नव्हरी ……… लग्न लागलं कि जोशात वाजणारा खालु बाजा नवरा नवरीला बघायला जमलेली गर्दी … अजूनही हे चित्र काही गावत टिकून आहे पण फार दुर्मिळ होत चाललंय हे सगळं .

या उलट सध्या सगळ्या गोष्टी कंत्राट दिलं कि हजर होतात. अहो पण मी काय बोलत बसलोय अजून बरीच कामं पडलीयत फोटो वाला येयील इतक्यात , डेकोरेशन वाल्याला advances द्यायचाय. लग्नात आम्ही return गिफ्ट म्हणून छत्र्या वाटणार आहोत त्याची डिलिवरी घ्याचीय. हा सावताचा गण्या कुठ उलटलाय काय माहित मेला नेमका कामाच्या टायमाला गायब असतो. अमोल च्या डोक्यावर अक्षदा पडल्या शिवाय आता काय मला फुरसत नाय ………अरे देवा अक्षदा वरन आठवलं त्या अजून रंगवायच्या बाकी आहेत………शेवटी काय हो जगणं रंगात डूबवल्या शिवाय आयुष्याचा इंद्रधनुष्य उमटत नाही . 


- संतोष टाकळे 

वडा मला पाव ………!



करवंदाचा वाटा कितीला ? फणस दोघीत घेवूया का ग ? मी बाई वडाची फांदी घरातच  पुजते एवड्या पावसात  कुठे शोधू वड.तुझी पहिलीच वटपौर्णिमा असेल ना तू बाई वडावरच  जा पुजायला आमचं काय वय झालं आता ………. लाजतेस काय नवऱ्या कडून चांगली साडी घे मागून.   मधेच……… फांदी कितीला दिलीस ……… १० रुपये झाडाच्या पानाला पण काय मेला भाव आलाय . काळे मनी तेव्हडे राहिले . ते काय शर्माच्या दुकानात भेटतील. ………… सकाळी बाजारात कानावर पडलेला  सवांद ऐकला आणि अरे उद्या पौर्णिमा अशी उशिराची ट्यूब पेटली. 

सत्यवान आणि सावित्री यांच्या कथेवर आधारित हि पूजा ………… सुवासिनीच अमर वरदान ………. जन्मो जन्मी हाच नवरा मिळेल याचं conformation देणारं हे व्रत आमची हि वर्षांनी एकदा माझ्या पाया पडते तो माझ्या आयुष्यातला जागतिक सन्मान दिवस उद्या येणार आहे.  हि पण जाईल उद्या आमच्या सोसायटीच्या लेडीज  सोबत नाक्यावरच्या उघड्या मारुतीच्या देवळात . देवळाच्या पारावर भला मोठा वड आहे. तिथे होते हि पूजा अगदी साग्र संगीत. आमचं लग्न झालं त्या पहिल्या वर्षी मी पण गेलो होतो. स्मिता सोबत , पहिल्या वर्षी म्हणे नवरापण लागतो असल्या पूजेत . तिथे अजून ३ - ४ माझ्या सारखेच नवे कोरे नवरे आले होते. आम्ही सगळेच अवघडून उभे होतो. वडाभोवती गोल गोल फिरणाऱ्या आमच्या बायका मला सेल वर चालणाऱ्या बाहुल्या वाटल्या अगदी एका लयीत त्यांची पावलं पडत होती. अंगावरचे दागिने, जरीच्या साड्या, नाकातल्या नथी ,डोईवरचा पदर त्यातून डोकावणार गुलाबाचं फुल लटकणारे जुईचे गजरे, पार्लरचा उठून दिसणारा मेक उप इत्यादी आदी ……………… हल्लीच्या सणात ,व्रत वैकल्यात  show बाजी आलीय दागिने ,भारी साड्या ,जेवणावळी ,मोठाले मंडप , महागड्या वस्तू , असा भंपकपणा वाढला आहे. त्या मिसेस भंडारीनां बघा त्यांच्या नवऱ्याने ४ तोळ्याच्या श्रीमंत हार केलाय गेल्या दिवाळीत आणि तुम्हाला नुसती एक पैठणी आणायला सांगितली तर अजून मुहूर्त सापडत नाहीये  ( माझ्या सारख्या पेपरात बातम्या करणाऱ्या सामान्य पत्रकाराला १ ५ हजाराची पैठणी घ्यायची म्हणजे साला पुढचे ४ महिने चहा "पाणी" बंद करावी लागेल. ) 

मला काही क्षण आईची आठवण झाली. माळ रानावरच्या आमराईतल्या कित्तेक वर्ष जुन्या वडाखाली गावातल्या बाया जमत भारी नसल्या तरी ठेवणीतल्या साड्याचा काठ पदराची जरी चमचम चमकत असे. कपाळावरच्या ठसठशीत  कुंकवाचा अर्धा चंद्र , गळ्यातलं साध धग्यातल मंगळसूत्र सगळं अगदी खरं खुरं आजच्या रंगवलेल्या मेकउपच्या आड लपलेला खोटेपणा त्याकाळी नव्हता म्हणून तेंव्हा वटपौर्णिमा असो वा मंगळा गौर  चार जणी मनापासून एकत्र येत आजच्या सारख्या फक्त formality म्हणून नाही . कारण fashion म्हणून नऊवारी साडी नेसणं वेगळं आणि परंपरा म्हणून  नऊवारीचा पदर मानानं डोईवर चढवणं वेगळं . 

- संतोष टाकळे 

फेसबुक वाले……… !





फेसबुक म्हणजे फक्त times pass हा गैरसमज किमान माझ्यापुरता तरी दूर झालाय. …………. मागच्या आठवड्यात मित्राच्या लग्नात एक मध्यम वयीन गृहस्त भेटले. मी तुमचा fan आहे वगरे अशी त्यांनी फिल्मी सुरवात केली. मला काही कळेना मी म्हटलं अहो मी कुठल्याही मालिकेत काम करत नाही . तुम्हाला नक्की कुणाशी बोलायचं त्यावर ते थोडसं मोकळं हसत म्हणाले ते फेसबुक वाले संतोष टाकळे तुम्हीच ना ………(फेसबुक वाले हे खरतर जरा अति होतंय ) ………… मी उगाच जरासं हसून हो मीच तो बोला कि काय म्हणताय ………… तुम्ही ज्या पोस्ट केल्यात त्या फार आवडतात मला ……… हो का ? thank you so much …………मला ती तुमची साहेब ........पोस्ट खूपच आवडली. पवार साहेबांबद्दल तुम्ही किती उघड लिहिलंय त्यात …. सोबत वटपोर्णिमा , महिला दिन , मनसे आणि काल परवाच वाचलेली साडी घेताना उडालेली धम्माल तर काय विचारूच नका आमच्या madam ना पण आवडली ती ………… कुठे गेली म्हणत त्यांनी चक्क त्यांच्या madam ना लग्नातल्या रंगीबेरंगी गर्दीतून शोधून काढलं. त्याही अगदी सर हे छान लिहिलंय तुम्ही ……… ते तर मस्तच आहे . ………………………. तब्बल २ ० - २ ५ मिनिटे हा सोहळा चालला. मला उगाचच मोठा लेखक वेगरे झाल्याच्या गुदगुल्या झाल्या. तसही आज काल कुणीही भेटलं तरी FB च्या पोस्टचा विषय येतोच. अखेर निघतांना ते त्यांच्या १ ५ - १ ६ वर्षाच्या मुलाकडे पाहत म्हणाले सर याला तुमच्या सारखं पत्रकार बनवाचय मला ………बघतोस काय सरांच्या पाया पड तो पोरगा लगेच वाकला पण त्याने नमस्कार करावा इतका काही मी मोठा नाही. म्हणून मी त्याला थांबवलं . लिखाणातून व्यक्त झालेल्या विचारांनी मिळालेली हि ओळख आणि सन्मान भारावून टाकणारा असला तरी अधिक जबाबदारी देणारा आहे. याची जाणीव झाली.


