पांघरुणातली थंडी ......!



मुंबईत थंडी पांघरुणात शिरली कि जाणवतं आयला हिवाळा सुरु झाला वाटतं आज सकाळी अंथरुणातून उठायची इच्छा होत नव्हती. सुखवस्तू या जगण्यात किती आळस अंगात भरलाय नाही तर गावात असताना सकाळी ६ ला उठून कामं सुरु ,तेंव्हा आम्ही मळा करायचो त्यावेळी भर थंडीत आई, बाबा, मी आणि माझ्या बहिणी सगळे शेतात अगदी अंधारोस्तवर काम करायचो त्या थंडगार पाण्यात काम करताना कधी त्रास झाला नाहि कारण पोटासाठी थंडी काय आणि पाऊस काय?

खऱ्या थंडीचा सामना सकाळी अगदी पहाटे आई आणि मी भाजी विकायला जायचो तेंव्हा ह्वायचा आई मोठा हारा ( मोठ्ठ टोपलं) घ्यायची त्यात मुळा, माठ ,कोतीम्बीर,पालक ,मेथी अशा भाज्यांच्या दोन एक शे जुड्या असायच्या आणि माझ्या टोपल्यात वांगी , टोमाटो,घेवडी ,कारली अशी भाजी सकाळी त्या घुक्यात आम्ही भाजी घ्या भाजी म्हणत चार पाच किलोमीटर पायपिट करायचो सकाळी मोकाट कुत्री अंगावर यायची म्हणून एक मजबूत काठी माझ्या हातात असायची आई कधी कधी खुप दमायची मग मी तिच्या डोक्यावरच टोपल खाली उतरवायचो थोडा दम खावून परत पायपिट सुरु कधी कधी मला खुप कंटाळा यायचा मग आई म्हणायची बाबू थोडा वेळ दम धर अजून दहा बारा जुड्या उरल्यात घरी नेल्या तर सुकून जातील घरी जाताना आपण ५ रुपयाचे गुलाबजाम घेवू नाहींतर तुला हवं ते घे तिचा थंडगार थरथरता हात गालावरून फिरला कि काय उर्जा यायची माहित नाहि मी अजून जोरानं ओरडायचो भाजी घ्या भाजी गावठी भाजी.

आज खूप दिवसांनी अंथरुणात पडल्या पडल्या हि आठवण ताजी झाली लगेच आईला फोन केला म्हटल आई आठवतंय आपण याच दिवसात दोघे भाजी विकायला जायचो ती म्हणाली हो रे तूझी अजूनही बऱ्याचजणी आठवण काढतात आणि म्हणतात वाहिनी तुमच्या सोबत भाजी विकायला यायचा तो मुलगा आता काय करतो ? मी विचारल मग काय सांगतेस तू त्यावर तिच उत्तर होत मुंबईत असतो पेपरात लिहतो स्वतःची शेती असताना चाकरी करतो.मी म्हटल आई तू म्हणालीस तर आत्ता गावी परत येतो .पण या मायापुरीतून निघण म्हणजे चक्रव्हू तोडून येण्यासारखा आहे. त्यावर ती म्हणाली येतोस का ?बोल परत जावू भाजी विकायला मी म्हटल चालेल प यावेळी मी मोठ्ठ टोपलं घेयीन आणि तू छोटं टोपल घे

सकाळी सकाळी अशा गोड आठवणीत बोचरी थंडी अधिकच रोचक झाली. हातात ब्रश घेतला आणि पुन्हा नव्या दिवसाच्या धकाधकीला सुरवात ............

- संतोष टाकळे

No comments:

Post a Comment