दहावीची परीक्षा सुरु झाली आहे आयुष्यातील हा एक महत्वाचा टप्पा जिथे तुमच्या करियरचा महामार्ग सुरु होतो. माझी एक आठवण शेअर करायची आहे . मला अजूनही आठवतंय मी १० वीत असताना बाबांनी खुप मेहनत घेतली होती सकाळी पहाटे ते ४ वाजता मला ते उठवायचे स्वतः माझ्यासाठी चहा करायचे आणि माझी सोबत म्हणून एखादं पुस्तक वाचत बसायचे मध्ये मध्ये थोडी शेकोटी कर ,एखादं बिस्कीट आणून दे अशी त्यांची लगबग चालू असे मी मात्र थोडा झोपाळलेल्या अवस्थेत डोळ्यासमोर नाचणाऱ्या शब्दांना पकडायचा प्रयत्न करीत असे हि परीक्षापण साली नेमकी गुलाबी थंडीत येते. मस्त ताणून देवून सूर्य डोक्यावर येईस्तोवर झोपायचा मूड असला तरी सकाळी पुस्तक घेवून घोकम पाट करणं भाग होतं
पेपर जायचे तसेच गेले मनात धुगधुग होतीच पण सुट्टी मजेत घालवली निकालाची तारीख जाहीर झाली आणि रोज आपण ८० % मार्कस मिळवल्याची सुखावक स्वप्न पडू लागली. सोबत आजुबाजूवाले माझ्या आनंदात भर घालत होते कुणी म्हणे संतोष निदान ७५ % काढील तर कुणाला मी शाळेत निदान तिसरा यायची खात्री मी मात्र मी पास होणार याच शक्यतेवर थांबलेला अगदी निकालाचा दिवस उजाडला सकाळ पासून मी अस्वस्थ सगळ्या देवांना विनवण्या झाल्या बाबा कामावर जाताना पेढ्यांसाठी १०० रुपये देवून गेले त्यांना मी पास होण्याची १०० % खात्री होती. दुपार झाली होती तेंव्हा आता सारखे निकाल इंटरनेटवर येत नसत जे काही आहे ते मार्कशीट वर मी शाळेत पोहचलो तेंव्हा कळलं निकाल ३३ % लागला आहे बरेचजण उडालेत मला तर घाम फुटला मी निकाल घेण्यासाठी रांग लावली तेंव्हा पण मनात अनेक शंका येत होत्या काय होयील माझं कोण जाणे ?
आणि शेवटी अनपेक्षित निकाल आला गणितात माझी दांडी गुल मला तर भोवळून आलं समोर काही दिसेना काय झालं म्हणून मित्र विचरत होते पण मी सरळ सायकल घेतली आणि घरचा रस्ता धरला रस्त्यात बरच जण भेटले पण मी काहीच न बोलता सायकल पळवत घरी आलो तर दारात अर्चू ताई उभी माझा चेहरा बघून कदाचित ती समजून गेली आणि दारातच एक सणसणीत कानाखाली आवाज झाला बस मग मी जो भोकाड पसरला कि आजूबाजूच्या शेजाऱ्यांना मी नापास झाल्याची वायरलेस बातमी समजली मला बाकी कुणाची भीती नव्हती आत्ता बाबा काय म्हणतील याची चिंता दिवस सरला बाबा यायची वेळ झाली मला तर धडकीच भरली होती आमच्या घरासमोर आमची आक्का रहायची बाबांना येताना बघून ती समोर आली बाबांना म्हणाली अनंता पोरगा नापास झाला रे पण तू बाबा काय बोलू नकोस असुदे होयील तो पास पुढच्या वेळेस बस बाबांचा पारा तिथेच चढाला ते तडक घरी आले कमरेचा पट्टा काढला आणि मला शोधत पुढे आले आई त्यांना आडवत होती पण बाबा ऐकले नाहीत साट साट पट्टा चालला मला ओरडायची फुरसत मिळाली नाहि आणि हाता पायावर लाल ओळ उमटून आले बाबा खुप भडकले होते मी निदान ४ दिवस अंथरुणातून उठलो नाहि.