या निमित्ताने सोशल नेटवर्किंग चा मिस युज करणाऱ्यांची आठवण झाली. मुलींचे प्रोफाईल हेरून त्यांना blackmail  करणारे , अश्लील फोटो उपलोड करून घाण करणारे, किवां अगदी उत्तराखंड मधे झालेल्या नैसर्गिक आपत्तीचा फायदा घेत. मदतीचा हात देतो म्हणत फेक पेजेस open करून लोकांकडून पैसा गोळा करणारे सुशिक्षित चोर या साऱ्यांनीच सोशल नेटवर्किंगची इमेज खराब केलीय. जग जवळ आणणारं हे प्रभावी माध्यम आज तुमच्या सारख्या मित्रांना जोडणारा स्मार्ट वे ठरलाय. पण काहींना हे फक्त Time PASS करण्याचं उनाड ठिकाण वाटतंय ………लोकांची मानसिकता बदलणं कठीण आहे. आपला प्रयत्न चालू ठेवूयात पाहूयात कधी घडतोय बदल …


- संतोष






साडी...........!




काल हिला साडी घ्यायला दादरच्या एका शोरूम मध्ये गेलो. येत्या आठवड्यात मित्राचं लग्न आहे. त्याचीच तयारी ………… १ तास झाला किमान ढीगभर  साड्या समोर येवून पडल्या त्यातल्या दोन तीन आवडल्या बाईना पण त्यातही अनेक गोष्टी खटकत होत्या उदा … अय्या हि डाळिंबी कलरची मस्त आहे नाई पण हिचा काठ उठून नाही दिसत ………… हि मोरपिशी पण बरी आहे . पण पदर फारच साधा आहे. नक्षीकाम कमी वाटतंय …………खरतर मला ना हि शेवाळी कलरची बनारसी पट्टी फारच आवडलीय पण जड बघा किती आहे, मी साडीच्या काठाला आतल्या बाजूने लावलेला किंमतीचा ट्याग पहिला …………Rs - ७ , ८ ० ० /- only . एव्हाना मला आणि साडी दाखवणाऱ्यालाही घाम फुटला होता. माझी नेमकी reaction त्याला उमजली असावी …………… तो म्हणाला madam मला वाटतं हि डाळिंबी कलरचीच तुम्हाला जास्त सूट होईल. price tag पहिला तर …Rs - २ , ५  ० ० /- only माझा आनंदलेला चेहरा पाहून सेल्समन म्हणाला साहेबांनाही हीच साडी आवडलेय या वेळेस त्यांच्या पसंतीची घ्या …………………… साहेबांची पसंती ……………. अहो मागे दिवाळीला आणलेल्या साडीचा कलर एका धुण्यात गेला  गोणता झालाय त्या साडीचा …………त्यांची कसली डोंबल्याची choices ………….…………. तरीही माझ्याकडे पाहत ती म्हणाली अहो सांगाना कोणती घेऊ हि ……… कि………  ती  ७ , ८ ० ० ची साडी त्या ढिगाऱ्याच्या खाली कोंबत मी म्हटलं तुला डाळिंबी कलर काय खुलून दिसेल नाई .



 ७ , ८ ० ० ते  २ , ५  ० ०  हि लांब उडी अचूक मारल्याच्या निखळ आनंद सोबत घेऊन शोरूम मधून बाहेर पडताना नेमकं काय फील केलं ते असं शब्दात मांडण कठीण आहे. 


- संतोष टाकळे 

टोम्याटो....!



दिवसभर ऑफिसच्या फायली उलटवून संध्याकाळी घरी जायला निघालो तर पावसाची रिप रिप सुरु होतीच स्टेशनला उतरतोय इतक्यात हिचा फोन आला. अहो ऐकलत का ? येताना जरा भाजी आणता का ? एक वेळ बॉसला मी नाही म्हणेन पण हिला ……… अजून तरी तेव्हडी डेरिंग नाही आली माझ्यात ……… हे पाव किलो ते अर्धा किलो हिची यादी वाढत गेली. हातात ब्याग ,छत्री आणि स्टेशनची तोबा गर्दी साला वैताग आहे …… अग मला मेसेज कर …. दुसऱ्या मिनिटाला यादी आली … १ किलो कांदे ,हिरवी मिरची , आलं , कोतीम्बीर , टोम्याटो , भेंडी , वांगी …… स्टेशनच्या दुतर्फा भाजीवाल्यांची लाईन आहे . त्यात घुसलो … पावसाच्या पाण्याने रस्त्यावर चिखलाची चिक चिक झालेली पण पावसात भिजून भाज्या मात्र ताज्या तवान्या झालेल्या. निळीशार वांगी बघताच क्षणी पसंत पडली आई काय मस्त भरलं वांग करायची …. स्मिताला नाही जमत तितकंस ……… पण हे तिच्या तोंडावर बोललो तर उद्या डबा काय साधा चहा मिळणार नाही ………आणि उगाच गालात हसलो मी ……वांगी झाली . आणि लगोलग भेंडी , कांदे ,आलं, मिरची , घेतली एव्हाना १ ० ० ची नोट संपत आली होती. टोम्याटो च्या गाडीवर गेलो आणि भाव विचारला …. भैया कैसा दिया टमाटर … भैया गिराहिकांच्या गरड्यात होता. दोन वेळा विचारल्यावर त्याने उत्तर दिलं साब १ ५ रुपये पाव …. बाप रे इतना महेगा त्याने कुतूहलाने मला निरखून पाहिलं क्या साब दोन दिन से याही भाव है …. स्मिताने यादीत टोम्याटो च्या पुढे १ किलो लिहल होत ना इलाज फटक्यात ६ ० रुपये उडणार मी बराच वेळ रेंगाळतोय हे भैयाच्या लक्षात आलं आणि तो खेकसला साब लेना है तो लो खाली टायीम खोटी मत करो ……… तुझे क्या इतनी जल्दी पडी है ……. दे ना १ किलो माझा आवाज चढला आणि त्याचा उतरला.

भाजीपाला घेऊन घरी पोहचलो तर madam मालिका पाहत होत्या. ओह्ह शिट how रबिश लग्न झालंय तरी हिचा बॉय friend , माझ्या हातातल्या पिशव्या तशाच मी भिजून गार पडत आलो होतो. आणि हिचं त्या मालिकेच्या लफड्यात लक्ष काय म्हणावं ............. भाजीच्या पिशव्या किचन मध्ये नेऊन ठेवल्या आणि हात पाय धुवून मी change करून बाहेर आलो तरी madam सोफ्याला चिकटलेल्या . मी केसातल पावसाळी पाणी टिपत होतो. मी म्हटलं आज बाहेर जायचंय का ? जेवायला ………. जेवणा शिवाय तुम्हाला काय सुचतं का ? पोट बघा किती वाढलंय ……… जेवण तयार आहे . फक्त टोम्याटोची चटणी करायची बाकी आहे …. अग पण ……. मी काही बोलणार इतक्यात तिने चार टोम्याटो कापून तव्यावर घातलेच …. डेरिंग करून मी म्हटलं अग टोम्याटो ६ ० रुपये किलो आहेत …… काय ती जवळ जवळ किंचाळीच बंडल नका मारू परवाच आणले मी ३ ० रुपये किलो होते . या महागाईला सुमार नाही हो … बरं हे किती ते किती रुपये किलो याची उजळणी तिने घेतली सगळे भाव चढे होते शेवटी ५ रुपयाचा कडीपत्ता …………. हे ऐकून तिचा पारा चढला ………. एक काम धड करत नाहीत तुम्ही कडीपत्ता विकत आणत का कुणी तो complimentary असतो. एवढी भाजी घेतल्यावर, …………… हल्ली बार मध्ये पण चणे ,वाटणे , चकली complimentary म्हणून मिळत नाही आणि तू …………… बस करा तुमची पत्रकारिता लगेच दाखले नकोत मला …………बघत काय बसलाय ताटं घ्या लवकर आराधना लागेल एवढ्यात आज पूजाला संभव ओळखणार आहे … मी कपाळावर हात मारला आणि ताटं मांडली …………पण त्या ६ ० रुपये किलो टोम्याटोचा विषय डोक्यातून जात नव्हता ज्याला शक्य आहे तो १ ० ० रुपये किलो झाले तरीही घेणार ………… आज माझ्या ताटात टोम्याटोची चटणी होती पण मी १ किलो टोम्याटो घेताना जे भाव विचारून न घेता परत गेलेत त्यांच्या डाळीत चवीला पण टोम्याटोची एक फोड नसेल याची हुरहूर मात्र मनाला लागून राहिली .
आणि वाटलं राहुल गांधी , मोदि किवां अगदी अडवाणी प्रधानमंत्री होवोत नाही तर न होवोत आम्हाला त्याशाची देणं घेणं नाही पण जगण्यासाठी दोन घास खाण्याचे जिन्नस तरी किमान आमच्या आवाक्यात असावेत……


बाकी तो मेरा भारत महान है ! 

