जत्रा .......... !





हनुमान जयंती आली कि जत्रांची सुरवात होते याच दिवशी बऱ्याच जत्रा असतात . गावागावातला हा मोठा उत्सव  सारं गाव यात गुंतून जात गाव देवीच्या मंदिरा समोरची हि जत्रा तशी पारंपारिक अगदी पूर्वजांनी सुरु केलेली.  हि प्रथा आजही कोकणात - घाटावर आणि महाराष्ट्रात सुरु आहे . कोकणात जत्रेला शबिना - छबिना अशी जुनी नावं आहेत. कोकणात गावदेवीची काठी ( कळकाच्या उंच काठ्या सजवून तयार केलेलं उंच निशाण ) वाजत गाजत इतर गावतल्या देवांना भेटायला जाते.  यातही खूप साऱ्या दंत कथा आहेत त्यापैकी कोकणातल्या लाटवण गावातली जत्रा बगाड लावून साजरी होते.  बागाड्याचा माणूस जत्रेच्या दिवशी पहाटे जंगलात जातो तो दिवसभर कुणालाही दिसत नाही. त्याच्या सोबत बळी द्यायचा बकरा असतो. दिवसभर उपाशी पोटी या माणसाने जंगलात राहून देवाच्या या बोकडाची सेवा करायची आणि मग तिन्ही सांजेला गावकरी बाजा घेवून या बगाड्याच्या माणसाला न्यायला येतात आणि मग जंगलातून मिरवणूक निघते बळीच्या बोकडाला आणि बगाड्याच्या माणसाला हार टिळा लावून गावाच्या वेशीवरून देवळात आणलं जातं त्याची यथासांग पूजा केली जाते. आणि मग मानकरी देवाला कोल लावतो आणि मानाचा बकरा कापला जातो ( सध्या बकरा देवाच्या नावाने सोडला जातो ) लोक या बगाड्याच्या माणसाच्या पाया पडतात आणि हा मग बागाड्यावर मध्य रात्री पर्यंत तो लटकत असतो. 

इकडे खेळण्याची दुकानं खचाखच भरलेली , बटाटे वडे , कांदा भजी , जलेबी , खाजा आणि तत्सम अनेक पदार्थांचे रुचकर वास त्या त्या दुकानाकडे गिराईकांना ओढत असतात, तंबूत सिनेमा बघायला लोक लायनीत उभे असतात , कुणी मिठाईच्या दुकानात फुकटात मिठाया चाखत भावात घास घीस करताना दिसतो. तर नुकताच लग्न झालेलं एखादं नवीन जोडपं लपून छपुन ice cream एकमेकांना भरवताना  त्या नव्या नवरीचा चेहरा लाजून काय फुललेला असतो .म्हातारी जाणती पारावर बसून गावाच्या नळा पासून ते थेट कोयनेच्या धरणा पर्यंत सगळ्या विषयांवर आपली भूमिका मांडत असतात. विडीचा एक झुरका मारून यांचा उत्साह अधिकच वाढत जातो .इतक्यात कुणी तरी मानकऱ्याच्या बायकोच्या अंगात आल्याची खबर घेवून येतो. लोक आहे त्या जागेवर टाचा वर करून देवळाच्या कठड्यावर घुमणाऱ्या मानकरणीला पाहतात चक्क गाव देवी तिच्या अंगात आलेली पाहून बाय बापडे तिच्या समोर हात जोडतात आई सांभाळ या लेकराला म्हणून इथूनच नमस्कार करतात काही लोक थेट कठड्याच्या जवळ जावून डोकं टेकवून आशीर्वाद घेतात गुरव वाजंत्र्यांना इशारा करतो घुमावा घुमावा आता मी आरती घेतो म्हणत खुद देवीच्या आरतीच्या ताटात धूप कापूर पेटवतो आणि  वाजंत्री त्यांचा स्लो ठेका बदलतात आणि जरा धावता ठेका धरतात मानकरिन जोरात घुमते गुरव तिची आरती करतो देवळातल्या कश्याच्या तांब्यातल पाणी मारून देवीला शांत केलं जात. आणि मनाची ओटी घेवून मानकरिन खाली उतरते.गाव देवाच्या जत्रेतला हा जागर असाच चालू असतो सकाळ उजेडे पर्यंत ………. 