मी ऑक्टोबरचा फॉम भरला आणि परत अभ्यासाला सुरवात केली तेंव्हा घरातून मी बाहेर पडत नसे पण ते दिवस पावसातले आणि शेतीच्या कामाचे होते. बाबा आधीच माझ्यावर चिडले होते म्हणून त्यांनी मला नांगरणी पासून ते लावणी पर्यंत राबवलं लोक म्हणायचे काय पोराला
मारून टाकणार काय त्यावर बाबा म्हणायचे अहो हा नवीन बैल घेतला आहे शाळेत पाठवलं तर नापास झाला माझे दोन बैल आहेत त्यात हा तिसरा अक्षरशः लाज वाटायची स्वतःची ते दिवस कसे घालवले ते माझं मला माहित मग मात्र मी ठरवलं आता बस मी काही तरी करून दाखवेन आणि मग काही दिवसात मी दापोली सोडली.
मी मुंबईत आलो ते शिक्षणासाठी पुन्हा नवीन सुरवात शेवटी कीर्ती कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला आणि मी बारावीच्या तयारीला लागलो आता मला पुन्हा तीच चूक करायची नव्हती बाबा अजूनही फारसे बोलत नव्हते मी कॉलेज जॉईन केलं आणि पैसे कमी पडले माझ्या मोठ्या ताईने आणि माझा मित्र अजित कांबळे उर्फ कामत यांनी माझ्या पैशाची व्यवस्था केली आणि माझं कॉलेज सुरु झालं एकदाची बारावीची परीक्षा आली तेंव्हा मी प्रभादेवीच्या नेहरू नगरात झोपडपट्टीत राहत होतो आमच्या बाजूला बिहारी , यु पी ,गुजराथी ,बंगाली आणि तेलगु अशा वेगवेगळ्या प्रांतातले लोक राहत होते रोज सकाळी ७ वाजले कि प्रत्येक जण आपआपले सुगम संगीत लावीत शर्मांचा घरी सैया तोहर झटका ,रामाक्रीश्णनच्या घरी आणा अंताने इपडू लेता असं काहीसं सुरु होई आणि माझ्या अभ्यासाचा बट्या बोळ मग मी सिद्धिविनायक गार्डन मध्ये जायला सुरवात केली कसा बसा अभ्यास पूर्ण केला आणि परीक्षा पूर्ण झाली सुट्टी सुरु झाली पण मी लगेच काम शोधलं कीर्ती कॉलेज मध्ये माझा एक मित्र होता तो केटरिंग मध्ये काम करायाचा त्याच्या सोबत मी पण वेटरच काम सुरु केलं त्या काळात मला एकूण २५०० रुपये मिळाले पण जेंव्हा कुणी ये वेटर यहा आना असं बोलवल्यावर वाईट वाटे पण चालता है यार म्हणून मी काम करत असे तेंव्हा ठरवलं एकदा आपण असं सुटाबुटात साहेब बनायचं आणि जेंव्हा मी पहिल्यांदा सुट घातला तेंव्हा डोळे पाणावले ते दिवस आठवले मी कोणत्याही पार्टीत गेलो तरी वेटरशी अदबीनं वागतो त्यांची विचारपूस करतो.
जेंव्हा माझा बारावीचा निकाल लागला तेंव्हा माझा माझ्यावर विश्वास बसेना मी ७२ % मिळवून पास झालो होतो.पण खरी मेहनत माझ्या ताई आणि दाजींची मी मुंबईत आल्या नंतर तेच माझे आई बाबा झाले. आजही तेच माझे सगळे निर्णय घेतात मी नशीबवान आहे कि मला एक नव्हे तर दोन बाबा आणि दोन आई आहेत. आज जे मला हवं होतं त्याच्या जवळपास मी पोहचलो आहे. मला ओळख न दाखवणारे माझे वर्ग मित्र आज फेसबुकवर भरभरून माझी तारीफ करतात मला बैल म्हणून राबवणारे माझे बाबा आमच्या पोरग्याने नशीब काढलन म्हणून अभिमानाने बोलतात. शेवटी माणसं वाईट नसतात हो ती वेळ त्यांना वाईट बनवते
तुम्हाला हा अनुभव सागण्याचा उद्देश हाच अपयश शेवट नसतो तर एक नवी सुरवात असते
शेवटी यशाची सर कशालाच येवू शकत नाहि प्रामाणिक मेहनत , स्वतः वरचा आत्मविश्वास आणि तुमचा चांगुलपणा तुम्हाला कधीच हरू देणार नाहि
अपयश यशाची पहिली पायरी असली तरी
यशाची पहिली चढायचा अनुभव काही वेगळाच
तुम्हा सगळ्यांना खुप खुप शुभेच्या !!!
- संतोष टाकळे
Sanntosh Taakale

No comments:
Post a Comment