- संतोष टाकळे

१ ५ वर्षाची आई ……… !



तिच्या कडेवरच पोर सावरत गजऱ्याचा झुबका पुढं करत ती म्हणाली साहेब घ्या वो गजरा पोराला उन्हात घेऊन किती वेळ उभी आहे . दुधा साठी तहनालय तसाही मोगऱ्याचा गंध रेफ्रेशिंग आहे आणि मला आवडतोही. गावाकडे पावसात मोगरा फुलाला कि नुकताच पाऊस पडून गेल्यावर थेबांनी ओल्या जार झालेल्या काळ्याचा मंद सुगंध साऱ्या परसदारी गुंगत असे …. या लहान वयातल्या आई झालेल्या मुलीचं आयुष्य अगदी असाच आहे . मुंबईतल्या फुटपाथ वर झोपड्या करून राहणाऱ्या या वाघरी समाजाचं काम खरतर गजरे , फुलं ,वेण्या आणि दर शनिवारी विक्रमी खप होणारा लिंबू -मिर्ची - विकणं . जया बेन त्यातलीच एक गेली २ वर्ष आम्ही तिच्याकडूनच गजरे ,हार , फुलं आणत असू काही महिन्यांपूर्वी ती वारल्याच कळलं तिच्या जागी कुणी एक नवी बाई फुलं विकायला बसली होती. अतिशय फटकळ घ्या नाही तर नका घेऊ अशा उद्धट भाषेत बोलणारी हि नवी बाई कोण याची माहिती काढली तेंव्हा कळलं हि जया बेनच्या नवऱ्याची दुसरी बायको. जया बेन ला जावून मोजून १ महिना झाला नसेल . ह्या माणसाने एका दुसऱ्या बाईशी लग्न केलं कमाल आहे बाई या माणसाची माझी ताई पुटपुटत पुढे सरकली मी भाजीच्या पिशव्या घेऊन तिच्या मागे मागे सेक्रेटरी गिरी करत फिरत होतो. इतक्यात समोर चंदा दिसली. जया बेनची लास्ट नंबर ची मुलगी निळ्या रंगाची भडक साडी त्यावर झगमगीत ब्लावुज , गळ्यात दोन तीन प्रकारचे नेकलेस , हातात लाल चुडा , केसात सायलीचा गजरा , चेहऱ्यावर नेहमी पेक्षा एक वेगळं तेज , ताई तिला बघून म्हाणाली काय ग पोरी बापाने आणि तू काय एका मांडवात लग्न केलत कि काय ? ती जरा लाजली आणि म्हणाली नाय ताई तो मेला कसला करतोय माझं लग्न मीच केलं हा बघ माझा नव्हरा तिच्या मागे एक १ ७ - १ ८ वर्षांचा तरुण पोरगा गजरे गुंफत होता. चंदाला शोभेल असा अगदी हसऱ्या चेहऱ्याचा उंच गोरा आणि विशेष म्हणजे इतर मुलांप्रमाणे याच्या तोंडात तंबाकू किंवा गुटका कोंबलेला नव्हता. मी सहज विचारलं काय मग लग्नाची पार्टी कधी त्यावर तो म्हणाला साहेब तुम्ही अमुक अमुक ऑफिसात काम करता ना मी जरा उडालोच बाप रे याला कस माहित मी म्हणाला हो पण तुला कसं माहित रे तुम्ही दुपारी ……खाली उतरता तेव्हां बऱ्याच दा पाहिलंय तुम्हांला मी म्हटलं हो का ? वा मग आज काय बायकोला मदत का ? चंदा गजऱ्याची फिरकी घुमवत म्हणाली साहेब आमच्यात नवऱ्याचा भरोसा नसतो आज सोबत आहे उद्या सोडून जाईल …

मातृ सत्ताक असणारा हा समाज आणि या समाजातल्या स्त्रिया अधिक आक्रमक असतात. त्यांच्या बोलण्यात चालण्यात एक हुकमीपणा असतो. नवरा असो नसो पोरांची जबादारी या स्वतंत्रपणे पेलतात. मागे जयाबेन मार्गशीष महिन्यात दारावर हार वेण्या विकायला आली होती. डोक्यावरची टोपली उतरवून दारात बसली ताईने पाणी दिलं मी घरीच होतो . सकाळची वेळ होती चहा उकळत होता. ताईने कपभर चहा दिला. चहा पीत पीत तिनं खूप गोष्टी सांगितल्या. चंदा आणि तिची एकूण ५ मुलं पहिल्या नवऱ्याची २ आणि या नवऱ्याची ३ सगळ्यांची लग्न झालीत चंदाच दोन महिन्यात उरकून टाकते. कापाळावरचा घाम पुसत ती म्हणाली एव्हड्या लहान पोरीचं काय म्हणून लग्न करतेस मेले ताई ने प्रश्न केला … काय करू बाई पोरगी बाहेर बसायला लागली रात्री उघड्यावर झोपल्यावर कुणी बी हात टाकील तिच्यावर या काळजीने झोप लागत नाही मला. रात्री ढोसून आलं कि मेल्यानं बायको दिसत नाही का बहिण ……… या विदारक परिथितिची जाणीव मला नव्हती मी अधिक माहिती विचारणार इतक्यात ती उठली टोपलं डोक्यावर घेवून निघाली पण तिच्या कुणी बी हात टाकील या वाक्याने मला अस्वस्थ केलं ………….आणि मी या विषयाच्या अधिक सखोल माहितीच्या शोधत लागलो. माझ्या ओळखीच्या काही फुलवल्या बायांशी सहज गप्पा मारता मारता माहिती काढली. आणि काही धक्कादायक गोष्टी समोर आल्या त्यापैकी अनेक इथ लिहिता येणार नाहीत ……… पण शारीरिक अत्याचार होणारा वयोगट ७ वर्षांच्या मुली पासून सुरु होतो. कित्तेक वेळा घरच्याच पुरुषाकडून हा केला जातो . बऱ्याचदा गुंगी देऊन तरुण पोरं मुलींशी संबंध ठेवतात … सरास मुलं व्यसन करतात त्यामुळे असे प्रकार करतांना त्यांना भान राहत नाही …… आमच्यात मुलगा किवां मुलगी कमवायला लागली कि ती स्वतंत्र होते त्यामुळे ते त्यांचा निर्णय स्वतः घेतात … नवऱ्याने बायकोला सोडणं हे आणि सोडलेल्या बाईने दुसरा नवरा करण हे फार नॉर्मल आहे. त्यामुळे वारसा हक्कावरून बऱ्याचदा वाद होतात. लहान वयात लग्न होतात आणि १ ५ - १ ६ वर्षाच्या पोरी गर्भार राहून त्यांना मुलं होतात . खूप वेळा ती मरतात आणि मग पोर जगे पर्यंत त्या पोरीच्या पोटाला विसंत नसते … काही वेळा वयाने जास्त असलेला माणूस कोवळ्या पोरीवर हात टाकतो . त्या पोरीला नाईलाज म्हणून त्याच्या गळ्यात बांधावी लागते ………

मुंबईत लोक पैशाचा पाठलाग करत अशा जगण्याला आयुष्य म्हणून स्वीकारतात फुटपाथच्या आडोशाला संसार थाटतात. परकर गुंडाळून लाज झाकत अंगावर दोन चार तांबे ओतत नव्या दिवसाची सुरुवात करतात , रात्रीच्या काळोखात अब्रूचे तांडव झेलून पदर पुन्हा खांद्यावर टाकत परिथिती स्वीकारतात , खेळायच्या वयात गर्भाच पोट सावरत आईपण अनुभवतात ……………
काय म्हणावं या जगण्याला आणि कडेवर पोर घेवून गजरे विकणाऱ्या त्या अर्धवट उमललेल्या आईला …

मातृ दिनाच्या शुभेछ्या !!