 जत्रा आली कि ते  दिवस आठवतात लहानपणी आम्ही जत्रेसाठी पैशांची जमवाजमव करत असू कधी पार लांब रानात जावून काजूच्या बिया गोळा करायच्या आणि त्या विकायच्या किवा मग घरी न कळता कुठे तरी गुपचूप मजुरी करून पैसे कमवायचे सारं काही या जत्रेसाठी तेंव्हा बाबा १० रुपये द्यायचे आणि आम्ही जमवलेले २० एक रुपये या वीस तीस रुपयात जमतील तेवढी खेळणी घ्यायची गरगरणारा भोवरा ,पी पी करणारी पिपारी ,जादूचा आरसा ,पाण्याचा फुगा ,तलवारी ,बंदुका इत्यादी .मग बाबा देवाच्या पाया पडायला नेत असत त्या तोबा गर्दीतून बाबा माझा हात घट्ट पकडून ठेवत त्यांची ती काळजी आजहि तशीच आहे मागे मी पहिल्यांदा विमान प्रवास केला तेंव्हा तर त्यांनी एका दिवसात मला तब्बल १० ते १२ वेळा फोन केला. 

जत्रा खरी रंगात येते ती मानाची काटी (एक लांब लचक काटी जिला सजवले जाते आणि तिच्या वरच्या टोकावर देवाचा झेंडा लावला जातो ) आल्यावर जोरजोरात ढोल बडवले जातात.  लोक काटीला उभी करण्यासाठी जीवाचा आटापिटा करत असतात तर यात्रेत पोर पोरींना बघून मुद्दामून पिपाणीचा आवाज करत चार शिव्या खावून घेतात .आम्ही मात्र खेळण्याच्या दुकानासमोर घुटमळत काय नवीन मिळतंय का ? आणि उरलेल्या पैशात ते भागेल का ? याच्या विचारात पार टोकाच्या दुकानापर्यंत पोहचत असू , मग कुणी ओळखिचा भेटला कि आम्हा पोरांना तो सरबत पाजत असे कुणी वडापाव देई तस विकत घेवून खायची कधी वेळ आली नाहि कुणी काका - मामा  देणारा मिळेच. 

मी मागच्या वर्षी जत्रेला गेलो होतो. परत एकदा ते दिवस आठवले त्या दिवसात २० रुपये कमवायला दिवसभर लोकाकडे राबायला लागे , वेड्यासारखे ४ बिया जमवायला कट्या कुट्यातून आम्ही रानभर फिरायचो .आज हजाराच्या नोटा पाकिटात आहेत.  पण ते दिवस नाहीत माझ्या सोबत माझा भाचा ओमकार  होता त्याला घेवून मी जेंव्हा खेळण्याच्या दुकानावर गेलो तेंव्हा त्याचा तो जोश ,आनंद ,खेळणं मिळवायची धडपड ,आणि चेहऱ्यावर उमटलेले ते भाव मला त्या दिवसांचा आनंद परत  देवून गेले.  पण कधी कधी वाटतं सगळं काही विसरून मस्त लहान व्हावं खूप खेळावं अगदी गावभर भटकून यावं त्या जुन्या मित्रांमध्ये पुन्हा रामाव लगोरी ,विटी दांडू ,डोंगर का पाणी, गोट्यांचा डाव मांडावा खेळता खेळता दिवस मालवावा आईची हाक यावी तीन्हीसाजी शुभंकरोती म्हणावी रडत खडत एकदा धडा वाचत वहीत अभ्यास लिहून काढावा आईच्या हातची चुलीवरची गरमा गरम भाकरी रस्सा भाजी तोंड लावणीला सोबत मिर्चीचा ठेचा आणि रात्री रंगीबेरंगी सुती गोधडीच्या उबेत आईच्या कुशीत बिंदास झोपून जावं कदाचित ते दिवस परत मिळवता आले असते. पण ते तितकंसं सोप्पं नाही आपण मुंबईच्या या मायावी जत्रेत स्वतः हून असे हरवलोय कि आपल्या घरचा खरा पत्ता मिळूनही आपली पावलं त्या रस्त्याकडे वळत नाहीत मनात कितीही ओढ असली तरी ………………………

- संतोष टाकळे 

No comments:

Post a Comment