- संतोष टाकळे

फोटो प्रातिनिधिक स्वरूपाचा आहे .

प्रवास ...............!




प्रवास तसाही मला हवा हवासा वाटणारा जमेल तसं मी फिरत असतो. घरचे म्हणतात तू काय झोळी लावलीस कि निघालास पायाला भिंगरी लावल्यागत. उनाडक्या करायला तुला काय मुहुर्त लागत नाही. असो विषय आहे तो या प्रवासात भेटणाऱ्या माणसांचा काहीवेळा हि माणसं मनात कायमची घर करतात. तर काही अगदी डोक्यात जातात परवा अचानक गावी जायचा प्लान झाला . दापोलीच्या गाड्या नेहमी प्रमाणे फूल्ल . अखेर पनवेलवरून एका गाडीत जागा मिळाली. सकाळीच ब्याग भरून मी ऑफिसला आलो होतो. म्हणून थेट पनवेलला जायचं ठरवलं किमान ४ तास बाकी होते इतका वेळ माणूस वातानुकुलीत आणि तसही कम्फर्ट असलेल्या एअर पोर्ट वर बसून वैतागतो तर महामंडळाच्या डेपोत बसण्याची कल्पनाच न केलेली बरी….

काही दिवसांपूर्वी झालेला माझा नवीन मित्र पनवेलच्या जवळपास राहतो. त्याला फोन केला अतिशय उत्साही आणि दिलखुलास हा माझा FB friend . तो चक्क गाडी घेवून मला पनवेलला न्यायला आला. पनवेल पासून २ ५ मिनिटांच्या अंतरावर त्याचं खाडी लगतंच हे गाव. काही दिवसात चर्चेत येणार आहे कारण नवी मुंबईच आगामी विमानतळ याच्या घरा समोरच्या खारफुटीच्या दलदललिवर तयार होणार आहे . जागेचे भाव , इथल्या लोकांचा व्यवसाय,दनक्यात होणाऱ्या लग्नाच्या हळदी असे अनेक विषय चघळत असतानाच गाडी पाटील हाऊस समोर उभी राहिली मोजून हजार दोन हजार लोकवस्तीच हे गाव मागे बांधकामासाठी लागणाऱ्या खडी साठी पोखरलेले अर्ध्या जिर्ण अवस्थेतले राखाडी रंगाचे डोंगर, त्यावर खुरपटलेली काटेरी झुडपं , समोर विस्तीर्ण खारफुटीची खाडी ,त्याच्या अवती भवती नुकताच वसलेली मुंबईची उपनगरं आणि गावात उठून दिसणारी काही आलिशान घरं पाटील हाऊस त्यातलंच एक मी अगदी अचानक इथे आलोय आणि माझ्यामुळे यांची उडालेली तारंबळ उगाच मला काही क्षण अवघडल्या सारखं झालं त्यात हा पाटील बाजीरावा सारख्या ऑर्डर सोडत होता ये चहा ठेव , खायला काही तरी कर लगेच , हात पाय धुवायला पाणी काढ आणि घरचे निमुटपणे हुकुम पाळत लगबगीने सगळ्या व्यवस्था चोख करीत होते.

पाटील हाऊस मधले दोन तास आगरी पाहुणचार घेण्यात गेले . पाटीलने खास माझ्यासाठी फर्मान केलेला दुधाचा स्पेशल चहा , शेवयाची खीर आणि त्यावर कोल्ड ड्रिंक पाटलांच्या आईने जेवणाचा आग्रह केला चिकन -भाकरी आणि मच्छी असा मेनू होता. पण गाडीची वेळ होत आली होती निघणं भाग होतं निघताना पाटलांच्या आईने ब्यागेत खार ( फेण्या ,कुरड्या यांनी आगरी भाषेत खार म्हणतात ) दोन मोठ्या थंड पाण्याच्या बाटल्या आणि रस्त्यात भूक लागेल म्हणून दोन गरम गरम तांदळाच्या भाकऱ्या कागदात लपेटून दिल्या.मला इतकं काही अपेक्षित नव्हतं अगदी तासाभराची आमची ओळख पण वि स खांडेकर एका कादंबरीत म्हणतात आपलेपणा आपसूक येतो त्याला फक्त माणुसकीच्या काळीजाची आणि दिलदारपणाच्या हिमंतिची गरज असते.

दिवसभर धावपळीत उबलो होतो गाडीत बसल्या बसल्या डोळा लागला .थेट दापोलीत पोहचल्यावर जाग आली. पहाटेच्या गारव्यात रिक्षा घराच्या दिशेने धावत होती. घरचे तसेही लवकर उठतात बऱ्याच दिवसांनी हातावर मशेरी घेत दात घासले आईने चुलीतली राख काढली , हिरक्याच्या फाट्यावर रॉकेलची धार धरली आणि विस्तो पेटवला. चुलीवर काळ्या चाय चे आंदण ठेवून आई वाड्यात गेली. हातावरच्या मशेरीच बोट दातावर घासत धगधगणाऱ्या विस्तावाकडे पाहताना मनात विचार आला आयुष्यात पैसा गरजेला आहे . पण हि लाख मोलाची माणसं कायमची टिकून रहावीत अगदी शेवटच्या प्रवासापर्यंत ………

- संतोष टाकळे

बहर मोसमी .........!



संध्याकाळ तशीही रम्य असते . या उन्हाळ्यातला सूर्य तळपून मावळताना वाऱ्याची हलकीशी थंड झुळूक अंगाला शिवून जावी आणि सोबत कुणी तरी खास असावं काल्पनिक नव्हे अगदी खरं खुर पार्कातल्या गिरीकंदाच्या झाडा खाली पिवळ्या धम्मक फुलांचा सडा पडलेला. बाकड्या वरची धूळ एका फुंकरीत उडवत तो म्हणतो बस ना ती म्हणते आधी तू बस .......
साफ केलेल्या जागेच्या जवळपास हा पठ्या बसतो आणि ती जरा मंद हसत अलगद बाकावर बसते केसांचा डोळ्यावर आलेला झुबका मागे सारत ती म्हणते फेसबुक वर कित्ती फोटो टाकतोस काम करतोस कि नुसता भटकत असतोस तो दिलखुलास हसतो आणि तिच्या लायनर ने कोरलेल्या डोळ्यात पाहत म्हणतो I love photogharphy and you too ........... ती चेहऱ्यावर असंक्य प्रश्नार्थी expresition
आणून अस आज पर्यंत किती मुलींना म्हणालास …. तुझ्या frindlist मधल्या काही मुली माझ्या ओळखीच्या आहेत सो खरं उत्तर दे … तू आता माझी CID चोकशी करणार का ? नाही रे chill यार जस्ट किडिंग …. चल डोक्याला शॉट घेवू नकोस लेट्स have coffee at CCD ….

शहरातल्या या उलट आमच्या गावातली भेट लय भारी तिच्या मैत्रिणीला गाठून सेटिंग लावायची मग वेळ आलीच तर तिला बहिण मानून तिला गळ घालायची आई शपथ माझ प्रेम आहे तिच्यावर आज तिला घेवून ये ना महालक्ष्मी मंदिराच्या सोमारच्या डोंगरावर संध्याकाळी ५ नंतर ये मी आणि अवि येतो तू मंदिरात पाया पडून डायरेक्ट टेकडीवर ये मागच्या बाजून ये बाई देवळाच्या समोरून नको साला लफडा होयिल नाही तर …………अव्या ४ वाजताच हजर होतो . काय रे तुझी गाडी आणायला सांगितली होती ना हलकटा तो नेमहीप्रमाणे रडतो नाही रे बाबा नाही म्हणाले मग सायकल घेवून बाहेर पडलो. आवर लवकर हेमा आणि वृषाली अत्ताच गेल्या महालक्ष्मी रोडवर दिसल्या मला इकडे हा बाजीराव तोंडाला खाकी पावडर हळुवार हात फिरवत फासून घेतो . अत्तराचा बोळा कानात खोवतो ठेवणीतला मस्त पिस्ता कलरचा शर्ट कडक इस्त्री मारून प्यांटच्या आत कोंबतो . दोन तीन वेळा शर्टाची इन नीट बसवतो. आणि मग अव्याच्या सायकलीवर बसून टेकडीच्या दिशेने हवेत विरघळत मनात उकळ्या फुटणारी प्रेम गीतं गुणगुणत शेवटी ठरलेल्या ठिकाणी पोहचतो. हेमाला नी तीला म्हसोबाच्या जाळीच्या कोपऱ्यात पाहून हुश्ह्ह करत दबकत चार पावलं पुढं सरकतो अव्याच्या खांद्यावरचा हात काढत त्याला डोळ्याने खुणावतो आणि अव्या हेमाला घेवून बाजूला जातो आज हिला फायनलच विचारतो म्हणत हा थेट विषयाला हात घालणार इतक्यात … तिच्या कपाळावर लावलेलं देवीच्या मंदिरातलं कुंकू त्याला काहीक्षण भुरळ घालतो माझ्या नावाचं लावशील का ग कुंकू हे न ठरवलेले वाक्य तोंडातून बाहेर पडत आणि ती काहीशी बावरते तिच्या गोऱ्या रंगाच्या गालावर थोडी लाली चढते हा पुन्हा भानावर येत ये तू मला अगदी मनापासून आवडतेस तात्यांना सांगून मी रीतसर मागणी घालीन तुला बोल तू काय उत्तर …… बोटात ओढणीचा काठ ताणून ती फक्त हसते आणि हेमाच्या मागे लपते याला त्याचं उत्तर मिळालेलं असतं हा गावरान आंबा मोहरतो अगदी पानोपानी त्यालाला कितीतरी मोहर गळतो करपतो पण यातूनही टिकलेल्या मोहरला कैऱ्या लागतात आणि मग त्याचाच आंबा होतो .
पण या शहरातल्या गिरीकंदाच्या झाडाचा बहर मोसमी असतो नुसता डोळ्यांना सुखावणारा show बाज …………. अगदी बोन्साय सारखा …


- संतोष टाकळे




आयुष्य तेच आहे ………



काल मातोश्री वृद्धाश्रमातून निघताना ज्या गाण्याच्या ओळी सहज मनात आल्या त्या ……

रूठ के हमसे कभी जब चले जावोगे तुम 
ये न सोचा था कभी इतना याद आवोगे तुम ...... 

चहरे जितक्या प्रभावी बोलतात . ते समजून घ्यायची शक्ति मात्र अपुरी अणि मर्यादित आहे. जे काल प्रकर्षानं जाणवलं , मोह - माया- ममता यांची भूक अनुभवतांना जगणं किती अदभूत आहे याची प्रचीती आली. मातोश्रीच्या प्रांगणात हिरवळीवर सांडलेले पाण्याचे थेंब जितक्या अनिश्चित स्वरूपाचे आहेत. तसंच काहीसं इथल्या हर्षील जगण्याचं आहे. मऊशार गादीवर अंग टाकल्यावर घरी जशी निवांत झोप लागते तशी ग्लानी मात्र इथ येत नाही. सतत भिरभिरणाऱ्या नजरा कुणाच्या तरी शोधात असतात , लोकरीचं विणकाम करणारे हात झटापट चालत असले तरी मनाची विरहाची झुंज मात्र निवांत एकाकी लढत असते कुठल्याही शत्रा शिवाय…. 

बांगड्या जुन्या झाल्या लेका कासारीन येणार आहे आज चांगल्या डझनभर भरीन म्हणते डाळींबी रंगाच्या………. ,हल्ली होत नाही माझ्याने नाहीतर तुला छानसा रुमाल विणून दिला असता मी अगदी एका तासात …………. , आम्ही सकाळी योगा करतो ते पण डॉट ६ च्या ठोक्याला बाई खूप चंगल्या आहेत आमच्या ………. , .ती कोपऱ्यावरची रूम आहे ना ती आमची तुम्ही जेऊन घ्या आधी आणि मग या गप्पा मारू तेव्हडच मन मोकळं करता येईल ग … , चार महिने झाले काका जाऊन आता मी एकटीच आहे पण हि आहेत ना माझी माणसं यांनीच केलं हो माझं सगळं दुसरं माहेरच आहे हे माझं ( पदराचा कोपरा थोडा ओला झालाच आपसूक ) ,………… मी सरकारी नोकरीत क्लास वन ऑफिसर होतो. मुलं परदेशात असतात मी इथं रमलोय अगदी मजेत जगतोय ………, असे अनेक सवांद मनात गुंतून राहिलेत तेही कायमचे … 

वसंत आजोबा म्हणतात तस आपण लोकांची दुःख उगाळीत बसण्यापेक्षा आनंद वाढवयाला हवा . मातोश्रीच्या या भेटीत भावनिक झालरीच्या किनारीत आनंदाचा मोर काही वेळ नाचून गेलाच लक्ष्मी आजीची  शेरो शायरी , शहा आजोबांनी गंमती जमती सांगत पाजलेला ग्लास भर चहा , मंदा आजीने गायलेल थरथरत्या पण लयबद्ध स्वरातलं " हर किसीका नसीब "  हे गाणं …… पुन्हा या हा होणारा ह्रिदयपर्शि आग्रह आणि उद्या ऑफिसला जायचंय या वास्तविकतेने  पुन्हा भानावर आलेलो आम्ही सगळेजण. 

कदाचित इथं आलेलो आम्ही मातोश्री आश्रमच्या शेजारून वाहणाऱ्या नदीच्या प्रवाह प्रमाणे आहोत ज्या घाटावर गोतावळा दिसेल तिथं थोडं संथ व्हावं आपल्या जाण्यातला गारवा त्यांनाही द्यावा आणि नियती प्रमाणे पुढे प्रवाहित होत राहावं कारण … 

आयुष्य तेच आहे 
अन हाच पेच आहे ............

- संतोष टाकळे 

जत्रा .......... !





हनुमान जयंती आली कि जत्रांची सुरवात होते याच दिवशी बऱ्याच जत्रा असतात . गावागावातला हा मोठा उत्सव  सारं गाव यात गुंतून जात गाव देवीच्या मंदिरा समोरची हि जत्रा तशी पारंपारिक अगदी पूर्वजांनी सुरु केलेली.  हि प्रथा आजही कोकणात - घाटावर आणि महाराष्ट्रात सुरु आहे . कोकणात जत्रेला शबिना - छबिना अशी जुनी नावं आहेत. कोकणात गावदेवीची काठी ( कळकाच्या उंच काठ्या सजवून तयार केलेलं उंच निशाण ) वाजत गाजत इतर गावतल्या देवांना भेटायला जाते.  यातही खूप साऱ्या दंत कथा आहेत त्यापैकी कोकणातल्या लाटवण गावातली जत्रा बगाड लावून साजरी होते.  बागाड्याचा माणूस जत्रेच्या दिवशी पहाटे जंगलात जातो तो दिवसभर कुणालाही दिसत नाही. त्याच्या सोबत बळी द्यायचा बकरा असतो. दिवसभर उपाशी पोटी या माणसाने जंगलात राहून देवाच्या या बोकडाची सेवा करायची आणि मग तिन्ही सांजेला गावकरी बाजा घेवून या बगाड्याच्या माणसाला न्यायला येतात आणि मग जंगलातून मिरवणूक निघते बळीच्या बोकडाला आणि बगाड्याच्या माणसाला हार टिळा लावून गावाच्या वेशीवरून देवळात आणलं जातं त्याची यथासांग पूजा केली जाते. आणि मग मानकरी देवाला कोल लावतो आणि मानाचा बकरा कापला जातो ( सध्या बकरा देवाच्या नावाने सोडला जातो ) लोक या बगाड्याच्या माणसाच्या पाया पडतात आणि हा मग बागाड्यावर मध्य रात्री पर्यंत तो लटकत असतो. 

इकडे खेळण्याची दुकानं खचाखच भरलेली , बटाटे वडे , कांदा भजी , जलेबी , खाजा आणि तत्सम अनेक पदार्थांचे रुचकर वास त्या त्या दुकानाकडे गिराईकांना ओढत असतात, तंबूत सिनेमा बघायला लोक लायनीत उभे असतात , कुणी मिठाईच्या दुकानात फुकटात मिठाया चाखत भावात घास घीस करताना दिसतो. तर नुकताच लग्न झालेलं एखादं नवीन जोडपं लपून छपुन ice cream एकमेकांना भरवताना  त्या नव्या नवरीचा चेहरा लाजून काय फुललेला असतो .म्हातारी जाणती पारावर बसून गावाच्या नळा पासून ते थेट कोयनेच्या धरणा पर्यंत सगळ्या विषयांवर आपली भूमिका मांडत असतात. विडीचा एक झुरका मारून यांचा उत्साह अधिकच वाढत जातो .इतक्यात कुणी तरी मानकऱ्याच्या बायकोच्या अंगात आल्याची खबर घेवून येतो. लोक आहे त्या जागेवर टाचा वर करून देवळाच्या कठड्यावर घुमणाऱ्या मानकरणीला पाहतात चक्क गाव देवी तिच्या अंगात आलेली पाहून बाय बापडे तिच्या समोर हात जोडतात आई सांभाळ या लेकराला म्हणून इथूनच नमस्कार करतात काही लोक थेट कठड्याच्या जवळ जावून डोकं टेकवून आशीर्वाद घेतात गुरव वाजंत्र्यांना इशारा करतो घुमावा घुमावा आता मी आरती घेतो म्हणत खुद देवीच्या आरतीच्या ताटात धूप कापूर पेटवतो आणि  वाजंत्री त्यांचा स्लो ठेका बदलतात आणि जरा धावता ठेका धरतात मानकरिन जोरात घुमते गुरव तिची आरती करतो देवळातल्या कश्याच्या तांब्यातल पाणी मारून देवीला शांत केलं जात. आणि मनाची ओटी घेवून मानकरिन खाली उतरते.गाव देवाच्या जत्रेतला हा जागर असाच चालू असतो सकाळ उजेडे पर्यंत ………. 


 जत्रा आली कि ते  दिवस आठवतात लहानपणी आम्ही जत्रेसाठी पैशांची जमवाजमव करत असू कधी पार लांब रानात जावून काजूच्या बिया गोळा करायच्या आणि त्या विकायच्या किवा मग घरी न कळता कुठे तरी गुपचूप मजुरी करून पैसे कमवायचे सारं काही या जत्रेसाठी तेंव्हा बाबा १० रुपये द्यायचे आणि आम्ही जमवलेले २० एक रुपये या वीस तीस रुपयात जमतील तेवढी खेळणी घ्यायची गरगरणारा भोवरा ,पी पी करणारी पिपारी ,जादूचा आरसा ,पाण्याचा फुगा ,तलवारी ,बंदुका इत्यादी .मग बाबा देवाच्या पाया पडायला नेत असत त्या तोबा गर्दीतून बाबा माझा हात घट्ट पकडून ठेवत त्यांची ती काळजी आजहि तशीच आहे मागे मी पहिल्यांदा विमान प्रवास केला तेंव्हा तर त्यांनी एका दिवसात मला तब्बल १० ते १२ वेळा फोन केला. 

जत्रा खरी रंगात येते ती मानाची काटी (एक लांब लचक काटी जिला सजवले जाते आणि तिच्या वरच्या टोकावर देवाचा झेंडा लावला जातो ) आल्यावर जोरजोरात ढोल बडवले जातात.  लोक काटीला उभी करण्यासाठी जीवाचा आटापिटा करत असतात तर यात्रेत पोर पोरींना बघून मुद्दामून पिपाणीचा आवाज करत चार शिव्या खावून घेतात .आम्ही मात्र खेळण्याच्या दुकानासमोर घुटमळत काय नवीन मिळतंय का ? आणि उरलेल्या पैशात ते भागेल का ? याच्या विचारात पार टोकाच्या दुकानापर्यंत पोहचत असू , मग कुणी ओळखिचा भेटला कि आम्हा पोरांना तो सरबत पाजत असे कुणी वडापाव देई तस विकत घेवून खायची कधी वेळ आली नाहि कुणी काका - मामा  देणारा मिळेच. 

मी मागच्या वर्षी जत्रेला गेलो होतो. परत एकदा ते दिवस आठवले त्या दिवसात २० रुपये कमवायला दिवसभर लोकाकडे राबायला लागे , वेड्यासारखे ४ बिया जमवायला कट्या कुट्यातून आम्ही रानभर फिरायचो .आज हजाराच्या नोटा पाकिटात आहेत.  पण ते दिवस नाहीत माझ्या सोबत माझा भाचा ओमकार  होता त्याला घेवून मी जेंव्हा खेळण्याच्या दुकानावर गेलो तेंव्हा त्याचा तो जोश ,आनंद ,खेळणं मिळवायची धडपड ,आणि चेहऱ्यावर उमटलेले ते भाव मला त्या दिवसांचा आनंद परत  देवून गेले.  पण कधी कधी वाटतं सगळं काही विसरून मस्त लहान व्हावं खूप खेळावं अगदी गावभर भटकून यावं त्या जुन्या मित्रांमध्ये पुन्हा रामाव लगोरी ,विटी दांडू ,डोंगर का पाणी, गोट्यांचा डाव मांडावा खेळता खेळता दिवस मालवावा आईची हाक यावी तीन्हीसाजी शुभंकरोती म्हणावी रडत खडत एकदा धडा वाचत वहीत अभ्यास लिहून काढावा आईच्या हातची चुलीवरची गरमा गरम भाकरी रस्सा भाजी तोंड लावणीला सोबत मिर्चीचा ठेचा आणि रात्री रंगीबेरंगी सुती गोधडीच्या उबेत आईच्या कुशीत बिंदास झोपून जावं कदाचित ते दिवस परत मिळवता आले असते. पण ते तितकंसं सोप्पं नाही आपण मुंबईच्या या मायावी जत्रेत स्वतः हून असे हरवलोय कि आपल्या घरचा खरा पत्ता मिळूनही आपली पावलं त्या रस्त्याकडे वळत नाहीत मनात कितीही ओढ असली तरी ………………………

- संतोष टाकळे 

लग्नाची सनई ............!





मागच्या आठवड्यात घरी जावून आलो १ दिवसाची धावती भेट होती. सगळेजण एकत्र असताना वेळ फार लवकर जातो राव.गोड तिखट जेवणा सोबत अनेक विषय निघाले आणि अपेक्षेप्रमाणे माझ्या लग्नाचा विषय आलाच . बजेट, ठिकाण, पत्रिका, पाहुणे आणि सर्वात खर्चिक असणारा बस्ताचा विषय निघाला ( लग्नाचे आणि मानपानाचे कपडे ) इतक्यात अपर्णा (माझी ४ नंबर ची बहिण) म्हणाली तुझ्या लग्नात मी पैठणी घेणार ते आदेश भावोजी देतात ना त्यातली. बाप रे १ साडी ७ ते ८ हजारांची एकूण ५ बहिणी म्हणजे आठ पंचे चाळीस क्याल्कुलेटरने हि मोठी फिगर काही सेकंदात दाखवली त्याला काय फिगरी दाखवायला पण आमचं बजेट बिघडणार होत मला काही वेळ अपर्णा पैठणी नेसून मांडवात फिरताना दिसली पैठणीचा पदर हवेत उडवत ती आलेल्या पाहुण्यांशी बोलत होती .अहो संतोषने घेतली पैठणी त्याच्या लग्नात ८ हजाराची आहे हो मी म्हटलं कशाला एवढी महाग मला आपली साधी साडी सुद्धा चालेल पण तो एकतोय त्याने घेतलीच आणि तशीही मला घ्याचीच होती. हि फक्त लग्नात नेसायला घेतलीय रिसेप्शनला अजून एक घेतलेय चटणी कलरची ती सुद्धा मस्त आहे कांजीवरम स्लिक तो दुकानदार तिचे ४ हजार घेवून बसला होता मी म्हटलं साडेतीनला देतोस तर दे आता एवढी खरेदी केल्यावर काही डिस्कावुंड नको का ? काहीवेळ मंद शांतता तेवढ्यात बाबा म्हणाले हरकत नाही तुझ्या लग्नासाठी ११ लाख ठेवलेत त्यात हे ४० हजार म्यानेज होतील मी जरा उडालोच ११ लाख बाबा उगाच मस्करी करू नका त्यावर त्यांनी पोस्टाच्या किसान बचत पत्राच्या ३ पावत्या समोर ठेवल्या ५-५ लाखाच्या दोन आणि १ लाखाची १, काही वेळा पूर्वी फक्त २ ते ३ लाखात लग्न उरकूया म्हणणारा मी आता हॉल मधून थेट लॉन मध्ये पोहचलो होतो एव्हाना मनात लग्नाचा ग्रांड सेट तयार झाला होता .LCD ,ऑर्किड आणि अशा तत्सम परदेशी फुलांनी सजवलेला स्टेज ,मुंबईच्या मित्रांसाठी राहायला दापोलीतल महागडं हॉटेल ,मराठी जेवणा सोबत जरा इटालियानो ,थाई ,निदान चायनीज तरी हवं असे अनेक महागडे चोचले २०० च्या स्पीडने मनात येवून गेले
.

पैशाच्या हिशोबात लग्नाची सनई अधिक जोरात वाजू लागली आणि हळदी शिवाय चेहरा अधिकच खुलला मनात अनेक हळुवार कारंजी वरखाली उडू लागली आईने जवळ घेतलं पोरगा मोठा झाला म्हणत पाठीवरून हात फिरवला बाबांनी लगेच गावात बोलणी करायला हवी म्हणून सरपंचाना फोन लावला सगळं कस गजबजून गेल. भाच्या भाच्यांनी मामाची मामी कशी आहे रे गोरी कि काळी म्हणत अंगणात गोगाटा केला तर मित्रांनी साल्या आज बसुया रात्री म्हणत हक्काची पार्टी लागू केली. आई अजूनही शांत निवांत मागच्या दारात बसून एक टक पुढच्या दाराकडे पाहत होती कदाचित तिला तिचा गृहप्रवेश आठवत असेल अवघडल्या मनाचा कल्लोळ ,भरजरीचा पदर , तोळ्याच्या हिशोबातले दागिने ,लाजत घेतलेला उखाणा ,आणि नकळत झालेलेला त्यांचा स्पर्श अगदी जसाच्या तसं कदाचित ती अनुभवत असेल तिच्या ओल्याशार भिजलेल्या पापण्यान मधून सुनेच्या रुपात .................




- संतोष टाकळे


फोटो प्रातिनिधिक स्वरुपात असल्याचं लक्षात असूद्यात ...

आम्ही कॉपीकर ......!



मराठीत येणाऱ्या नव्या मालिका हिंदीमधून कॉपी केल्याचं स्वतः प्रेक्षक बोलतात पण दिग्दर्शक मात्र याला ठाम विरोध करतात मराठीत सध्या सर्वात जास्त TRP खेचणारी पुढचं पाऊल स्टार प्लसच्या साथ निभाना साथियाची कॉपी आहे हे शेंबड पोर सांगेल. नुकतीच सुरु झालेली देवयानी सुद्धा प्रतीग्याची कॉपी आहे हे स्पष्ट आहे. याची यादी द्यायची झाली तर
एका लग्नाची दुसरी गोष्ट - बडे अच्चे लगते है I
लक्ष - CID 
सुवासिनी - बालिका वधू
अनोळखी दिशा - आहट आणि अशा कित्तेक हिंदी मालिका
अजून बरीच उदाहरणं देता येतील आपल्याकडे कॉपी करणं सरास झालं आहे .पण एक मात्र खरं आपल्या मराठी कलाकाराचा अभिनय मात्र तोडीस तोड आहे पुढचं पाऊल मधली हर्षदा खानविलकरांची अक्का बेस्ट , तर देवयानी मधाला संग्राम तोडून टाकतो म्हणजे कोल्हापुरी भाषेत सागायच तर छावा तलवारीगात भिंडतो.

पण खरच हे कॉपी करणं थांबवलं पाहिजे. काही तरी नवीन होत नाही अस मी म्हणणार नाही कारण मराठी अजय अतुलच्या गाण्यावर आम्ही कतरिनाला नाचावालय, जोगवा ,नटरंग ,देऊळ श्वास सारख्या चित्रपटांनी राष्ट्रीय पुरस्कार पटकावलेत. आपल्या मराठीपणाचा बाज कायब राहिला पाहिजे पुढचं पाऊल कॉपी आहे म्हणून गाजावाजा झाला .आणि पुन्हा आपल्या कार्यक्षमतेवर कुणीतरी बोट ठेवलय पण मला खात्री आहे. लवकरच हे चित्र बदलेल.

- संतोष टाकळे
Sanntosh Taakale


मास्तरकी........ !




मागच्या आठवड्यात रोह्यावरून कुलकर्णी सरांचा फोन आला. त्यांच्या मास मिडिया विभागात गेस्ट लेक्चरर म्हणून जायच होत .मी लगेच हो म्हटलं गेल्या काही वर्षात मुंबईतल्या अनेक कॉलेजात मी गेस्ट लेक्चरर म्हणून जावून आलोय पण ग्रामीण विभागातला हा पहिलाच अनुभव कॉलेज कस
असेल मुलांच्या नेमक्या काय अपेक्षा असतील असे अनेक प्रश्न साहजिकच आलेच पण तशी तयारी करूनच मुंबईतून एस टी पकडली रस्ता तसा ओळखीचा होता कारण हाच रस्ता माझ्या गावी जातो. मुंबई सोडली आणि मनावरचा थोडा शीण हलका झाला काही वेळ आपण मोकळा श्वास घेतोय याची जाणीव झाली.

महामंडळाची बस तशी वेगात चालू होती पण मलाच निघायला उशीर झालेला म्हणून साला गाडी पळततच नाही अशी चिडचिड चालू होती शेवटी काय होयील ते बघू म्हणत भीमराव पांचालांची गजल ऐकायला लागलो मी किनारे सरकताना पहिले माझी सर्वात आवडती गजल लागोपाट ४ वेळा ऐकली आणि इतक्यात गोरे सरांचा फोन आला. गोरे सर भाषा आणि अभिभाषा हा विषय शिकवतात आज त्यांच्याच घरी माझी रहायची व्यवस्था होती घड्याळ पाहिलं तर १० वाजलेले अजून किमान १ तास लागेल आणि त्यापुढे अजून १ तासाचा रस्ता बाप रे म्हणजे १२ वाजणार इतक्या उशिरा कोणाच्या घरी जाणं बर दिसत नाही मी गोरे सरांना मेसेज केला एवढ्या रात्री तुमच्या घरी कसं जावं इथे कूठे हॉटेल असेल तर तशी व्यवस्था कराल तर बर होयील पण गोरे सर ऐकायला तयार नव्हते शेवटी माझ्या पुढे पर्याय नव्हता ११ वाजता इंदापूरला उतरलो सर गाडी घेवून आले होते मी त्यांना सॉरी म्हणार इतक्यात तेच म्हणाले सर काही प्रोब्लेम नाही अहो मुंबईला तुम्ही सगळेच इतके गुंतलेले असता तरीही तुम्ही येतो म्हणालात आमचं अहोभाग्य मी आपला उगाच जरा हवेत उडून घेतलं आहे बाबा आपली किमंत म्हणत उगाच मानेला हलकासा झटका देत केस उडवले. थोडं फ्रेश होत पुन्हा तळा ३५ किलोमीटर दाखवणारा मायील स्टोन पार करत एक तासाचा प्रवास सुरु झाला. रस्ता जबरी होता अगदी नवा कोरा नुकताच घोटाळ्यात अडकलेल्या आणि साहित्याची विशेष आवड असणाऱ्या करे काकाचं हे गाव काही वेळ काकांनी पैसा जनहितार्थ वापरला कि काय अशी शंका आली पण मग कळलं हा रस्ता मुरुड जंजिरा दिशेने जातो आणि सध्या तिकडे एक नवीन पोर्ट तयार होतय त्याची हि सगळी जादू बाकी करे काका इतके काही वाईट नाहीत हो - इति गोरे सर

तुफान थंडीत गोरे सर ४० च्या स्पीड ने गाडी चालत होते एकवेळ माझ्या मनात आल गाडी आपण घेवून स्पीड वाढवूया पण सर पाहुण्यांना बोलता याव जास्त थंडी लागू नये अशी काहीशी काळजी करत गाडी चालवत असावे. घुर घुर करत अखेर सरांच्या घरी पोहचलो एवड्या रात्री गावात लोकांची मध्यान झालेले असते गोरे सरांच्या घरीही सगळे झोपले होते अर्थात पाहुण्यांना यायची देखील वेळ असावी मी स्वतःलाच दोन शिव्या घालत हसडल आणि घरी शिरलो सरांचे बाबा अण्णा लगबगीने उठले तांब्याभर पाणी देत कसा झाला प्रवास वेगरे विचारपूस केली एवढ्यात सरांची आई पुन्हा चूल पेटवून जेवण गरम करताना दिसली त्यांना झोपेतून उठवून इतक्या कडाक्याच्या थंडीत धावपळ करताना पाहून मला इतकं वाईट वाटल खरच ते शब्दात सांगता येणार नाही. तू एवढा कोण लागून गेलास तुझ्या वागण्याला काय सुमार एवढ्या थंडीत या माऊलीला त्रास देतांना तुला जराही लाज वाटली नाही का रे असे अनेक खडे सवाल मी स्वतःलाच जरा दमात विचारले पण इलाज नव्हता दोन घास कसे बसे खाल्ले आणि सरळ लांब झालो. सकाळी लेक्चर होतं म्हणून आणि अर्थात लवकर उठाव लागणार होतं पडल्या पडल्या कधी डोळा लागला काही माहित नाही सकाळी चुलीवरच्या कोऱ्या चहाच्या वासाने डोळे किलबिलत उघडले तर सरांची आई चुलीवर भाकऱ्या करत होती एवढ्या सकाळी कोण खाणार भाकऱ्या असं विचारणार तर गोरे सर सोमर उभे सर उठा पाणी काढलंय अंघोळीला गरम गरम चहा आणि भाकरी सोबत झुणका केलाय आईन चहा आणि बेकरीतल्या पावावर सकाळ होणारे मुंबईकर सकाळी भाकरी खातील अस वाटत नाही बुवा अण्णा माझ्याकडे पाहत म्हणाले पण मी दाबून दो भाकऱ्या संपवल्या. आणि सरांसोबत थेट कॉलेजात .

साग्रसंगीत स्वागत वैगरे झालं गोरे सरांनी इतरांशी ओळखी करून दिल्या माझा परिचय झाला आणि लेक्चर सुरु झाल. काही वेळ बोलल्यावर माझ्या लक्षात आलं कि मुलाच्या चेहऱ्यावर थोडा संभ्रम आहे त्यांना नेमका कळतंय कि नाही हे तपासून पाहायला हव आणि मधेच थांबत मी मग थेट संवाद साधला एकेकाला बोलत केलं पण मला वाटली तितकी हि मुलं मागे नव्हती त्यांचे कित्तेक प्रश्न मला काहीवेळ विचार करायला लावणारे होते . पु ल पासून ते ए पी जे अब्दुल कलाम यांच्या अग्निपंख पर्यंत आणि इरावती कर्वे यांच्या युगांत पासून ते बराक ओबामांच्या Change We Can Believe In पर्यंत सारं काही काळजी पूर्वक वाचलेलं कोणताही संधर्भ विचारा किमान ५ - ६ बोटं वर येतील माझ्या साठी अचाट होत हे पण माझ्या गेल्या ६ वर्षाच्या करीयरची कसोटी होती. मी पण माघार घेणार नाही अस ठरवलं आणि किमान १ तास दिलेला असतानाही आम्ही पावणे दोन तास गप्पा मारल्या मुळात मुलं खूप मोकळी झाली बोलती झाली. मी thank you so much म्हणून बसतोय इतक्यात मास मिडिया चे Vice President कुलकर्णी सर डायसवर आले त्यांनी फार कवतुक केलं काही क्षण गहिवरून आलं संघर्षाच्या त्या सगळ्या लढाया आठवल्या बाबांचा २वर्षाचा अबोला , बातमीसाठी उन्हातानात वडापाव चावत फिरताना कशाला नोको त्या भानगडीत पडलो म्हणत वैतागत केलेली पायपीट , फक्त २ हजाराचा सकाळ पापेरच्या बातम्यांचा चेक हातात आल्यावर एवड्यात कस भागवणार म्हणत झालेला स्वतःचाच तळतळाट , महागडा शर्ट नाही म्हणून चुकवलेल्या अनेक पार्ट्या , आणि वरखर्चाला पैसे मिळावेत म्हणून रात्री उशिरा पर्यंत बड्या लग्नात केलेलं वेटरच काम सगळा भूतकाळ सरसर डोळ्यासमोरून गेला आणि "कोशिश करने वाले कि कभी हार नही होती" या ओळी आपसूकच ओठांवर आल्या.

लेक्चर चागलं झालं याच समाधान होतंच लगेच परतीच्या प्रवासाला लागूया अस मनात आल पण सकाळी भाकरी खाताना गोरे सरांची आई म्हणाली लेका आलास तर दुपारी दोन घास खावून जा मटन बनवते सत्तरी पार केलेल्या त्या मावूलीचा शब्द मला मोडता आला नाही. गोरे सर देखील खूप आग्रह करत होते शेवटी दुपारी मटणाचा बेत उरकून पुन्हा मुंबईचा रस्ता धरला संध्याकाळ मोकळ्या हवेत अधिकच अंधारत होती डोळे पेंगत होते हवेतला गारवा मनात रेंगाळत होता. सोबत होती ती या निम्मिताने भेटलेल्या त्या सर्वच गोड आंबट आठवणींची आणि इतक्यात कुलकर्णी सरांचं आभार प्रदर्शनातल शेवटच वाक्य आठवलं आपण आधी बोलावलेल्या नामांकित पत्रकार पाहुण्यांनी आयत्या वेळी नकार दिला आणि या पाहुण्यांनी आयत्यावेळी होकार वयाने तसे लहान असले तरी सर तुमच भविष्य उज्ज्वल आहे. मी पुन्हा जरासं हसलो आणि मनाशी म्हटलं चला भविष्य उज्ज्वल करायचं असेल तर आधी स्वतःला घसघसून घासायला हवं कारण चकचकत्या वस्तूला आज भाव आहे सोन्याचा नव्हे तर चढ उताराच्या मार्केटचा ............

- संतोष टाकळे